मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने त्याला भेटीला बोलावले होते. घरात तो काहीच बोलला नाही. नीटनेटका पोशाख करून तो त्या व्यापाऱ्याकडे गेला. प्रश्रोत्तरे झाली.
'पुढे-मागे परदेशात जाल का? चारपाच वर्षेसुध्दा तिकडे राहावे
लागेल.'
'मी घरी आईला विचारून कळवितो.'
'तुम्ही जावे असे मला वाटते. तुमच्याविषयी माझा फार चांगला ग्रह
झाला आहे.'
'तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला?'
'तुम्ही एका बाईला रस्त्यात मदत केली होतीत?'
'हो.'
'त्याच बाईंनी तुमचे नाव सहज सुचवले नि पत्ताही दिला.' 'मी जाऊ?'
'मग उद्यापासून कामाला याच. परदेशात जायचे की नाही ते मागावून
ठरवू.'
'येतो तर. प्रणाम.
मुरारी घरी आला. त्याने आईला सारी हकीगत सांगितली.
'आई, तुम्हाला सोडून जाणे जीवावर येते. '
'अरे, चार-पाच वर्षे हां हां म्हणता जातील. तुझ्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार नको का करायला? मी आणि नाना येथे दोघे जपून राहू. तू माझे ऐक. आलेली संधी दवडू नकोस. आधीच गरिबांना संधी मिळत नाही. खरे ना? तुझ्या गुणांमुळे तुझ्यावर तो व्यापारी प्रसन्न झाला आहे. '
'आई, पुढे-मागे त्याच्या धंद्यात तो थोडी भागीदारीसुद्धा मला देईल. अशा अर्थाचे तो थोडे काही बोलला. परंतु मी आधी काही कर्तबगारी
दाखवायला हवी.' 'त्याचे म्हणणे खरे आहे. तुझी हुशारी दिसली तर तो भागीदारी देईलही. बाळ, तू जा. आमच्या मोहात पडू नकोस.'
'आई, सेवेसाठी राहणे हा का मोह? आणि परदेशात जायचे मनात येत असले तरी ते तुझ्यासाठीच. तू माझ्यासाठीच आजपर्यंत किती कष्ट केलेस! तुला विश्रांती मिळाली नाही. नेहमी राब राब राबावे लागले.'
'मुरारी, आईला मुलासाठी कष्ट करण्यातच कठीण नाही वाटत. तू मोठा हो, चांगला हो, हीच माझी आशा. सर्वांनी तुला भले म्हणावे, तू कर्तबगारी करून पुढे यावेस असे मला वाटत असते. म्हणून बाळ, ही संधी दवडू निकोस.'
काही दिवस गेले. मुरारी त्या व्यापाऱ्याकडे नोकरी करू लागला होता. हळूहळू त्याच्यावर धन्याचा अधिकाधिक लोभ बसू लागला. परदेशात मुरारीने जावे म्हणून तो आग्रह करू लागला. एके दिवशी रात्री मिरी नि मुरारी समुद्रतीरी बसली होती. त्या वेळेस सारे शांत होते. जरा बाजूला जाऊन दोघे बसली होती. समुद्र बराच आत गेला होता.
'मिरे, मी आफ्रिकेत जायचे ठरवीत आहे. आईची चिंता वाटते. पाच वर्षेतरी मी येणार नाही. लांबचा प्रवास; एकदम थोडेच येता येणार आहे? आजोबा तर थकल्यासारखे दिसतात. परंतु तेही मला म्हणाले की, जा, आपण भेटू. मी काही मरणार नाही. तू येईपर्यंत मी जिवंत राहीन. काय करू ते सांगा.
'मुरारी, तुझ्या आईने जरी आपण होऊन तुला आग्रहपूर्वक जायला सांगितले, तरी मनात तिला दुःखच होत असेल. तू तिच्या जिवाचे जीवन आहेस. तू तिच्या जीवनाचा आधार आहेस. तिच्या साया आशाआकांक्षा तुझ्यापाशी केंद्रित झालेल्या आहेत. तिला तुझा अभिमान वाटतो. तिला तुझा विश्वास वाटतो. तू कीर्तिमान व्हावेसे, मोठे व्हावेसे असे तिला साहजिकच वाटते. आपल्या मुलाचे नाव सर्वांच्या ओठांवर नाचावे याहून मातेला दुसरा थोर आनंद कोणता आहे? परंतु तू गेलास तर ती माऊली तुझ्या वाटेकडेच डोळे लावून असणार यात शंका नाही. मी काय सांगू? मी एवढेच सांगते तुला की, तू गेलास तर तुझ्या आईची, तुझ्या आजोबांची मी शक्य ती काळजी घेईन. तुझ्या ठायी मी त्यांना होईन. नाही तरी मी का आता तुम्हांला परकी आहे? एक निराधार मुलगी होते मी. कृपाकाकांनी हे पंखहीन पिलू उचलून आणले. तू, तुझी आई, दोघांनी मला प्रेम दिले आहे. मी का ते विसरेन मुरारी? मला किती तरी वाटते तुम्हा सर्वांविषयी. ते बोलून तरी दाखवता येईल का?'
'मिरे, मी आफ्रिकेत जायला धजत आहे तो कोणाच्या जोरावर? आईला, आजोबांना मी सोडून गेलो असतो का? परंतु तू आहेस म्हणूनच मी जायचे ठरवीत आहे. मिरे, तूच नेहमी पत्र पाठवीत जा. आईला, आजोबांना लिहिता थोडेच येते? माझी आलेली पत्रे तूच त्यांना वाचून दाखवीत जा. त्यांना आनंद देत जा. त्यांचे दुखले खुपले पाहात जा. माझी सारी भिस्त तुझ्या या प्रेमळ, प्रामाणिक, टपोऱ्या डोळ्यांवर. मिरे, मी का अधिक सांगायला पाहिजे? आपण दोघे एकरूप आहोत. तू माझी नि मी तुझा. नाही का? पाच वर्षे. केवढा काळ ! परंतु हा काळ जाईल. आपण पुढे एकमेकांचे होऊ; लग्र करू; सुखाचा संसार करू; आईला, आजोबांना सुख देऊ. तू धीराने राहशील ना?' 'मुरारी, तू माझ्या हृदयात आहेस. माझ्या जीवनाचा तू धनी, तू स्वामी.
तू माझ्या जीवनाचा तू राजा, तू नाथ माझ्या त्या पहिल्या आजारीपणात तू
माझी शुश्रूषा केलीस. मला कॉफी पाजलीस. मला ते सारे आठवते. तू
लिहायला शिकवलेस; नीट वागायला शिकवलेस; देवाची भक्ती दिलीस. तू आणि सुमित्राताई यांचे किती उपकार?' 'परंतु आम्हांला तरी हा दिवा कोणी दाखवला? कृपाकाका हे आपणा सर्वांचे गुरू! त्यांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दीपस्तंभ होता.' 'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणारे कृपाकाका! परंतु सर्वांच्चा जीवनात माणुसकीचे दिवे लावणारे ते थोर सद्गुरु होते.'
'दिलमां दीवो करो' असे म्हणतात ते खरे. जीवनात प्रेमस्नेहाचा, व्यापक सहानुभूतीचा, मंगलतेचा, श्रद्धेचा, विश्वासाचा दिवा नसेल तर हे जीवन किती नीरस, भयाण वाटेल; नाही? मुरारी, कृपाकाकांचा तो कंदील माझ्या खोलीत आहे. मी तो रोज पुसून ठेवते. जणू माझ्या देवाची तीच मूर्ती.'
'मिरे, आपण आता परत जाऊ चल. भरती सुरू झाली वाटते."
'माझ्या हृदयातही प्रेमाच्या लाटा उचंबळत आहेत. '
‘माझ्याही.’
'मुरारी, परदेशात मला विसरू नकोस. या गरीब मिरीचा तूच आधार आहेस. सुमित्रादेवी आहेतच; परंतु जीवनव्यापी संपूर्ण आधार तूच आहेस.'
‘मिरे, तुझ्यावरचे प्रेम मला परदेशात तारील. मी तुला विसरेन का ? अशी
शंका तरी तुला कशी येते?'
‘तसे नाही रे मुरारी. एखाद्या वेळेस माझे सारे दुर्दैवी जीवन डोळ्यांसमोर येते नि वाटते की काही वाईट न होवो; अमंगल न होवो. मिळालेले आधार न तुटोत तू सुखी राहा तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत जाईन. इकडची काळजी करू नकोस. तू मोठा हो, कीर्तिमान हो.'
'तुझ्या नि आईच्या प्रेमाला नि विश्वासाला प्रभू पात्र करो हीच त्याला माझी प्रार्थना. दोघे परत आली. आज मिरी यशोदाआईकडेच झोपली. आणि एके दिवशी मुरारी आफ्रिकेला निघून गेला.