आईचा शेवटचा आजार
श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता.
"श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.
'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार ! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन.' श्याम म्हणाला.
"श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला?' रामाने विचारले.
'अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पडाल. वेडे आहात, काही वातवीत झाला, तर बसा जवळ, तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जात तू. राम, तूही पिंजायला जा!' श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले.
सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरूणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड लोक म्हणत होता.
सुचो रूचो ना तुजवीण काही । जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद । मुखात गोविंद हरे मुकुंद ॥
तुझाच लागो मज एक नाद सरोत सारेच वितंडवाद ।
तुझा असो प्रेमळ एक बंध । मुखात गोविंद हरे मुकुंद ।
'काय रे? आतासे आलात?' श्यामने विचारले.
'तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट?' एका लहान मुलाने विचारले.
'हो, सांगेन. तुम्ही या.' श्याम म्हणाला.
'पाहा, तुम्हांला छान छान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरावयास गेलो होतो.'
एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले.
"खरेच किती सुंदर आहेत हे! या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हं!' असे म्हणून श्याम त्या खडयांचा पोपट करू लागला.
मुले एकेक खडा देत होती.
'आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा,' श्याम म्हणाला..
'हा घ्या, हा पाहा चांगला आहे.' एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खड़ा लाविला व सुंदर राघू
तयार झाला.
'आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला.
'तुम्हीच बनवा मोर.' श्याम म्हणाला.
'आम्हांला चांगला येत नाही.' तो म्हणाला.
'पण आता तुम्ही घरी जा. लौकर जेवून या. श्यामने सांगितले.
'चला रे, जेवण करून येऊ.' एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली.
श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खडयांत किती सौंदर्य देवाने ओतले
आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.
गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.
'श्याम! काय आहे तुझ्या हातांत ? फूल का?' रामने विचारले..
'अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो.' श्याम म्हणाला..
'मग काय आहे हातांत?' नामदेवाने विचारले.
'देवाच्या मूर्ती.' श्याम म्हणाला.
'तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?' भिकाने विचारले.
'हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत.' श्याम म्हणाला.
'पाहू दे, कसली आहे?' असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक मोत्ये बाहेर पडली.
'हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात
हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा
रंग कसे आहेत!' असे म्हणून श्याम दाखवू लागला.
'श्याम, आज बोलणार ना तू?' रामने विचारले.
'हो. त्या मुलांना मी सांगितले आहे. जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुध्दा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?' श्यामने विचारले.
प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला.
जप्तीच्या वेळी आमची दूर्वांची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती, ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरूणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत. कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवयनी, नम्मावशी वगैरे येत असत.
परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे दोन रूपये मिळवीत होती, ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे.
'मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोबरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?" दुर्वांची आजी बोलत होती.
माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, 'नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची
अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका.'
त्या दिवशी आई पुरूषोत्तमला म्हणाली, 'पुरूषोत्तम! तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये, नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण. '
पुरूषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.
'यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?' ती प्रेमळ मुलगी म्हणाली.
'नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल.' आई म्हणाली..
इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरूषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.
'बाळ, पाणी दे रे !' आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला..
'चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर' असे आईने सांगितले. तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले.
'या जानकीबाई, या हो, बसा.' जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.
'पाय चेपू का जरा?' त्यांनी विचारले.
'चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले.'
आई म्हणाली.
'आवळयाची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल.' जानकीबाईंनी विचारले.
'द्या तुकडा आणून. क्षीण स्वरात आई म्हणाली.
'चल पुरूषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे.' असे म्हणून जानकीबयनी निघून गेल्या. पुरूषोत्तमही
त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळयाची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरूषोत्तम जवळ बसला होता.
'जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?' असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.
पुरूषोत्तम बाहेर खेळावयास गेला.
तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखडयाने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळया म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुध्दा मधूनमधून बरे नसे.
"ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आई?' आईने नमूला विचारले.
'बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?' नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.
'नमू, तुझ्याबरोबर पुरूषोत्तम येईल, त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले.' आई म्हणाली.
'बरे, हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर नमू म्हणाली.
'आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत.' आई म्हणाली.
'तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?' नमूमावशीने विचारले.
'नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे?' आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.
'हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?' नमूने विचारले.
'महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रूपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रूपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल.' आई सांगत होती.
'श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?' नमूने विचारले. 'त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे विचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?' आई म्हणाली.
नमुमावशी निघाली. 'कुंकू लाव, ग. तेथे कोनाडयात करंडा आहे.' आईने सांगितले, नमूमावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली...
'आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. बाचू मी?' असे म्हणून पुरूषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.
'इंदू ! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र दे रे इंदूताईला.' आई पुरुषोत्तमास म्हणाली.
इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, 'मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा वाटे, की केव्हा त्यांना बघेन.' इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. 'पुरूषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल.' इंदू म्हणाली.
"जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो.' असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.
'माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देत येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी ?" वडील आईजवळ बसून म्हणत होते.
'हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत. तर धाकटया पुरुषोत्तमाने काय करावे? पुरूषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊन नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उडया मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळ्यांत मी येऊन बसेन हो. असे आई बोलत होती.
'तू सुध्दा वरी होशील. सखू येत आहे. ती तुला बरी करील.' वडील म्हणाले.
'कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांस कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात.' असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता.
'पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने.' आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले.
'तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ उनका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो.' असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते..
इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या.
'या इंदूच्या आई, या.' म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला. केस जरा सारखे केले. 'पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?' त्यांनी विचारले. 'हो पत्र आले आहे. इंदूने वाचले.' आई म्हणाली.
'तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते.' राधाताई म्हणाल्या. 'सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत. तुमचा शेजार आहे. आणखी काय पाहिजे?' आई म्हणाली.
थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या.
मावशी पहाटे येणार होती. पुरूषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाडया पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरूषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या वेडयाशी थांबली.
'आपल्याच बेडयाशी थांबली रे!' आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरूषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय मावशीच आली होती. पुरूषोत्तम करंडी घेऊन आला; वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला.
'आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली. आईला हलवून पुरूषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते.
'आली? माझी वाट मोकळी झाली !' असे आई म्हणाली. अर्धवट शुध्द, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले.
'अक्का!' मावशीने हाक मारली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंत:करण ओतलेले होते.
'आलीस सखू, बस तुझीच वाट पहात होत्ये म्हटले, केव्हा येतेस ! पण आलीस लौकर प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!" आई रडू लागली.
'अक्का! हे काय वेडयासारखे. मी आल्ये आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे; मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे.' मावशी म्हणाली..
"नको हो आता कोठे येणे-जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करकरून झोपड़ी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच माझ्या राजवाडयातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर, तू जवळ असता, मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो, असे म्हणतात, ते खरे ठरो सखू ! तुला ना मूल, ना बाळ तुझा संसार देवाने आटपला; जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो!' आई बोलत होती.
'अक्का! हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड़. मी थोपटते हूं.' असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लॅकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते.
मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते.