सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची परीक्षाही झाली होती. शाळेतील शेवटची परीक्षा. सुमित्राताईंना ती विविध मासिके, सुंदर पुस्तके वाचून दाखवी. त्यांचा हात धरून फिरायला नेई. कधीकधी गाडीतूनही त्यांना हिंडायला नेई. मिरी बैलांना हाकी. घरचीच गाडी होती. बैलांना मिरी भीत नसे. ती त्यांना सोडी, जोडी, बांधी, मिराला सारे येई. जणू शेतकऱ्याची मुलगी वाटे ती. एकदा बैलगाडीतून ती अशीच सुमित्राताईंना घेऊन गेली. बरीच दूर गेली होती. बैलांच्या गळ्यांतील घंटा वाजत होत्या, वारा सुरेख येत होता. मिरी गाणे म्हणत होती. तो रस्त्यावर तेथे कोणी तरी बसलेल दिसले. कोण होते ते? एक लट्ठ अशी बाई होती. मिरीने तिला ओळखले. रस्त्यात घसरून पडलेली तीच ती बाई. मुरारीने जीला हात धरून पोचवले तीच ती बाई. ती इकडे कोठे?
'ए पोरी, परत जाताना मला ने गाडीतून. मी थकले आहे. त्या फाट्यावरच त्या गाडीवाल्याने मला उतरवले. नेशील का?
'हो नेईन.' मिरी म्हणाली.
'मिरे, आता माघारीच फिरव गाडी.' सुमित्राताई म्हणाल्या. त्या बाई गाडीत बसल्या. सुमित्राताई अंग चोरून बसल्या. जागा व्हायला हवी ना?" 'तुम्ही इकडे कुठे ?' मिरीने विचारले.
'तू मला ओळखतेस की काय?"
'हो, तुम्ही रस्त्यात एकदा पडल्यात. त्या एका तरूण मुलाने तुम्हाला हात घरून नेले. तुम्हीच ना त्या?'
'होय, तो मुलगा फार चांगला निघाला. एका व्यापाऱ्याने त्याला आफ्रिकेत पाठवले. मी माझ्या मृत्युपत्रात त्या मुलाच्या नावाने काही ठेवणार आहे. मला दुसरे आहे कोण? एकटी मी. सारे सार्वजनिक कामाला देऊन टाकणार आहे. परंतु त्या मुलाला मी विसरणार नाही.
'आणि मला नाही का काही देणार? मृत्युपत्र करताना माझीही आठवण
ठेवा.
'चावट कुठली! तू उद्या लग्र करशील, श्रीमंत नवरा मिळेल. तुला काय तोटा ? तु सुंदर आहेस. श्रीमंताची आहेस.'
‘आणि व्यापाऱ्याची ज्याच्यावर कृपा तो मुरारी का भिकारी आहे? तुमच्या पैशाची त्याला जरूरी आहे वाटते?"
'मिरी, किती बोलशील?'
‘बोलू द्या हो. हे काय? तुम्हांला दिसत नाही वाटते? तुम्हीच
कृष्णचंद्रांच्या कन्या की काय? इकडे कुठे?" ‘हवापालट करण्यासाठी येथे हल्ली राहते. आणि तुम्ही या खेडेगावात कोठे?'
'मी येथे लहानसे घर केले आहे. हल्ली या खेड्यातच राहते. शेवटचे दिवस येथे समाधानात दवडते, मधून सभा वगैरे असली तर शहरात जाते. आज बालकदिन होता म्हणून गेले होते. मुलांचे मला फार वेड. '
'तुम्ही का एकट्या आहात?”
'मी लग्र केले नाही. नको संसाराची यातायात, असे मनात ठरवले. पण घरात शून्य वाटे. मी मोठमोठ्या बाहुल्या घरात ठेवी. त्यांनाच कपडे शिवावे, त्यांना सजवावे. एकदा एक अनाथ मुलगा मी पाळला. परंतु तो वारला. त्याच्यावर मी किती प्रेम करीत असे. मी माता नसले तरी मातृप्रेम त्याला देत असे. '
'तुम्हाला वेदना अनुभवल्याशिवाय मातृप्रेमाचा आनंद उपभोगायला हवा आहे. खरा आनंद, खरे वात्सल्य तुम्हाला अनुभवता येणार नाही. इतर मातांनी प्रसुतीवेदना अनुभवाच्या मुलांना लहानेचे मोठे करावे, आणि मग ती मुले तुम्ही वाढवणार! मला हे कसेसेच वाटते. ही कमालीचा स्वार्थी दृष्टी असे मला वाटते. रागावू नका.'
'आंधळे, तू माझे रूप पाहतीस तर असे म्हणतीस ना. अशा कुरूप स्त्रीशी कोण लग्र करणार? कसा ती संसार मांडणार? उपदेश करणे सोपे आहे. थांब मी उतरतेच. '
ती लठ्ठ बाई खाली उतरली. गाडी जात होती. अंधार पडू लागला. 'मिरे, खरेच मी चूक केली. एखाद्या वेळी आपणच फार शहाणे असा माणसांना नकळत गर्व असतो. आंधळी, खरेच मी आंधळी.'
‘परंतु नकळत एक थोर विचार तुमच्या तोडून ऐकला. मला नविन दृष्टी
मिळाली. परंतु सुमित्राताई, ज्यांना एखाद्या ध्येयाशी लग्र लावायचे आहे, त्या
अविवाहित राहिल्या तर?
'मी अपवादात्मक गोष्टी सोडून द्यायला तयार आहे.'
गाड़ी अंगणात आली.
'किती उशीर, मिरे ?' कृष्णचंद्र म्हणाले. रात्री जेवणे झाली. अंगणात खाटा टाकून सारी बसली होती. दूर ओरडत होते. मिरी त्यांना बेडावीत होती. कोल्हे
'मिरे, आता तू लहान का आहेस?' कृष्णचंद्र म्हणाले. ‘मी का फार मोठी आहे ?' ती हसून म्हणाली.
‘सुमित्रा, माझ्या मनात एक विचार आला आहे. आपण दूरचे सुखपर्यटन करून येऊ. लंकेत जाऊ. लंका फार सुंदर आहे. हिंदुस्थानच्या चरणाशी बसलेली सोन्याची लंका. सुंदर समुद्र, सुंदर निसर्ग. नारळांची बने. रमणीय डोंगर. निसर्गाची संपत्ती तिकडे उधळलेली आहे. निसर्गाच्या सौंदर्याचे सोने सर्वत्र आहे. जायचे का ?'
'जाऊ; परंतु मिरी बरोबर हवी. '
'ती येईलच. तुला सोडून ती कशी राहील? मी तिला येऊ नको म्हटले तर ती आधी निघेल. खरे ना मिरे?' 'हो.'
आणि खरोखरच प्रवासाची तयारी होऊ लागली. एके दिवशी मिरी यशोदाआईना भेटायला गेली. बरेच दिवसात ती गेली नव्हती. मुरारीचे पत्रही बरेच दिवसात आले नव्हते मुरारीच्या घरी चिंता होती. त्याचे आजोबा जरा वेडसर झाले होते. यशोदा आईही कृश झाल्या होत्या.
‘मिरे, बरी आहेस ना? सुमित्राताई बन्या आहेत? मुरारीचे पत्र नाही ना? किती लांब गेला!'
'येईल पत्र. काळजी नका करू. तुम्हाला बरे का नाही वाटत? तुम्ही वाळल्यात.
'मिरे, हल्ली मुरारीचे आजोबा कसे तरी वागतात. एखाद्या वेळी घराबाहेर पडतात. कोठे लांब जाऊन बसतात. घरी येत नाहीत. मी शोधायला जाते. कसे तरी करून त्यांना घरी आणते. वाटेतच हट्ट धरून राहातात. लोक हसतात. घरी नीट खात नाहीत. रात्री अंथरूणात बसूनच राहातात. कसे करू मी?'
'तुमच्याकडे मी येऊन राहू का?'
'परंतु सुमित्राबाईंची सेवा कोण करील? ती एक देवता आहे. त्यांचे
सुखदुःख तूच ओळखशील. तेथेच राहा.'
'येथल्या शाळेत कदाचित् मला नोकरी मिळणार आहे. तसे झाले तर मला येथे यावेच लागेल. आणि कोठे दुसरीकडे बिऱ्हाड करण्यापेक्षा तुमच्याकडेच राहीन. एकटी कोठे राहू? मला तुमचा आधार होईल.
'तसे असेल तर ये राहायला. तू का मला परकी आहेस? जसा मुरारी, तशी तू मनात किती मनोरथ आहेत ? आज कशाला बोलून दाखवू मिरे? तू सुखी हो.'
'मी जाते हां आज !'
असे म्हणून मिरी गेली आणि खरेच ती एका शिक्षणसंस्थेत गेली. त्या संस्थेच्या चालकांना भेटली. त्यांना एका स्त्री शिक्षीकेची जरुरीच होती. बोलणे झाले.
'तुम्ही अर्ज करा. लगेच तुम्हाला घेऊ.' चालक म्हणाले.
'मी आभारी आहे.' मिरी म्हणाली. नमस्कार करून, काही सामान घेऊन गाडीतून ती परत निघाली. नाना प्रकारचे विचार करीत ती जात होती. लंकेला जाण्याचे तिला रहित करावे लागणार होते. सुमित्राताईबरोबर मग कोण जाणार? कृष्णचंद्र काय म्हणतील? मी कृतघ्न आहे असे त्यांना वाटेल का? अनेक विचार मनात यात होते. शेवटी गाडी घरी आली. मिरी फारसे बोलली
नाही. कृष्णचंद्र कोठे बाहेर गेले होते. 'मिरे, आज तुझी गोड गुणगुण ऐकू येत नाही ती ? यशोदाआईकडे सारे क्षेम आहे ना? मुरारीचे पत्र आले का?"
'यशोदाआई काळजीत आहेत. मुरारीच्या आजोबांचे लक्षण नीट नाही. ते भ्रमीष्टासारखे वागतात. यशोदाआईंना कुणाची तरी मदत हवी. मी त्यांच्याकडे जायचे ठरवीत आहे. एका शाळेत मला नोकरी मिळत आहे. ती नोकरी करीन. यशोदाआईंकडे राहीन.'
'नोकरी कशाला करतेस?
'म्हणजे यशोदाआईंना भार वाटणार नाही. मी त्यांना म्हटले की मला नोकरी मिळत आहे. कोठे तरी राहायचे तर तुमच्याकडे राहीन. त्यांना ते बरे वाटले. सुमित्राताई, जाऊ का मी? तुम्ही मार्ग दाखवा आपण लंकेला जायची तयारी केली आहे. बाबा काय म्हणतील? ते रागावतील. मी बरोबर नसेन तर तुमचे कसे होईल ? गडीमाणसे बरोबर घेतली तरी तुमचे सुखदुःख त्यांना तुम्ही थोडेच सांगाल? मी तुमचा स्वभाव जाणते. तुम्हा मला कृतघ्न म्हणाल का? काय करू मी? परंतु मुरारी जाताना मला म्हणाला, 'मिरे, आजोबांची, आईची काळजी घे. तुझ्यावर विश्वासून मी जात आहे.' सुमित्राताई, कृपाकाकांनी मला आधार दिला. यशोदाआई, मुरारी यांनीही किती प्रेम दिले! माझ्या आजारीपणात कृपाकाकांना त्यांची मदत होई. अनेकांच्या प्रेमावर मिरीची जीवनवेल पोसली आहे. काय करू सांगा.'
'मिरे, बाबांना वाईट वाटेल. त्यांच्या इच्छेविरूध्द झालेले त्यांना खपत नसते. ऐरवी ते प्रेमळ आहेत. परंतु रागावले तर जमदग्नी होतात. आणि माझ्या सुखाच्या आड कोणी आले तर ते त्याला खाऊ की गिळू करतील. परंतु मी त्यांची समजूत घालीन. तू जा. मी आजपर्यंत तुला कर्तव्याचे घडे शिकवीत आले. आज मी स्वार्थी का होऊ? माझ्या आसक्तीत तुला गुंतवू! मला बरे वाटत आहे. तू जा. मुरारीच्या घरी जा. जेथे अधिक जरूरी तेथे आधी गेले पाहिजे. मिरे वाईट वाटून नको घेऊस. आनंदाने तुला सांगत आहे.'
इतक्यात कृष्णचंद्र बाहेर गेले होते ते आले. ते म्हणाले. ‘काय सांगत आहेस? प्रवासेची सुखस्वप्ने, होय ना? सीतेचे अशोकवन
बघायला चला. सुंदर लंका बघायला चला. भारतमातेच्या पायांवर मोत्यांच्या राशी भक्तीप्रेमाने ओतणारा कन्याकुमारीजवळचा तो गंभीर समुद्र बघायला चला. सिलोनचे सुंदर द्वीपकल्प म्हणजे भारतमातेच्या पायांशी बसलेले गोड लहान बाळ असे मला वाटत असते. जायचे ना मिरे ? सुमित्रा आंधळी नसती, तर तिने रमणीय स्थळांचे फोटोही काढले असते. मिरे तू का नाही शिकत फोटोग्राफी ?'
'मुरारी आला की शिकवील. तो आफ्रिकेत शिकला आहे. तो चित्रेही सुंदर काढतो. मुरारी कलावान आहे.'
'आणि मिरी ?'
‘मिरी मोलकरीण आहे. बाबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.'
'कोणती?'
'मी लंकेच्या प्रवासाला येऊ शकत नाही.'
‘म्हणजे, थट्टा करतेस की काय?'
'थट्टा नाही. गंभीरपणानेच मी सांगत आहे. मुरारीच्या घरी राहायला मी जाणार आहे. त्याच्या आजोबांचे लक्षण ठीक नाही. यशोदाबाई सचिंत आहेत. माझी त्यांना जरुरी आहे. मुरारीला मी वचन दिले आहे की, मी त्यांची काळजी घेईन. तो सातासमद्रांपलीकडे. येथे मीच त्यांना आहे. मला जाऊ द्या. क्षमा करा. माझे कर्तव्य मला बोलवीत आहे.
'तू नाही येणार आमच्याबरोबर?'
"नाही. येऊ शकत नाही. '
'तू आलेच पाहिजेस.'
'बाबा, मिरीला जाऊ दे. ते तिचे पहिले कर्तव्य आहे.'
'आणि तुझ्याबरोबर येणे का कर्तव्य नाही? आपण किती हिचे केले ? हिला शिकवले. हिच्यासाठी खर्च करायला कधी कमी केले नाही. पैशांकडे पाहिले नाही.
'परंतु ती मंडळी तिच्या जीवनात पहिल्यापासून शिरलेली आहेत. आपण केले ते कितीसे ! बाबा, पैशांचा का हिशोब करीत बसणार? इतके पैसे खर्च केले तुझ्यासाठी, असे का म्हणणार?' 'म्हणणार. त्या भिकाऱ्यानी का तिला शिक्षण दिले असते? ज्ञानाचे डोळे
दिले असते?'
'बाबा, त्या गरिबांविषयी तुम्ही अनुदार बोलू नका. ज्ञानाचा डोळा कर्तव्याचा पंथ दिसावा म्हणून असतो. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. परंतु मी त्यांची कधी गणती करीत बसत नसे. प्रेमामुळे मी तुमच्याकडे राहात असे. तुमच्या पैशांमुळे नाही.'
'वात्रटपणाने बोलू नकोस. पैशांशिवाय जगात काही चालत नाही. तो भिकारडा मुरारी. आफ्रिकेतून तुला त्याने काय पाठवले? पाठवले पैसे?' 'मी पैशाची पूजा करणार नाही?'
'तू कृतघ्न आहेस. तुला घरातल्याप्रमाणे वागवले. तुला शिक्षण दिले. त्या शिक्षणाच्या जोरावरच आज जात आहेस. म्हणे नोकरी करीन. शिक्षण दिले म्हणून ना?'
'बाबा, आपण तिला शिक्षण दिले त्या यासाठीच ना की, तिने स्वावलंबी व्हावे? ती दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून राहावी असे का तुम्हाला वाटते?'
'तुम्ही काही कोणी बोलू नका. जग कृतघ्न आहे.' असे म्हणून कृष्णचंद्र गेले. कशीबशी जेवणे झाली. अंगणात खाटेवर सारी पुन्हा बसली. वरती तारे चमचम करीत होते. जवळ गोठ्यात गाय शांतपणे रवंथ करीत होती. वासरू पाय जवळ घेऊन झोपले होते
'बाबा, वर्तमानपत्रे दाखवू वाचून?'
'मी वाचीन. तू नको वाचून दाखवायला. तू जा. चालती हो बघू कशी एकटी राहतेस ते. माझ्याशिवाय तुला कोणाचा आधार आहे? तो भिकारडा मुरारी. त्याचा आधार ? तो कशाला इकडे येतो राहील तिकडेच. बनेल साहेब, करील लग्र, मांडील संसार. येथे राहा वा जा. माझ्याशी पुन्हा बोलू नकोस. कशी एकटी राहतेस बघू. '
'बाबा, तुमच्या आजपर्यंतच्या आधाराबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. परंतु त्या आधाराने तुम्ही मला पंगू बनवू पाहात असाल, मिंधी बनवू पाहात असाल तर त्या आधारापासून दूर राहायला मला शिकू द्या. त्या विश्वंभराचा आधार सर्वांना आहे. लहान किड्यामुंग्यांनाही जो आधार देतो, तो मला देईल. तुम्ही दिलेल्या आधाराचा तुम्हांस अहंकार नको. मी निराधारही राहू शकेन. एकटी राहू शकेन. माझा मुरारी येईल. आणि समजा, तो न आला तरीही मी धैर्याने राहीन. त्याची, तुम्हा सर्वांची, कृपाकाकांची स्मृती मनात ठेवून कृतघ्न न होता मी विशाल जगात स्वावलंबनाने जगेन, सुमित्राताई, तुम्ही आशीर्वाद द्या. बाबा तुम्हीही द्या.'
'मग काय तू जाणार?' कृष्णचंद्रांनी कठोरपणाने विचारले.
‘ही गेले हे पाहिजेच. ते कर्तव्य पहिले. ते मला हाक मारीत आहे. तुमच्या सहानुभूतीचा त्याग करावा लागेल. तुमचे स्नेहप्रेम मला गमवावे लागले तरीही मी गेले पाहिजे. पहिले कर्तव्य प्रथम.
कृष्णचंद्र रागाने उठून घरात गेले. सुमित्रा व मिरी, दोघीजणी तेथे होत्या.
'सुमित्राताई, तुम्ही लंकेची सफर करून या. मला प्रवासपत्रे पाठवीत जा.
पाठवाल ना?'
'कोणी लिहायला भेटले तर. बाबा तर लिहिणार नाहीत. ते कोणाला तरी बरोबर घेतीलच. त्यांच्याकडून लिहवीत जाईन पत्रे. परंतु मी परस्वाधीन आहे हे तू जाणतेसच. मिरे, बाबा रागावले म्हणून वाईट नको वाटून घेऊस.
उद्या सकाळी तू जा हो बेटा.' मिरीने सुमित्राताईच्या गळ्याला मिठी मारली. तिला हुंदका आला. सुमित्राताई तिला शांत करीत होत्या.
'उगी, रडू नकोस.'
'सुमित्राताई, मी दुर्दैवीच आहे. माझ्या आईबापांनी जन्मतःच माझ्या गळ्याला नख का लावले नाही? माझ्यामुळे कुणालाच सुख नाही. तुम्हीही मला कृतघ्न म्हणाल का?'
‘मी का वेडी आहे असे म्हणायला ? मनाड वेडेवाकडे आणू नकोस. तू कर्तव्याच्या प्रकाशात पावले टाकीत जात आहेस. समाधानाने राहा. अनेकांचे अनेक स्वभाव. सर्वांनाच आपल्या वर्तनामुळे बरे वाटेल असे नाही. जगात एकाचे सुख ते पुष्कळवेळा दुसऱ्याचे दुःख ठरते. आपले वर्तन प्रभूला आवडेल की नाही एवढेच बघावे. हीच एक कसोटी आपल्या वर्तनाला लावावी नि धैर्याने या संसारात, या बहुरंगी दुनियेत वागावे.'
'तुम्ही आपल्या प्रकृतीला जपा. ' 'मी जपतच आहे. आणि तुम्ही स्वतःची हायगय करीत जाऊ नकोस.
समजलीस ना?'
शेवटी मिरीने सुमित्राबाईंना आत नेऊन अंथरूणावर निजविले.
त्यांच्याजवळ थोडा वेळ बसून तीही आपल्या अंथरुणावर पडली.
सकाळ झाली. सारी ऊठली. मिरीने फुलांचा गुच्छ सुमित्राताईंच्या खोलीत ठेवला. तिने आपले सामान बांधले. कृपाकाकांचा तो कंदील वगैरे येथे आणलेले नव्हतेच. ते तिकडे शहरातल्या बंगल्यातच होते. तिने सर्वांचा निरोप घेतला. सुमित्राताईंच्या व कृष्णचंद्रांच्या ती पाया पडली. स्वयंपाकीणबाईंनाही तिने प्रणाम केला. अलिकडे त्या आजीबाईंचेही प्रेम तिने मिळविले होते आणि शेवटी इतर गडीमाणसांचा, मोलकरणींचा तिने प्रेमाने निरोप घेतला. त्या मोलकरणीने दोन फुले तिच्या वेणीत घातली. तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहीले.
'मिराबाई, शेवटी तू चाललीस ? तू या घराची शोभा होतीस. या घराचा तू प्राण होतीस, आत्मा होतीस. आता आमच्याशी कोण गोड बोलेल? प्रेमाने. फळाची फोड आमच्यासाठी कोण ठेवील? भांडी बरीच असली तर घासायला प्रेमाने मदत करायला कोण येईल? मिराबाई, सुखी राहा. तू देवमाणूस आहेस.' त्या मोलकरणीने तोंडातून श्रुतीस्मृती बाहेर पडत होत्या.
गडयाने गाडी जुंपली. मिरीची ट्रंक, वळकटी ठेवण्यात आली. बैल निघाले. अंगणात स्तब्धपणे कठोरपणे कृष्णचंद्र उभे होते. इतर गाडीमाणसे, मोलकरणी रस्त्यावर ‘ये हो, ये ही ' करीत प्रेमाने गेली. सुमित्राताई आपल्या खोलीतील खिडकीजवळ उभ्या होत्या. दुरून येणारा घंटांचा आवाज ऐकत होत्या.
'गेली मिरी. कर्तव्य करायला गेली. कर्तव्य कठोरच असते. कर्तव्याचा मार्ग कठीणच आहे.' असे म्हणून त्या आपल्या पलंगडीवर पडल्या.
'कृतघ्न आहे तुझी मिरी.' कृष्णचंद्र वर येऊन क्रोधाने म्हणाले. 'तिच्यासारखी गुणी मुलगी त्रिभुवनात सापडणार नाही. मिरी म्हणजे बाबा एक रत्न आहे. एक दिवस तुम्हीही माझ्या प्रमाणेच म्हणाल.