आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात 'मला काय त्याचे' अशा काळात, असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला- स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय.
गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळयांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवनमंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरूवात केलीः
"माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे !
"माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.
:माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.ाझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.
"मित्रांनो ! माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा-अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेडयांतील लोक आम्हांला खोत म्हणून संबोधीत!'
"खोत म्हणजे काय ?' भिकाने प्रश्न विचारला.
श्याम म्हणाला, 'खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल!
"त्याला काही मिळत नाही का?' रामने विचारले.
"हो, मिळते तर ! सरकारी शेतसा-याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो. पिकांचा अंदाज करतो. 'याला पीक धरणे' असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले, तरी चांगले लावतात! लोकांनी वसूल दिला नाही, तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसा-याचे हप्ते- वसूल आला नसला, तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत!'
म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे, असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या आंगठया, ती सल्लेजोडी, ते शंभर रूपये घेतले व त्यांनी पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते. या कामात मुरलेले नव्हते. पण दारिद्रयामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वत:च्या मुलाबाळांच्या प्रेमाने, त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून, ते मांग तो खून करू पहात होते. कोणी म्हणतात की, जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे. परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युध्द नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो. भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाब-या घाब-या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरूष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलिस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली.
घरात बातमी येताच आकान्त झाला. सा-यांच्या तोंडचे पाणी पळाले! घरात दिवे लागले होते; परंतु सा-यांची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे! तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्या वेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, 'देवा नारायणा ! तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे ! तुझी मी मुलगी. मला पदरात घे. माझे कुंकू राख. माझे चुडे अभंग ठेव. माझे सौभाग्य-नको, आई आई! त्यावर कु-हाड नको पडू देऊ ! मी काय करू? कोणते व्रत घेऊ? देवा! माझी करूणा येऊ दे तुला, तू करूणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरुन; नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने! नकोत ती मोठी वस्त्रे! कशाला मेली ती खोती! नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना. तेवढा दे देवा.' असे म्हणून आई विनवू लागली. रडू लागली.
आईने देवाला आळविले, प्रार्थिले; परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री-पुरूष रत्ने आहेत! राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका. सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल. मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो.
माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरूवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहाणा-या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो. आधार देवो, वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्या प्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील.
सावित्रीव्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्या वेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन. सावित्रीव्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती.
आईने 'श्याम' अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, 'काय आई? काय होते? पाय का चेपू?
आई म्हणाली, 'पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू?'
आईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, 'श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ?'
"कोणते काम? आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले.
आई गहिवरून म्हणाली, 'नाही. तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस, हे बघ, उद्यापासून वट-सावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ.'
असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.
"आई! माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील?' मी विचारले. 'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग! माझेच तू रूप! तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहिती आहे.' आई म्हणाली.
"पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ' अहाऽ रे बायको! असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार! शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील.' अशा अनेक सबबी मी सांगू लागलो.
आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली 'श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम! त्या दिवशी चुलीमागचा खोब-याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले. पण बोलल्ये नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडवप्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन-जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम! तुमच्यासाठीच जगत्ये रे-' असे म्हणून आईने डोळयांना पदर लावला.
आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. 'देवाचे काम करावयास लाजू नको; पाप करण्याची लाज धर-' थोर शब्द! आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे? देवाच्या कामाची देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.
मी आईच्या पाया पडलो व म्हटले, 'आई! जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो. मी जाईन. पुंडलीक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई! तुला माझा राग आला होय. तुला वाईट वाटले?' असे केविलवाणे मी विचारले.
"नाही हो बाळ. मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम!' आई म्हणाली. गडयांनो ! मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. 'पाप करताना लाज वाटू दे चांगले करताना लाज नको!'