नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली होती. दिवसभर तो शेतात असे. जमीन फार सुपीक होती. तिच्यात सोने पिकले असते. नागानंदाने बांधाच्या काठाने फुलझाडे लाविली होती. भाजीपाल्याचा मळा केला होता. बाजूला गाईचा गोठा होता. त्या गाईची तो स्वतः काळजी घेई. फुलांच्या माळा करून गाईच्या गळ्यात घाली. गोपाळकृष्णाच्या अनेक हृदयंगम कथा त्याने ऐकल्या होत्या. तो गाई कशा चारी, पावा कसा वाजवी, एकत्र काला कसा करी, सारे त्याने ऐकले होते. तोही सायंकाळ होत आली म्हणजे बासरी वाजवी. गाई परत येत. एखादे वेळेस गाई लवकर नाही आल्या तर तो बासरी वाजवीत हिंडे. कधीकधी एखाद्या झाडाखाली बसून अशी गोड बासरी वाजवी की सारी सृष्टी मोहून जाई.
वत्सलेच्या घरापासून शेत जरा लांब होते. नागानंद सकाळी उठून फुले व भाजीपाला वत्सलेच्या घरी नेऊन देई. दूध नेऊन देई. परंतु एके दिवशी उजाडले नाही तोच वत्सला शेतावर आली. आश्विन महिन्याचे दिवस होते. उंच गवत वाढलेले होते. दंव पडून ते ओलेचिंब झालेले होते. त्या ओल्या गवतातून ती आली. नागानंद गाईचे दूध काढीत होता. तो वत्सला समोर उभी. गाय वासराला चाटीत होती.
“सारे नका दूध काढू. वत्सला ठेवा.” ती म्हणाला.
" वत्सलेलाच वत्साची काळजी वाटणार." तो म्हणाला.
“तुम्हाला नाही वाटत असे नाही काही माझे म्हणणे.” ती म्हणाली.
“वत्सले, मी दोन सड वत्साला ठेवतो. दोहोंचेच दूध काढतो.” तो म्हणाला.
वत्सलेने हिरवा हिरवा बांधावरचा चारा आणला व गाईच्या तोंडात दिला. गायीने आनंदाने घेतला. ती गायीच्या मानेखालून हात घाली. गाय मान वरवर करी.
“ गुरांनासुद्धा प्रेमळ माणूस हवे. " नागानंद म्हणाला.
" परंतु माणसांना नको.” वत्सला म्हणाली.
“ तुम्ही आज उजाडत कशाला आलात? सारे लुगडे तुमचे भिजून गेले असेल. गवताची खाज लागली असेल. मी तुमच्याकडे रोज सकाळी येतो तो गवताने पाय कसे ओले होऊन जातात. ते गवत का रडत असते? आता लवकरच आम्हाला कापतील अशी का त्याला चिंता वाटते? म्हणून का ते अपार अश्रू? ते सारे गवत एकमेकांच्या अंगावर पडून मुक्याने रडत असते. रोज तुमच्याकडे येताना ते गवत, ते रडणारे गवत, माझ्या चरणांवर मान टाकून पडते. परंतु ते तुडवून मला यावे लागते.” तो म्हणाला.
“तुमच्या पाया पडणाऱ्यांना तुम्ही तुडवणार का? त्यांना रडवणार का? नाग का निष्ठुर असतात?” तिने त्याच्याकडे पाहून विचारले. “पण आज उजाडत का आलात?” त्याने विचारले.
“शेताचे सौंदर्य पाहावयास आले. सूर्याची उगवती शोभा पाहावयास आले. आश्रमात असताना मी लवकर उठत असे. दवबिंदूंचे हार घालून येणाऱ्या उषादेवीला उचंबळून येऊन बघत असे. परंतु घरी आल्यापासून अंथरुणातच लोळत पडलेली असते. आज आळस फेकून दिला. प्रभातकाळचा वारा नवनजीवन देत होता. मला तरतरी वाटली. उत्साह वाटला. वाटे रोज उठावे व येथे यावे. तुम्ही तिकडे दूध फुले भाजी घेऊन येण्यापेक्षा मीच नेत जाईन. मलाही काही काम करू दे. तुम्ही फुलांची परडी भरून ठेवीत जा. दुधाचे भांडे भरून ठेवीत जा. मी नेईन. तुमच्या हातची फुले, ती मी घेऊन जाईन. माझ्या केसांत घालीन. तुम्ही येथे गाईच्या गळ्यातही माळा घालता. वत्सलेच्या गळ्याची का नाही तुम्हाला आठवण येत? माझा गळा का वाईट आहे? हा पहा कसा शंखासारखा शुभ्र आहे! माझ्या गळ्यात घाला ना माळा! कोण घालणार माझ्या गळ्यात माळ? तुमच्या गळ्यात घालण्यासाठी त्या दिवशी मी हार केला होता. परंतु तुम्ही न सांगता निघून गेला होतात. तो हार मी खुंटीवर ठेवून दिला. तुमच्यासाठी केलेला पहिला हार! हृदयाची सारी कोमलता व मधुरता ओतून गुंफलेला हार ! तो वाळून गेला, सुकून गेला. नंतर मी रोज हार करीत असे व कपोताक्षीच्या हाती देत असे. ही नदी कपोताक्षी तुम्हाला ते हार कोठेतरी देईल असे मनात येई.” वत्सला थांबली. तिला बोलवेना.
“कपोताक्षीच्या प्रवाहात एके दिवशी मी डुंबत होतो. तो आले खरे हार. सरिन्मातेच्या प्रेमात डुंबत होतो. मी उताणा पोहत होतो. वरून सूर्याचे किरण मुखावर नाचत होते. खालून लाटा मला नाचवीत होत्या. तो एकदम डोक्यावरच्या केसात काही गुंतले असे वाटले. साप की काय असे वाटले! नागपूजक असलो तरीही भीती वाटली. श्रद्धा कोठे आहे? मी एकदम उपडा झालो. घाबरलो. डोक्यावरून हात फिरवला. तो साप नाही काही नाही.
फुलांचा सुंदर हार होता. माझ्यासाठी सापाचा का हार झाला, असे मनात आले. मी तो हार घेऊन कपोताक्षीच्या प्रवाहातून बाहेर आलो. तो हार हुंगला. हृदयाशी धरला. तो हार हृदयाशी धरून मी किती वेळ उभा असेन ते देवाला माहीत!" नागानंदाने ती आठवण सांगितली.
दोघे काही बोलत ना. शांत होती. भरलेली होती. “वत्सले, ताजे दूध
घेतेस? गाईचे धारोष्ण दूध?” त्याने विचारले. “मागे कार्तिकाने मधाचा घट आणला. तुम्ही दुधाचे भांडे द्या. या वत्सलेला नकोत हे रस. ह्यांनी मला नाही तहानभूक. वत्सला निराळ्या रसाला आसावली आहे." तो म्हणाला.
“हा बघ केळीच्या पानांचा द्रोण करून आणला आहे. घे दूध. नाही म्हणू नको. ती गाय रागावेल. दुधाला नाही म्हणू नये." तो म्हणाला. “तुम्हीही माझ्याबरोबर घ्याल?" तिने विचारले.
“हो घेईन. नागाला दुधासारखे दुसरे कोणतेच पेय प्रिय नाही. कधी कधी मला वाटते, गाईच्या वत्सासारखे व्हावे व दूध प्यावे. दूध प्यावे व मस्त राहावे. त्या दिवशी सुश्रुता आई मला म्हणाल्या, “पीत जा भरपूर दूध. उरेल आणीत जा." लहानपणी आईचे दूध, मोठेपणी गोमातेचे दूध ! नागदेवाला आम्ही दुधाचाच नैवेद्य दाखवतो.” तो म्हणाला.
“दूध पिऊन विष तयार करतात ना?" वत्सला म्हणाली. “ परंतु खरा जातिवंत नाग त्या विषाचा क्वचितच उपयोगी करतो. खरा नाग संन्यासी आहे, तपस्वी आहे. किती स्वच्छ, किती सोज्ज्वळ, किती निर्मळ! त्याला इवलीही घाण सहन होत नाही. शरीर जर अमंगळ असे वाटले तर तो ते काढून फेकून देतो. त्या वेळेस त्याला किती वेदना होतात! परंतु नवीन सुंदर तेजस्वी शरीर मिळावे म्हणून तो त्या अपार यातना सहन करतो. वेदनांशिवाय काहीएक सुंदर मिळत नाही. वेदनांतून सौंदर्य, वेदनांतून मोक्ष, वेदनांतून वेद ! वेदनांतून सारे बाहेर पडते. बीजाला वेदना होतात, त्याचे शरीर फाटते व त्यातून सुकुमार अंकुर बाहेर पडतो. मातेला वेदना होतात व सुंदर बाळ मांडीवर शोभते. रात्रीला वेदना होतात व अनंत तारे दिसतात. उषा वेदनाग्नीने लाल होते, भाजून निघते. तिच्या डोळ्यांतून पाणी घळघळते. परंतु तेजस्वी बालसूर्य बाहे बाहेर पडतो. कवीला कळा लागतात व अपौरुषेय वेद बाहेर पडतात, एखाद्या रमणीला दुःख होते व डोळ्यातून सुंदर मोती घळघळतात! ज्यामुळे सारी सृष्टी कारुण्यमयी होते, त्या अश्रूंतून प्रेमाची कळी फुलते! शेतकऱ्याला कष्ट होतात. घामाने तो भिजतो. परंतु पृथ्वी सस्यश्यामल सुंदर अशी दिसते! वेदनांतून नवनिर्मिती होत असते." नागानंद थांबला.
“चालू दे नागपुराण, वेदनापुराण!” ती म्हणाली.
“वत्सले, खरोखरचनागपुराण गात राहावे असे मला वाटते. अगं, तो नाग वारा खाऊन राहतो व सर्वांपासून दूर असतो. चंदनाचा सुगंध, फुलांचा परिमल, गोड मधुर असे संगीत, यांचा तो भोक्ता आहे. जे सुंदर व मंगल, जे सुगंधी व निर्मळ, त्याच्याशीच तो जाईल, तेथे आपली स्वाभिमानी फणा लववील. होता होईतो नाग संतापत नाही. परंतु संतापलाच तर एका दंशाने काम करतो. ते त्याचे विष म्हणजे त्याचे सामर्थ्य! ते तो वारेमाप उधळीत नाही. अत्यंत आणीबाणीच्या वेळेशिवाय तो दंश करीत नाही. त्याच्याजवळ संयम आहे म्हणूनच निश्चित व अमोघ असे सामर्थ्यही त्याच्याजवळ आहे.” नागानंद नागस्तुती करीत होता.
“दूध ना देता?" तिने विचारले.
“हो. हा घ्या द्रोण. कसे आहे फेसाळ दूध?" तो म्हणाला.
ती दूध प्यायली. तोही प्यायला वत्सला त्याच्या झोपडीत पाहू लागली. झोपडीत फारसे सामान नव्हते. दोन घोंगड्या होत्या. गवताच्या विणलेल्या चटया होत्या. तेथे एक सुंदर बासरी होती.
"तुम्हाला येते का वाजवायला?” तिने विचारले.
"हो." तो म्हणाला.
"कोणी शिकविले?" तिने विचारले.
“वाऱ्याने व नदीने; झाडांच्या पानांनी, पाखरांच्या कलरवांनी. सृष्टी
माझा गुरू. " तो म्हणाला.
“मला ऐकवता वेणुध्वनी?" तिने गोड शब्दांत विचारले.
“तुमचे बोलणे म्हणजेच वेणुघ्नी. किती गोड तुमचे बोलणे ! ओठांच्या
मुरलीतून हृदयाचे संगीत बाहेर पडते. हे खरे वेणुवादन!" तो म्हणाला.
“नागमोडी बोलणे मला नको. या सरळ बासरीतून मधुर संगीत ऐकवा. " ती लाजत व रागवत म्हणाली.
“परंतु आधी आणखी थोडे दूध घ्या." तो म्हणाला.
“ते कशाला? अजीर्ण होईल." ती म्हणाली.
“बासरी ऐकून सारे जिरेल. बासरी तुम्हाला पागल बनवील. तुम्हाला मागून इतर काही खाण्यापिण्याची शुद्ध नाही राहणार. तुम्हाला भावनांचा भार सहन होणार नाही, म्हणून आधी 'पिऊन घ्या. म्हणजे तोल सांभाळेल. दूध
माझे ऐका." तो म्हणाला. “मी अशी दुबळी नाही. इतके दिवस माझे हृदय जो भार सहन करीत आहे, त्याच्याहून अधिक भार कोठे आहे जगात? वाजवा आता लवकर. मी अधीर झाले आहे. पुरुष नेहमी अंत पाहत असतात.” ती म्हणाली.
त्याने बासरी हातात घेतली. दोनचार सूर काढून पुन्हा त्याने ती नीट पुसली. जणू सर्व सृष्टीला त्याने आमंत्रण दिले. सूचना दिली. पाखरे उडत उडत आली व जवळच्या वृक्षांवर बसली. हिरव्या निळ्या पंखांचे पक्षी ! गाईनी माना वर केल्या. वासरांनी इकडे माना वळविल्या. वत्सला जरा पदर सरसावून बसली. नागानंद वाजवू लागले. दिव्य गीत आळवू लागले. ते एक प्रसिद्ध प्रेमगीत होते. कपोताक्षीच्या तीरावरील सर्व गावांत ते माहीत होते. अनेक स्त्रियांच्या तोंडी ते होते. काय होते त्या गाण्यात ? थोडा भावार्थ सांगू? त्यातील सारा अर्थ सांगणे शक्तिबाहेरचे आहे. तो स्वयंवेद्य आहे. फुलांचा सुवास का समजून द्यावयाचा असतो? अन्नाची चव का व्याख्यानाने कळते? तसेच गीतांचे, काव्याचे! परंतु थोडे सांगतो.
“भोळ्या डोळ्या! त्या वेळेस त्याला कशाला रे तू पाहिलेस ? सांगत तू होते बघू नकोस. बघू नकोस म्हणून. परंतु ऐकले नाहीस. विश्वास टाकलास त्याच्यावर, परंतु आता फसलास. रड आता जन्मभर, रड आता रात्रंदिवस.
आणि हे आधीर व बावळट हृदय ! त्याला नको देऊ जागा म्हणून पुनःपुन्हा याला सांगितले. परंतु नाही ऐकले याने. आता काटा बोचतो म्हणून सारखी रडत बसते. रड म्हणावे आता जन्मभर, रड रात्रंदिवस.
हे हात! आता कृश झाले म्हणून रडतात. परंतु त्याला घट्ट धरून ठेवण्यात शक्ती उगीच खर्च नका म्हणून सांगत होते. नाही ऐकले त्या वेळेस ह्यांनी मारली त्याला मिठी. परंतु आता गेले गळून.
हृदयातून धैर्य गळते, डोळ्यांतून अश्रू गळतात, हातातून काकणे
गळतात. परंतु सारे जीवनच का एकदम गळून जात नाही?
पण तो स्वप्नात येतो. स्वप्नात तो डोळ्यात येऊन बसतो. हृदयाशी गुलगुल बोलतो, बाहूत घुसतो. ते स्वप्नच चिरंजीव का होत नाही? दवबिंदू सूर्याला पोटात साठवतो, त्याप्रमाणे ते स्वप्न त्याच्या मूर्तीला साठवते. परंतु दवबिंदू गळतो, तसे हे स्वप्नही संपते. तरंगित सरोवरातील कमळ हिमवृष्टीने नष्ट व्हावे तसे तरंगीत निद्रेवर खेळणारे माझे गोड स्वप्न, सुगंधी स्वप्न, जागृतीची जरा हिमवृष्टी होताच भंगते. हे स्वप्न अमर करण्याची कोणी देईल का मला जादू ? मरणाजवळ असेल का ती जादू? जीवनाजवळ तर नाही.”
असे ते गाणे होते. बासरीतील सूर वाहत होते. वाऱ्यावरून जात होते. सर्व सजीव-निर्जीव सृष्टीची समाधी लागली होती. समाधीत प्रेमज्योतीचे दर्शन घडत होते. पाखरे तटस्थ होती. गाई स्वस्थ होत्या. नागानंद व वत्सला याचे डोळे मिटलेले होते. एक नाग तेथे येऊन डोलत होता. बासरी ऐकत होता. परंतु पाखरे घाबरली नाहीत, गाई-वासरे हंबरली नाहीत. त्या वेळेस गाई गाई नव्हत्या, नाग नाग नव्हते, पाखरे पाखरे नव्हती. सर्व चैतन्याच्या एका महान सिंधूत समरस होऊन डोलत होती, डुंबत होती.
वत्सला भानावर नव्हती. जादूगार तिच्याकडे पाहत होता. मिटलेल्या नेत्रकमळाकडे पाहत होता. तिने डोळे उघडले. भावपूर्ण डोळे. ती तेथे पडली. तेथील गवतावर पडली.
“मला जरा पडू दे. वर आकाशाकडे पडून बघू दे. मी आता माझी नाही. मी आकाशाची आहे. विश्वाची आहे, सृष्टीत भरून राहणाऱ्या संगीताची आहे, प्रेमाची आहे. " ती म्हणाली.
“ वत्सला, तो बघ नाग, तो बघ साप. " तो एकदम म्हणाला. “कुठे?" ती एकदम उठून म्हणाली.
“तो बघ जात आहे. बासरी ऐकून जात आहे.” त्याने सांगितले. * असे साप येथे येतात? तुम्हाला भीती नाही का वाटत!" तिने विचारले. “नाही वाटत असे नाही." तो म्हणाला.
*मग घरी राहायला चला ना ती म्हणाली.
"येथेच बरे. येथे सापांच्या वाघांच्या संगतीत भीती वाटली तरीही मला आनंद होतो." तो म्हणाला.
“माणसांपेक्षा का ती अधिक?" तिने विचारले.
"माणसांची मला अद्याप भीती वाटते. माणसांचा विश्वास नाही वाटत. " तो म्हणाला.