विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.
हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांनी एक दत्तक मुलगा घेतला होता. त्याचे नाव होते दीपचंद - परंतु त्याला प्रेमाने सारे बाबू अशीच हाक मारीत.
बाबू ज्या वेळेस दतक घेतला गेला, त्यावेळेस रतनशेटनी हजारो रुपये खर्च केले. मुंबईहून नाचणाऱ्या व गाणाऱ्या नृत्यांगना बोलावण्यात आल्या होत्या. संगीताच्या जलशात व मेजवान्यात वाटेल तसा पैसा खर्च केला गेला. खेड्यापाड्यांतून लोक भुकेने मरत होते. त्यांच्या किंकाळ्या या संगीतबहाद्दरांना, बासुंदीबहाद्दरांना, विलासलोलुपांना कोठून ऐकू येणार? सारे नाचतमाशात दंग होते.
तो पाहा एक स्वयंसेवक खाली रस्त्यात गाणे म्हणत आहे. किती करुणरसपूर्ण तो गाणे म्हणत आहे. त्याचा आवाज मोठा परंतु गोडही आहे. त्याचा खादीचा पोशाख आहे. खांद्यावर काही खादी का आहे विकायसाठी? त्याचे गीत आपण ऐकू या.
हृदय जणू तुम्हा ते नसे || हृदय ||
बंधुपाशी लाखो मरती || विलास सुचती कसे || हृ.||
निज भगिनीच्या अंगावरती | चिंधीही ती ना दिसे || ह.|| गरिबांच्या मरणाने सतत | तुमचे भरति खिसे || हृ.|| खादि वापरा, खादी घाला | इतुके मागीतसे || हृ.|| नाचतमाशे करण्याचा हा | अवसर का हो असे || || हृ.|| देव ओळखा धर्म ओळखा | चरणा मी नमितसे || हृ.||
बाबू सोन्यामोत्याच्या दागिन्यांनी नटलेला होता. त्याच्या अंगावर भरजरी पोशाख होता. बाबू ते गाणे वरून ऐकत होता. बाबूच्या भोवती श्रीमंतापुढे गोंडे घोळणारे अनेक लाळघोटे होते. 'काय ऐकता भिकारड्याचे, चलो दिवाणखान्यात, ती दुसरी प्लेट लावू' - एकजण श्रीमंत बाबूस म्हणाला.
'कोको केला आहे - तो घ्यायला येता ना आधी शिरा खा पण मग वर कोको गोड लागेल का? मध्ये थोडी शेव खावी' - दुसऱ्याने सुचविले. बाबू खालचे गाणे ऐकत होता.
'गरिबा नाही घास परि | खाऊनि हा मरतसे ||. ||
'चला बाबूशेट - शिरा निवत आहे' - एकजण म्हणाला.
" हाकला रे त्या भिकाऱ्याला येथे आला रडगाणे गात - येथे केवढा आनंदाचा प्रसंग' एकजण म्हणाला. -
खाली कोणीतरी त्या स्वयंसेवकास पुढे जाण्यास सांगितले. तो स्वयंसेवक शांतपणे पुढे चालला.
"मला मुळीच भूक नाही पोटात - " बाबुशेट म्हणाले.
बाबू एकटाच एका बाजूला गेला व रडू लागला. सगळीकडे हाकाहाक झाली. बाबू रडू लागला. बाबुला उचलून आणण्यात आले. त्याला गादीवर पलंगावर निजवण्यात आले. डॉक्टर आले. डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नाही सांगितले व औषध पाठवतो असे म्हटले. आजूबाजूचे लोक तोंडावर चिंता दाखवू लागले. 'काय झाले एकाएकी बाबू - बेटा काय झाले' रतन शेटनी विचारले.
"आता मला बरे वाटते. हे कपडे काढले म्हणजे आणखी बरे वाटेल. बाबा हे जरीचे कपडे नकोत. 'बाबू म्हणाला.
"काढ रे त्याचे कपडे. नुसता तो रेशमी शर्ट घाल.' शेटजी म्हणाले. बाबू जास्त काही बोलला नाही. बाबू बरा आहे असे वाटल्यामुळे रात्री जास्तच नाचरंग उडाला. बाबू मात्र अंथरुणावर रडत होता.