सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आहे? कोणाची वाट पहात आहे? इतक्यात पाठीमागून कोणी तरी आले. तिच्या पाठीत रपाटा बसला.
'कार्टी येथे उभी आहे अजून ! दूध नाही का आणायचे? जा लवकर. लोक जेवायला येतील. पाटपाणी अजून करायचे आहे. आळशी आहे सा- या मुलखाची. नीघ.'
मिरी डोळे पुशीत गेली. दूध घेऊन ती परत येत होती. कोणाला तरी
बघत बघत ती येत होती. इतक्यात कोणाचा तरी तिला धक्का लागला. सारे
दूध सांडले. ती रडू लागली.
'काय झाले बाळ? माझ्या शिडीचा धक्का लागला? उगी. रडू नकोस. सांडले दूध तर सांडले. सांग घरात की माझा धक्का लागला. तुला काणी रागे भरणार नाही.'
‘आत्याबाई मारील. मगाशीच तिने धपाटा मारला. मघाशी येथे तुमची वाट बघत उभी होते. तुम्हाला पाहून मगच मी दूध आणायला जाणार होते; परंतु धपाटा मिळाल्यामुळे मी आधी गेले आणि मी तुम्हालाच बघत बघत येत होते. तो तुमची शिडी मला लागली. '
'तू माझ्यासाठी थांबली होतीस?'
'हो. तुम्ही रोज येता. हा येथला दिवा तुम्ही लावता. माझ्या खिडकीतून हा दिवा दिसतो. सुंदर दिवा ! तुम्ही हे सारे दिवे लावता. होय ना? तुमची ही शिडी, तुमच्या हातातला हा कंदील; तुम्ही मला आवडता. या कंदिलाने तुम्ही सारे दिवे लावता. होय ना? आकाशात कोण हो दिवे लावते? हातात कंदील घेऊन कोण तेथे काम करते? तेथेसुध्दा खांद्यावर शिडी घेऊन जाणारे कोणी असेल?'
'बाळ, तेथेही कोणीतरी काम करणार असेल. आणि मी तुला आवडतो? खरेच की काय ?"
‘होय. केव्हा एकदा संध्याकाळ होते नि तुमचा कंदील दिसतो असे मला होते. मी तुमची वाट पाहत असते. कधी कधी त्या खिडकीतून मी तुम्हाला बघते. तुम्ही या दिव्याच्या खांबावर शिडीवरून चढता, दिवा लावता नि जाता. होय ना?'
'तू आता घरी जा.'
'कशी जाऊ घरात? आत्याबाई मारील.'
इतक्यात आत्याबाई तेथे आली.
'आत्याबाई म्हणे मारील. सोडीन की काय मारल्यावाचून? आणि हे काय? सारे दूध सांडलेस की काय? तुला का अवदसा आठवली आहे? हातात जशी शक्ती नाही मेलीच्या. खाते तिन्ही त्रिकाळ, तरी मरगळल्यासारखी वागते. का ही सारी तुझी ढोंगे? कसे ग सांडलेस दूध ? नीट धरता नव्हते येत? चल, घरात चल. तुला चांगले चौदावे रत्नच हवे. चल घरात. तिकडे कोठे चाललीस?'
'माझा तिला धक्का लागला. त्या मुलीचा दोष नाही. माझी शिडी तिला लागली. काय करील ती बिचारी? हे घ्या दोन आणे नुकसानीचे. नका मारु तिला. कोवळी पोर.
'तू नको मध्ये तोंड घालूस. तुझा उद्योग तू कर. म्हणे दोन आणे घ्या. आता जेवायला येतील लोक खानावळीत. त्यांना कोठले दूध वाढू? इतक्या उशिरा आता कोठे मिळेल तरी का दूध ?"
'मिळेल, त्या पलीकडच्या रस्त्यावर एक दुकान आहे तेथे मिळेल. जा बाळ तेथे. हे चार आणे घेऊन जा.'
'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणारे श्रीमंत असतात वाटते?' आत्याबाई म्हणाली.
'पैशाने नसले तरी मनाने असतात. जा बाळ तुझे नाव काय?' 'मिरी.
'छान आहे नाव.'
'तुमचे नाव काय?'
'माझे नाव कृपाराम '
'मोठे आहे नाव, नाही? माझे लहानसे आहे- मिरी.'
'बोलत नको बसूस, जा लवकर. दूध घेऊन ये. उशीर लावलास तर
बघ.'
'जा मिरे, उद्या मी तुला एक गंमत आणून देईन हं!'
'कृपाराम खांद्यावर शिडी नि हातात कंदील घेऊन गेला. आत्याबाई घरात गेली. मिरी पुन्हा दूध आणायला गेली. दूध घेऊन ती लवकर आली. खानावळ गजबजली होती. ती लहानशी जागा सारी भरून गेली होती. '
'काय मिरे, आज दूध सांडलेस ना?' एकाने विचारले. 'आत्याबाईने मारले की नाही?' दुसऱ्याने प्रश्न केला. 'आत्याबाई मारते; परंतु खायलाही देते. कोण घालील खायला दुसरे ?
आई ना बाप. मी म्हणून तिला पोसते.' आत्याबाई गरजली. मिरी काहीच बोलली नाही. ती काम करीत होती. चटणी वगैरे वाढीत होती. पाणी देत होती. मध्येच आत्याबाई चकरा घालीतच होत्या. सारे जेवेन गेले. मिरीचेही आता पान वाढण्यात आले. दोन घास खाऊन ती उठली. ती वर गेली. त्या खिडकीजवळ आपले अंथरूण घालून ती बसली. रस्त्यातील त्या कंदिलाकडे ती पाहात होती. आकाशातील तेजस्वी ताऱ्यांकडे ती पाहात होती. एक तारा तिला फार आवडे. शेवटी ती झोपली.
दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळ केव्हा होईल, याची ती वाटच पाहात होती. तो दिवे लावणारा तिला काही तरी जम्मत आणून देणार होता. मिरी तर्क करीत होती. 'काय बरे तो आणील ? खाऊ आणील का? का एखादे खेळणे? का चित्रांचे पुस्तक ? परंतु वाचता कुठे येत आहे मला? काय बरे तो आणील ? कृपाराम. केवढे नाव! का मला ते नवीन पोलके आणतील, का सुंदर चपला आणतील ते? काय बरे असेल ती जंमत?' ती विचार करीत होती.
दिवस गेला. आज मिरी लवकर दूध आणायला गेली. तिने दूध आणून ठेवले. आणि ती पुन्हा रस्त्यावर येऊन त्या दिव्याच्या खांबाजवळ येऊन उभी राहिली. केव्हा येणार तो शिडीवाला, तो दिवे लावणारा? अरे! आला. तो पहा. तो पलीकडचा दिवा त्याने लावला. आता तो सरळ येथेच येणार. मिरीने टाळी वाजवली.
'गंमत आणलीत का?' तिने विचारले.
'दिवा लावून मग देतो हं.' तो म्हणाला.
कृपारामाने खांबाला शिडी लावली. तो वर चढला. मिरी सारे उत्सुकतेने बघत होती. दिवा लावला गेला. मिरीने नमस्कार केला. कृपाराम खाली उतरला.
'मिरे, नमस्कार केलास ?'
'दिवा देखून नमस्कार, असे नाही का म्हणत?"
'तुला कोणी शिकविले?'
'शेजारच्या मुलींना त्यांची आई शिकविते, शिकविणार? परंतु ती जंमत कुठे आहे? द्या ना.'
'कृपारामने आपले खिशातून काही तरी काढले. काय होते ते?' 'अय्या! माऊचे पिलू. हे काय आणलेत? कसे आहे छान!'
'घे' तुला, त्याला कुशीत निजव. तुला ऊब मिळेल.'
'परंतु आत्याबाई मारील त्याला.' 'त्याला लपवून ठेव.'
'कोठे लपवू ? ते लपून का राहील? आणि त्याला दूध कोठले घालू ? असू दे, पण मला आवडले आहे हे माऊचे पिलू. कसे छान आहे ! घुरघुर करते आहे बघा. नेऊ मी?'
'ने, उद्या भेटशील ना?'
'हो. मी तर तुम्हाला रोज बघत असते. तुमचेच माझ्याकडे लक्ष नसते.
तुमचे आपले दिवे लावण्याकडे लक्ष.'
'आता तुझ्याकडेही माझे लक्ष राहील. '
तो दिवे लावणारा गेला. माऊचे पिल्लू हातात घेऊन मिरी गुपचूप वर गेली. तिने आपल्या अंथरूणात ते ठेवले. खानावळ गजबजली, कोणी पानात भात टाकला होता. मिरीने पान उचलताना तो भात पटकन् एका वाटीत घातला. तो दहीभात होता. तिने वरती माऊच्या पिलाला तो नेऊन दिला. पुन्हा ती खाली आली. तिने सारे काम केले. माऊची वाटीही तिने विसळली. सारे काम झाल्यावर जेवून ती खिडकीजवळच्या आपल्या अंथरूणात येऊन बसली. पिलू तिने जवळ घेतले.
'कुठे आहे तुझी आई ? माझी आई नाही. तुझी आई नाही. आपण सारखी आहोत. नीज हो माझ्याजवळ.' त्या पिल्लाला जवळ घेऊन ती निजली.
दुसऱ्या दिवशी ते पिलू घरात हिंडू लागले. आत्याबाई ओरडली. 'कोठून आले हे पिलू?' तिने विचारले. मिरी बोलली नाहीं. परंतु सायंकाळी निराळाच प्रकार झाला. मिरीने लवकर दूध आणले होते. ते पिलू कोठे तरी 'म्यांव' करीत होते. आत्याबाईच्या पायात ते आले नि आत्याबाई पडल्या. त्या संतापल्या. त्यांनी ते पिलू संतापाने उचलले!
'तुला पिले हवीत घरात? फेकून देते बाहेर.' असे म्हणून आत्याबाईने ते फेकले. परंतु ते कोठे पडले? बाहेर पाण्याचे आधण होते. त्यात कपडे भिजत होते. उकळत होते पाणी ते. पिलू त्या उकळत्या पाण्यात पडले. ते केविलवाणे ओरडले. क्षणभर धडपडले. अरेरे! कोवळे पिलू. ते मेले! मिरी
दुःख आणि संतापाने वेडी झाली. 'भाजलेस माझ्या पिलाला' असे म्हणून तिने तेथले लाकूड उचलून त्या आत्याबाईच्या अंगावर फेकले. आत्याबाईला ते चाटून गेले. मग काय विचारता! आत्याबाई खवळली. तिने मिरीला मार मार मारले.
'हो चालती घरातून. जा वाटेल तेथे. मसणात जा. खबरदार या घरात पाऊल ठेवशील तर! निघतेस की नाही? तोंड नको पुन्हा दाखवू. माजोरी कार्टी! सहन किती करायचे? नीघ. अशी तुला फरफटीत नेईन नाही तर.' असे ओरडत ओरडत आत्याबाईने तिला मारीत मारीत घराबाहेर घालवले. मिरी रडत तेथे बाहेर उभी होती.
कृपाराम गेला का दिवे लावून? नाही. हा दिवा अजून लागला नाही.
विसरला की काय? परंतु तो पाहा आला. शिडी घेऊन, हातात कंदील घेऊन तो आला. त्याने दिवा लावला. त्याचे मिरीकडे लक्ष नव्हते. तो जाणार इतक्यात त्याच्या पाठोपाठ ती धावत आली. ती ओक्साबोक्शी 'काय झाले बाळ?' लागली. रडू 'आत्याबाईने पिलाला मारले. तिने त्याला उकळत्या पाण्यात टाकले आणि मलाही मारले नि घराबाहेर हाकलून दिले. ती आता मला घरात घेणार नाही.'
'तू काय केलेस?"
'मला राग आला होता. मी लाकूड फेकून तिला मारले. आत्याबाईला जरासेच लागले. परंतु मला तिने किती मारले! दुष्ट आहे आत्याबाई. ' 'परंतु तू कुठे जाणार बाळ? आत्याबाईकडेच परत जा. मी तिची समजूत घालतो. चल.'
'नको. खरेच नको. ती मला मारील, आधी ती मला घरात घेणारच नाही.
तिने मला फरफटत येथवर आणले. '
'तू कुठे जाशील मग रात्रीची? तूला दुसरे कोणी नाही?'
'कोणी नाही.'
"मग तू रात्री आता कुठे जाणार?'
'मी तुमच्याकडे येते. मला तुमच्याकडे न्या.'
'मिरे, मी एकटा आहे. तुझे सारे कोण करील?'
'तुम्ही करा. मी तुमची होईन. कुठे जाऊ मी? कोण आहे मला? आई नाही. बाप नाही, भाऊ नाही. तुम्ही माझे व्हा. मी रोज तुमच्याकडे बघत असे. तुम्ही लोकांसाठी दिवे लावता. किती छान तुम्ही? नेता ना मला?'
'मिरे, काय सांगू? खरेच का माझ्याकडे येणार?'
'हो, खरेच. '
'मी गरीब आहे, मिरे.'
'मी काम करीन. तुम्ही सांगाल ते करीन.' 'चल तर माझ्याबरोबर. देव मार्ग दाखवील. '
तो तिला घेऊन घरी आला. ती गरीब लोकांची वस्ती होती. तेथे कृपारामाची लहानशी खोली होती. खाली शिडी अडकवून ती दोघे खोलीत आली. त्याने दिवा लावला. 'बस मिरे. तू जेवशील ना थोडे ?'
'मला भूक नाही. मला निजू दे.'
'थोडे दूध तरी घे. तशी नको निजूस. मी तापवतो.' त्याने कागद पेटवून त्यावर दूध तापवले. त्याने मिरीला दिले. तेथे एक खाट होती. त्याने तिच्यावरचे अंथरूण साफसूफ केले.
'मिरे, नीज त्या अंथरूणावर.'
‘आणि तुम्ही?”
'मी या आरामखुर्चीवर निजेन."
'तुम्ही माझ्याजवळ नाही निजणार? मला कुशीत घेऊन निजा. रात्री मला भीती वाटेल. आजचा दिवस तरी तुम्ही माझ्याजवळ झोपा. मी लोळत नाही. मला थोपटा.'
त्याने मिरीला निजविले. तिच्या केसांवरून त्याने हात फिरविला. तिचे तोंड त्याने कुरवाळले. तिला प्रेमाने तो थोपटीत बसला. 'नीज हो मिरे, भिऊ नकोस. मी आहे जवळ.' मिरीने डोळे मिटले. परंतु डोळे उघडून तिने पुन्हा पाहिले. कृपाराम जवळ
होते.
'तुम्ही निजा ना. आणि मी तुम्हाला हाक काय मारू?'
'काय बरे हाक मारशील?'
'कृपाकाका अशी हाक मारू?'
'हं चालेल. आता नीज '
आणि मिरी निजली. कृपाराम विचार करीत होता. त्याला झोप येईना. तो आरामखुर्चीवर पडला. खिडकीतून त्याला आकाशातले तारे दिसत होते. आणि मिरी इकडे झोपेत बोलत होती, बडबडत होती.
‘आत्याबाईकडे नका हो पाठवू मला परत. मी तुमची आहे. तुम्ही माझे. होय ना? ठेवा हं तुमच्याजवळ ! कृपाकाका, मला दूर नका हो करू........
मिरीचे ते शब्द कृपाराम ऐकत होता. ती लहान निराधार मुलगी. तिच्या आत्म्याचे ते विश्वासपूर्ण शब्द होते. कृपारामवर त्या अगतिक मुलीने संपूर्ण विश्वास ठेवला होता. ‘कृपाराम ! तू काय करणार? तू एकटा आहेस. तू गरीब आहेस, परंतु तुझ्या जीवनातही वात्सल्याचा हा नवा आनंद नाही का येणार? तुला पाहून मिरी हसेल, तुला ती बिलगेल; उद्या तू म्हातारा झालास म्हणजे मिरी तुला आधार देईल. ती तुझी सेवा करील. मिरी तुला जड जाणार नाही. ती बंधन वाटली तरी प्रेमाचे बंधन आहे हे. काय ठरवलेस? कसला विचार करतोस? इतके जड काय आहे त्यात? आपले स्वातंत्र्य जाईल असे का तुला वाटते? असला स्वार्थी विचार करू नकोस. स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदीपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे कर्तव्य करणे. '
'खरेच, नका हो मला दूर करू, दुष्ट आहे माझी आत्याबाई मला मारते
ती. मी तुमच्याजवळ राहीन. खरेच कृपाकाका.'
पुन्हा ती बोलली. कृपाराम आरामखुर्चीतून उठला. तो मिरीजवळ बसला. मिरीच्या अंगात ताप होता. ती तापात का बोलत होती? तिच्या आत्म्याला का श्रध्देचा विश्वासाचा शब्द उत्तर म्हणून हवा होता?
कृपारामाच्या डोळ्यांत अश्रू चमकले. त्याने मिरीचा मुका घेतला. तिच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला.
"बाळ, मी तुला अंतर देणार नाही. माझी हो तू. माझ्याजवळ तू रहा. देव तुला सुखी करो!"