गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती. त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटांत एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्षी या अंजिराची मधुर फळे खाई, गंगेचे निर्मळ पाणी पिई व मोठ्या संतोषाने असे.
परंतु सर्वच दिवस सारखे नसतात. काही वर्षे गेल्यावर त्या वृक्षाचे सौंदर्य व सामर्थ्य नष्ट झाले. तो अंजीरवृक्ष वाळत चालला. त्या झाडास पाने फळे येतनाशी झाली. शेवटी राहता राहता सुकलेले शुष्क खोड मात्र राहिले. अंजिराच्या झाडात पुष्कळ ढोल्या होत्या व त्यातून भूस बाहेर पडत असे.
तो तांबड्या चोचीचा सुंदर हिरव्या पंखाचा पोपट कोठे होता ? तो पोपट आपल्या जुन्या मित्रास चिकटून राहिला. ज्या झाडाने पूर्वी आपणास सुंदर अंजीर दिले त्या झाडाला त्याच्या शेवटच्या दिवसांत पोपटाने सोडले नाही. तो झाडाची वाळलेली साल व ढोलीतून गळणारा भुसाच खाई व गंगेत उतरून तृषा भागवी.
त्या पोपटाची निष्ठा देवाने पाहिली. एका हंसाचे रूप धारण करून भगवान ब्रह्मदेव त्या अंजीरबागेत आले. हंसरूपी ब्रह्मदेव पोपटास म्हणाले, “शुका, जेथे सुंदर फळे वगैरे असतात तेथे पाखरे राहतात. तू वेड्यासारखा या वाळलेल्या खुंटावरच का बसून राहतोस ?"
पोपट म्हणाला, “हे हंसा, हा वृक्ष व मी दोघे बाळपणापासून मित्रमित्र आहो. हा वृक्ष अंगात शक्ती व सौंदर्य असेपर्यंत माझे पोषण करी - मला अंजीर देई. यावज्जीव ज्याने मजवर प्रेम केले, त्याला मी कसा सोडू? मी कृतघ्न कसा होऊ ? मी येथेच मरेन पण उडून अन्यत्र जाणार नाही. "
ब्रह्मदेवास आनंद झाला. त्याने आपले स्वरूप प्रगट केले व आपल्या कृपेने त्या वाळलेल्या झाडास पानेफुले आणली. तो वृक्ष सुंदर दिसू लागला.
मरेपर्यंत तो पोपट त्याच झाडावर राहिला. सारांश, पशुपक्षीसुद्धा कृतज्ञता व प्रेम दाखवतात. मग विचारशील मनुष्याने किती थोरपणाने बागले पाहिजे बरे?