महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते. ते कार्तिक-मार्गशीर्ष महिन्याचे दिवस होते. वटवृक्षाच्या पानांपानांमधून लाललाल फळे शोभत होती. जणू लाल रुद्राक्षच त्या वटवृक्षाने सर्वांगी धारण केले होते. सूर्य उगवला होता. आश्रमातील कुमारांनी झाडलोट करण्याचे आधीच सूर्याने आपली सोन्याची हिरांची केरसुणी घेऊन सारा अंधार झाडून टाकला होता. दऱ्याखोऱ्यांतून वृक्षराईतून सर्वत्र त्याने तो सुवर्ण झाडू फिरविला. औषधालाही अंधाराचा केरकचरा ठेवला नाही. सूर्याने अंधाराचा कचरा दूर केला. वाऱ्याने पुष्कळसा पानपातेरा पहाटे उठून दूर केला. दव पडून सडा घातला गेला होता. फुलांचे सुगंध पसरून पावित्र्य व प्रसन्नता निर्मिली होती. पक्ष्यांनी गोड किलबिल सुरु केली होती. आश्रमातील साऱ्या बटूंनी सृष्टीच्या झाडलोटीत भाग घेतला. सर्वं आरशासारखे स्वच्छ केले. स्नाने करून अंगाला ऊब यावी म्हणून भस्म फासून ते मृगाजिनांवर येऊन बसले. समोर भगवान आस्तिक होते.
“ ॐ असतो मा सद्गमय
ॐ तमसो मा ज्योतिर्गमय
ॐ मृत्यो मा अमृतं गमय." ही उपनिषदांतील प्रार्थना, लहानशी परंतु बहु अर्थमयी, त्यांनी डोळे मिटून म्हटली. नंतर आस्तिक बोलू लागले.
“मी थोडेसे सांगणार आहे आज. मग तुम्ही आपापली निरनिराळी कामे करायला जा. मी जे सांगत असतो ते जीवनाला उद्देशून सांगत असतो. प्रत्येकाच्या जीवनाला उपयुक्त असे सांगत असतो. तुम्ही सारेच धनुर्वेत्ते नाही होणार. सारे संगीतवेत्ते नाही होणार. सारे राजनीतिज्ञ नाही होणार. परंतु मी जे सकाळी प्रार्थनेच्या वेळेस सांगत असतो ते, तुम्ही पुढे काहीही करा की कोठेही जा, तुम्हाला उपयोगी पडेल.
“बाळ अजित, एक उंबराचे फळ आण बघू.' "
अजित पटकन उठला व एकदोन उंबराची फळे घेऊन आला.
"फोन, तूच फोड एक." आस्तिकांनी सांगितले.
“फोडले. " अजित म्हणाला.
“काय दिसते तुला आत ?” त्यांनी प्रश्न केला.
“आत शेकडो बिया लवलव करीत आहेत. मोठी मौज दिसते आणि ही बी बघा, भुरटी बघा आत." अजित म्हणाला.
"या एका फळांत शेकडो बिया आनंदाने राहत आहेत. सहकार्याने नांदत
आहेत. या भूमीमध्येही तुम्ही सारे असेच आनंदाने राहा. नाग व आर्य भांडू नका. परस्पर सहकायांने राहा. समजले ना?” आस्तिक म्हणाले.
“माझ्या तंत्रीचे असेच आहे.” सुहास म्हणाला. “काय आहे तुझ्या तंत्रीत. " आस्तिकांनी प्रश्न केला.
“अनेक तारा, परंतु सर्वांच्या सहकायांने, संयमी वर्तनाने मधुर संगीत
निर्माण होते." तो म्हणाला.
“असे तर सर्वत्रच आहे. या आश्रमात अनेक वृक्ष आहेत, परंतु सर्व आनंदाने राहत आहेत. अनेक फुलझाडे आहेत, परंतु भांडत नाहीत. उलट नाना प्रकारची फुले आपण लावतो व त्यामुळे अधिकच आनंद होतो. आपल्या नदीमध्ये अनेक लाटा एकमेकीत गमतीने गुदगुल्या करीत असतात. एकमेकींच्या अंगावर नाचतात, कुदतात, मौज आहे.” हृषीकेश म्हणाला.
“वामन, तू एक लहानसे रोपटे हळूच उपटून आण बघू.” गुरुदेवांनी
सांगितले.
वामन गेला व बरीचशी रोपटी उपटून घेऊन आला.
“ अरे एक सांगितले ना? बरे राहू दे. त्यातील एक हातात घे. त्याला मुळे आहेत का?" त्यांनी प्रश्न केला.
“हो, मुळांशिवाय कसे असेल ते?" वामन हसून म्हणाला.
“किती आहेत मुळे?”
“ अनेक. "
“कोणत्या दिशेला गेलेली आहेत ती?"
“सर्व दिशांना....'
“यातील अर्थ समजला का कोणाला ? का सांगितले हे रोपटे उपटून आणायला? येते कोणाच्या ध्यानात?” गुरुदेवांनी विचारले.
“ मी सांगतो. " शुद्धमती म्हणाला. “सांग बरे." गुरुदेव प्रसन्न होऊन म्हणाले. “ज्याप्रमाणे झाड आपली मुळे सर्व दिशांत पसरून ओलावा मिळविते
व स्वतःची वाढ करून घेते, त्याप्रमाणे मानवानेही जेथे जेथे प्रकाश मिळेल, चांगुलपणा मिळेल, तेथून तेथून घेऊन स्वतःचा विकास करावा. जे झाड आपली मुळे दूरवर पसरते ते सुदृढपणे उभे राहते, असाच ना तुमचा आशय ?”
"होय बाळ. आर्यांनी नागांजवळचे चांगले असेल ते घ्यावे व नागांनी आर्याजवळचे घ्यावे. कोणाजवळ काहीच चांगुलपणा नाही अशी भिकारी वस्तू वा व्यक्ती ईश्वराच्या विश्वात नाही. विषांतही अमृतत्व असते. काही विषे अप्रतिम औषधे होतात. उपयोग करून घेणाऱ्यावर सारे आहे. आपण सर्व वस्तूंचा उपयोग करून घेतो. परंतु मानवाचा सदुपयोग आपणास करून घेता येऊ नये, हे आश्चर्य नाही का? या आश्रमातून तरी जे तरुण बाहेर पडतील ते मानव्याची उपासना करणारे होवोत. आजकाल आर्य व नाग यांच्यात द्वेष वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रकट रीतीने होत आहे, अप्रकट रीतीने होत आहेत. द्वेषसंवर्धनाचे आश्रम व शाळा सुरू होत आहेत. अशा या जगात तुम्ही शांतीचे उदककुंभ भरून न्या.” आस्तिक गंभीरपणे म्हणाले.
“परंतु काही लोक वाईटच असतात. 'दुर्जनाः परिहर्तव्यः । " बोधायन म्हणाला.
“वाईटपणा हा एक वरचा पापुद्रा असतो. एखादा कंद जरा वर वाईट दिसला तर आपण एकदम फेकीत नाही. तो आत बघत जातो. चांगला भाग दिसेल तो घेतो. आपण एक गमतीचा प्रयोग करू या. तुमच्यात सर्वात झोपाळून कोण आहे?” गुरुदेवांनी हसून विचारले.
" नागेश. " आर्यव्रत म्हणाला.
“कधी रे पाहिलेस ? आर्यव्रतच आहे आळशी.” नागेश रागाने म्हणाला.
“आळशी म्हणजे झोपाळू नव्हे. मी पडलेला असतो तरी जागा असतो.”
आर्यव्रताने उत्तर दिले.
“ते तर फारच वाईट. मला झोप लागलेली असते. मी उगीच लोळत नसतो." नागेश म्हणाला.
"म्हणजे झोप तुला फार येते हे तूच कबूल केलेस.” आस्तिक म्हणाले. सर्व मुले हसू लागली.
“झोपाळू म्हणजे का वाईट?" नागेशने विचारले.
“मुळीच नाही. तो विपुल अन्नाला आपल्या पोटात ठाव देतो. अन्नब्रह्माचा तो थोर एकनिष्ठ उपासक असतो.” प्रद्युम्न म्हणाला. “खूप जेवणारा का वाईट असतो?" नागेशने विचारले.
“मुळीच नाही. तो मारामारीत पहिला असतो. सर्वांना रडवतो.” हलधर
बोलला.
“येऊ का रडवायला, अशी देईन एक! " नागेश म्हणाला.
“परंतु नागेश उत्कृष्ट सेवकही आहे. त्या दिवशी त्या वाटसरूंची होडी उलटली. हाकाहाक झाली. नागेशने किती जणांस त्या दिवशी वाचविले! शक्ती ही वाईट वस्तू नाही. शक्तीच्या पाठीमागे शिव हवा, एवढेच. बरे, नागेश, एकदा हस बघू. राग गेला? आता एक प्रयोग करू हा येथे तू नीज. तुझ्या अंगावर बरीच पांघरुणे घालतो. झोपलास तरी चालेल. झोपच लागली पाहिजे असेही नाही आणि तू, आर्यव्रत तूही ये. तुझ्या अंगावरही तितकीच कांबळी घालतो. निजा दोघे हसता काय? निजा." आस्तिक म्हणाले.
ते दोघे कुमार झोपले.
“मी माझा पावा वाजवतो म्हणजे यांना झोप लागेल.” मुरलीधर
म्हणाला.
“मी गातो. सामवेदातील मंत्र म्हणतो.” जानश्रुती म्हणाला.
तेथे एक महान प्रयोग सुरू झाला. सारे शांत होत होते. संगीत सुरू होते. पावा वाजत होता. वेदगान चालले होते. नागेशचे डोळे, ते पाहा मिटत चालले, उघडले जरा, मिटले, मिटले आणि आर्यव्रत, तोही चालला निद्रेकडे. चालला, मिटले डोळे, झोपला.
“दोघे झोपले ना रे !” आस्तिकांनी विचारले.
" नागेश तर कधीच झोपला. झोप म्हटले की तो झोपतो.” हृषीकेश म्हणाला.
“परंतु ऊठ म्हटले की उठत नाही. तो अर्धा अर्जुन झाला आहे. अर्जुनाला गुडाकेश म्हणत. निद्रा त्याच्या स्वाधीन होती. इच्छा असताच जागा होई, इच्छा असताच निजे. एक प्रकारचे इच्छामरण व इच्छाजीवनच ते. आता आपण एक गम्मत करू या. तुम्ही पाहा हो.” आस्तिक म्हणाले.
आस्तिक आर्यव्रताजवळ गेले. त्याच्या अंगावरची पांघरुणे ते काढू लागले. दोन पांघरुणे काढताच त्या हालचालीने तो जागा झाला. नंतर आस्तिक नागेशकडे वळले. त्याच्या अंगावरची सारी पांघरुणे त्यांनी काढली, तरी त्याला जाग आली नाही. “नागेश, नागेश" हळू हाका मारण्यात आल्या. तरी काही नाही. शेवटी "नागेश, नागेश" असे मोठ्याने म्हणून त्याला हलवल्यावर त्याने डोळे किलकिले केले. मग गदगदा हलवल्यावर तो उठला.
“आर्यव्रताला लवकर जाग आली व नागेशला मागून आली, परंतु जाग येतेच. कोणाला आधी, कोणाला मागून. जसे हे शारीरिक जागृतीचे तसेच मानसिक व बौद्धिक जागृतीचे. काहींचे मन काही गोष्टींत लवकर जागे होते, काहींची बुद्धी काही गोष्टीत लवकर रंगते, परंतु इतर गोष्टींत त्यांची मने, त्यांच्या बुद्धी काही कधीही रमणार नाहीत असे नव्हे. मनाची व बुद्धीची अनंत शक्ती आहे. ज्या संबंधात मन वा बुद्धी जागृत व्हावयास पाहिजे असेल त्या संबंधीची मनोबुद्धीवरची आवरणे दूर केली पाहिजेत. त्या त्या वेळेस मनोबुद्धीस गदगदा हलविले पाहिजे. ते ते वातावरण सर्वत्र संतत उभे केले पाहिजे. दुसऱ्याने जसे व्हावे असे तुम्हास वाटते ते वातावरण सर्वत्र पसरा. रोग्याच्या शेजारी दुसरे रोग का उभे करायचे? रोग्याजवळ फुले, सुगंध आपण ठेवतो. प्रकाश, आनंद, स्वच्छता ठेवतो. त्याप्रमाणे ज्यांची जीवने, ज्यांची मने तुम्हाला रोगट वाटत असतील, त्यांच्या समीप तुमची जीवने सुगंधी, स्वच्छ, प्रकाशमय, आनंदमय, सेवामय अशी घेऊन जा. गाणाऱ्या गंधर्वाची कुत्रीही गाऊ लागतात! हे सारे आपल्यावर आहे. आर्यांनी नागासमोर सेवामय, सहकार्यमय, प्रेममय जीवन उभे करावे. त्या दोन प्रेमळ लाटा एकमेकींत मिसळून जातील. एक नवीन महान लाट उत्पन्न होईल. ती आणखी दुसरीत मिसळेल. अशा रीतीने ह्या भारतात मानवतेचा गोड सिंधू उचंबळवू या. समजलेत ना? सर्वांवरची आवरणे दूर होतील, पापुद्रे पडतील, कवचे गळतील. आतील सौंदर्य सर्वांचे सर्वांस दिसेल, ही दृष्टी घेऊन येथून जा व द्वेषमय दृष्टीने पाहणारी आसमंतातली मानवसृष्टी प्रेममय करा. जा आता. आपापले आवडीचे विषय शिकायला जा. शांतपणे जा. नागेशला चिडवू नका, नाहीतर तो मारील हो...." हसून आस्तिक म्हणाले.
सारे छात्र गेले. आनंदाची, मोकळेपणाची किलबिल सुरू होती. पाखरे पांगली. निरनिराळ्या ठिकाणी गेली. भगवान आस्तिक कोठे चालले? जेथे जेथे छात्र गेले तेथे तेथे जाऊन प्रेमवृष्टी करायला स्मितमय आशीर्वाद द्यायला!