गरिबांचे मनोरथ
श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी व
कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!
"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?' रामने विचारले.
"राम! आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्रय आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग ! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले! पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे. आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता नाही; लोभ आहे, प्रेम नाही; पशुत्व आहे, माणुसकी नाही; अंधार आहे, उजेड नाही; अधर्म आहे, धर्म नाही, भीती आहे, निर्भयता नाही बंधने आहेत, मोकळेपणा नाही, रूढी आहेत विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख, माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करू?'
श्याम बोलेना. 'श्याम! दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे; अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे, बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. ' राम म्हणाला.
परंतु मी वीर नाही; तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे, असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो; माझी ऐट उसनी असते; ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला.
निराश होणे म्हणजे देवाला विसरणे, निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल. अंधारातून उजेड येईल, असे मानणे म्हणजेच आस्तिक्यभाव.' राम म्हणाला.
"परंतु निशा संपून आलेल्या उपेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे, ते मला समजत नाही. जाऊ दे. फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल, ते करावे. दगड उचलावा; काटा फेकावा! फुलझाड लावावे; रस्ता झावा; कोणाजवळ गोड बोलावे; गोड हसावे; आजाऱ्याजवळ बसावे; रडणान्याचे अश्रू पुसावे. दोन दिवस जगात राहणे! माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार!'
'अरे, आपण संघटना करू. नवविचार फैलावू, दैन्य हरू; भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे.' राम म्हणाला.
प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थनामंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला.
रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य, अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा-निराशांच्या द्वंद्वयुध्दाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उडया मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते.
प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला.-
'गडयांनो! दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काही तरी बोलण्यासाठी मी
गेलो होतो.'
'आई! या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, 'अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली.' आई! आपण एकदा श्रीमंत होतो, ते लोकांना माहीत आहे; परंतु आज घरी खायला नाही त्यांना माहीत नाही; सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो.'
'श्याम! तू आता शाळा सोडून दिली पाहिजे.' आई शांतपणे म्हणाली.
'आई! आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली. एवढयात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे?' असे मी आईला विचारले.
'तुला कोठेतरी रेल्वेत लावून देऊ, असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी मिळाली, तर.' आई म्हणाली.
'आई! एव्हापासूनच का नोकरी करायवयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई! माझ्या केवढाल्या उडया, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने! मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन! आई! सान्या आशांवर पाणी ओतावयाचे? सारे मनोरथ मातीत लोटावयाचे?' मी जणू कवी होऊनच बोलत होतो; भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती.
'श्याम! गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळया किडीच खाऊन टाकतात!' आई म्हणाली.
आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे, असे तुला वाटते! मी मोठा व्हावे, असे तुला नाही वाटत?' मी आईला विचारले.
'माझ्या मुलाने मोठे व्हावे; परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे; पित्यावर विसंबून रहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे.' आई म्हणाली.
'आई! मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस, या वेळेस काय करू? ते तूच सांग.' मी आईला म्हटले.
'आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास
ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले, तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा, उपासतापास काढ, आयाससायास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू?' आईने स्वावलंबनाचा उपदेश केला.
'आई! मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस! माझ्या हृदयात तू आहेस म्हणून तू माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई! तिकडे एक औध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून, जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन; तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना? आईला मी विचारले.
जा. माधुकरी मागणे पाप नाही; विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल, ती मदत देत जा. गोड बोलावे. हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको हृदये दुखवू नको, अभ्यास झटून कर, आईबापांची आठवण ठेव, बहीणभावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उध्दार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उध्दार कर.' आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती.
'आई! तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल.' मी सांगितले. ! तू
'मी तुला ती मिळवून देईन. निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते.' असे आईने
आश्वासन दिले.
रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. 'म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला.' आई वडिलांना म्हणाली.
'कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रूपये मोजले; परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये, असे का मला वाटते? आपल्या होतकरू बुध्दिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?' असे वडील मोठया खेदाने म्हणाले.
'तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो
माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रूपये त्याला द्यावे, म्हणजे झाले.' आई म्हणाली. 'काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे
नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे.' वडील म्हणाले.
आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. 'आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?' धाकटा पुरूषोत्तम आईला विचारीत होता.
'हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे.' आई त्याची समजूत घालीत होती.
शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.
वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो! इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते; परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारीसुध्दा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठया सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे- जाणे थोडेच होणार! प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार ! मला दहा रूपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो; पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो; आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो; हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यांतील पाण्याला थांबवीत होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? "श्याम! तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव, रे, माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे.' असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण ध्रुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे, म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? 'आई! मी थारोळे भरून ठेवतो.' म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणील ? मी घरी गेलो, की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईल, याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण ? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया. साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच; एक तोच.
माझी बांधाबांध चालली होती. रात्रीची वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार, हो जाणार; आईला सोडून जाणार! आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, 'घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन; त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे. मला नको.'
'अरे तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले, तर असू दे आपली. बाळ! आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक.'
असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसांत ओठ फुटू नयेत, म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला; आगबोट लागू नये, म्हणून चार आवळयाच्या वडया दिल्या, चार बिब्वेही बरोबर असू देत, असे म्हणाली व लोटयाच्या कोनाडयातून तिने ते काढून आणिले. माझी ममताळू, कष्टाळू आई! बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते.
रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकटया भावाला म्हटले, 'आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो,' बाळ. आईला आता तू!' असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत. आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, 'माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा.' 'जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. 'सांभाळ!' ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते. कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळयांना लाविले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. 'माझ्या मायबापांना जप!' असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. 'जप, हो, बाळ. सांभाळ.' ते म्हणाले.
मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन-समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुडया मारून मोती काढणार? या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रूतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. 'ध्रुवाप्रमाणे जा.' आई म्हणाली! कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडालेंबडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम! मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई! तिची कृपादृष्टी असली, म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो; कधी चिखलात रूतलो; कधी वाळूत पडलो; कधी लाटांनी बुडविले; परंतु पुनः पुनः मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई मेली, तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणांस नेहमी आतून मिळतच असतो.