बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत, ते जिवंत इतिहास शिकवीत. कधी वर्गात नवजीवन आणून वाचून दाखवीत, तर कधी तरुण भारत आणून वाचीत, कधी जन्मभूमी वाचून दाखवीत, तर कधी त्रिवेणी, कुमार, प्रवासी, सरस्वती, विशाल भारत वगैरे हिंदी, बंगाली, गुजराथी, मासिकांतील अनेक विषयांवरचे लेख वाचून दाखवीत, कधी आचार्य प्रफुल्लचंद्र म्हातारपणी खादीकामास कसे वाहून घेत आहेत, प्रोफेसरी सोडून आचार्य कृपलानी संयक्त प्रांतात खादिसंवर्धन कसे करीत आहेत, जेठालभाई बुंदेलखंडातील अत्यंत दरिद्री प्रदेशात कसे सेवा करून राहिले आहेत हे सांगत, अनाथांच्या हालअपेष्टांचे वर्णन करून मुलांना हे रडवीत. कधी पुढे सेवेस वाहून घ्या असे सांगत.
त्रिंबकरावांचा तास म्हणजे मुलांना मेजवानी असे. कधी वाड्:मयासंबंधी सांगत, तर कधी खरे शिक्षण म्हणजे काय याविषयी सांगत. मोठमोठ्या लेखकांचा ते परिचय करून देत. साहित्यक्षेत्रातील गोष्टी सांगत. कालिदास, वाल्मिकी नुसता उल्लेख कोठे आला पुरे -- म्हणजे त्यांची हृदयगंगा भावनांनी वाहू लागे. त्यांच्या जिभेवर सरस्वती जणू येऊन नाचे.
एक दिवस प्राचीन काळातील शिक्षणावर ते सांगत होते 'प्राचीनकाळी ठरलेली फी नसे. जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण संपले म्हणजे फी नेऊन देई-गुरुदक्षिणा म्हणून नेई. ती फी नसे- दक्षिणाही नसे. ते कृतज्ञतेचे चिन्ह असे. गरीब विद्यार्थी फूलही नेऊन देई. त्याची कृतज्ञता त्या फुलात असे. श्रीमंत हजारो सुवर्ण नाणीही नेऊन देई. कृतज्ञतेला मोल नाही. देवाला कृतज्ञतेचे तुळशीपत्र राजभांडाराहून प्रिय आहे. या हृदयातील कृतज्ञतेचे द्योतक म्हणून गुरुदक्षिणा शिष्य देई. यथाशक्ती शिष्य देत असे. आज फी देतो ती जणू कायद्याने देतो. त्यात ना हृदय ना भावना. श्रीमंत असला तरी चार रुपये महिना देणार- गरीब असला तितकीच द्यावी लागणार? केवढा अन्याय चालला आहे? बाबूसारख्या लखपतीला चार रुपयेच फी व त्या हरीलाही चार रुपये फी. हरीमजुराचा मुलगा ! वास्तविक हरीने एक फूल आणून द्यावे. बाबूने १०० रुपये आणून द्यावे ! परंतु सारे यांत्रिक झाले आहे !
काय बाबू खरे की नाही? तुझे वडील एखाद्या फंडाला हजार रुपये देतील तर मंजूर एक दिडकी देईल. म्हणजे तुमचे हजार रुपये व मजुराच्या दिडकी सारखीच आहे. मग येथे फीचे बाबतीत असे का? हरीचा बाप त्याला उपाशी राहून शिक्षण देत आहे, तसे तुझे नाही. तुझे वडील तुला जणू फुकट शिकवीत आहेत. तर शिक्षणाला गरीब चार रुपये देतो, त्याला तुझे वडीलही चारच देणार? यात काय शोभा ? प्राचीन हिंदुस्तानातील लोकांची दिलदारी आठवली म्हणजे रडू येते. आपण आज सारे भामट्ये झालो आहोत - गरिबाला छळून त्याच्यावर सारा बोजा टाकीत आहोत.
बाबूच्या मनावर त्रिंबकरावांच्या विचारांचा फार परिणाम झाला. त्रिंबकरावांच्या म्हणण्यात अर्थ आहे असे त्याला वाटे. परंतु तो काय करणार? अजून तो मोठा थोडाच झाला होता. अजून तो लहान होता. बाबा त्यांचे थोडेच ऐकणार होते. चार रुपयांऐवजी १०० रुपये थोडेच देणार होते?