परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम आशा वाटत होती. ज्यासाठी हा सुंदर भारत देश आपण निर्मिला ते ध्येय नीट रुजेल, चांगले अंकुरेल, दृढ मुळे घरील असे वाटत होते. मला समाधान वाटत होते. सर्व सौंदर्य ह्या देशाच्या निर्मितीत आपण ओतले. ह्याच्या पायापासून डोक्यापर्यंत अनंतता पसरून ठेवली. डोक्याशी गगनाला भेटू पाहणारा हिमधवल नगाधिराज उभा केला व तिन्ही बाजूंना उचंबळणारा, सर्व प्रवाहांना पोटात घेणारा, सर्व प्राणिमात्रांस आश्रय देणारा रत्नाकर पसरून ठेवला. पायांशी व हातांशी समुद्र, डोक्याशी स्थिर असा पर्वत! हात व पाय नाना प्रकारच्या उद्योगात श्रमू देत, धडपडू देत; प्रयोग करू देत. परंतु त्या प्रयोगाचे धोरण निश्चित असू दे. डोक्यात एकच ध्येय असू दे. डोक्यात चंचलता नको. एकाच ध्येयाला भेटण्यासाठी सारे उद्योग असू देत. भारतवासीयांस शिकविण्यासाठी दोन महान वस्तू आपण त्यांच्याजवळ अक्षय ठेवून दिल्या. देवा, हा देश निर्मिताना सारी कुशलता व सुंदरता आपण ओतली. सर्व प्रकारची हवा येथे खेळती ठेवली. सर्व प्रकारच्या वनस्पती येथे लावून ठेवल्या. अनंत प्रकारची फुले व फळे यांनी या देशाला समृद्ध करून ठेवले. विविध रंगांचे व विविध आकारांचे पशुपक्षी येथे निर्मिले. सकाळी व विशेषतः संध्याकाळी निळ्या निळ्या आकाशात अनंत रंगांचे वैभव आपण दाखवतो. स्वच्छ सूर्यप्रकाश व स्वच्छ चंद्रप्रकाश ह्या भूमीला आपण दिला. धुक्याचा धूसरपणा येथे क्वचितच आपण निर्मितो. येथे ही विविधता व स्वच्छता निर्मिण्यास, देवा, आपला हेतू होता.
देवा, तू मानवप्राणी निर्माण करून दशदिशांत पसरिलास. निरनिराळ्या तू ठिकाणी याची निरनिराळ्या रीतींनी वाढ झाली. त्या सर्वांना एकत्र पाहण्याची तुझी इच्छा आहे. निरनिराळ्या फुलांचा हार सुंदर दिसतो. त्याप्रमाणे भिन्न भिन्न देशांत भिन्न भिन्न परिस्थितीत वाढलेले मानवप्रवाह थोडेथोडे एकत्र कोठेतरी आणून त्या सर्वांचे मनोहर ऐक्य पाहावे असे, हे देवदेवा! तुझ्या मनात होते, तो प्रयोग ज्या ठिकाणी करावयाचा ते ठिकाण तू अनुपम रीतीने सजवून ठेवलेस. भारताची विविध रंगांनी नटलेली ही भूमी तू आपली रंगभूमी ठरविलीस.
परंतु, देवदेवा, प्रयोग बरा होऊ लागला. बीजाला अंकुर फुटू लागले. कालांतराने ह्या बीजाचा महान वैभवशाली वृक्ष होईल, अशी सुखस्वप्ने मी व माझे सहकारी मनामध्ये खेळवू लागलो. परंतु एकाएकी महान विघ्न येत आहे. ह्या देशात आर्य व नाग यांना एकत्र आणले. येथील नागजातीच्या मानवप्रवाहात जोरदार आर्यजातींचा प्रवाह वरून आणला. प्रथम विरोध झाला. हा प्रवाह त्याला लोटीत होता, तो त्याला प्रवाह प्रवाहात मिळेना. परंतु विरोधातही आशा दिसत होती. गढूळपणा खाली बसत होता. मोठमोठी माणसे भांडत होती, परंतु मिठ्याही मारीत होती. एकमेकांशी लढत होती, परंतु त्यातूनच प्रेमाची नातीही जडत होती. परंतु, देवा, आज सारी क्षुद्रांची सृष्टी दिसत आहे. महान विभूती अस्तास गेल्या. पामरांचा पसारा झाला. भव्य भावनांचा स्पर्श ज्यांच्या जीवनास होत नाही असे क्षुद्र जीव ह्या भारतात आज दिसत आहेत. ज्याप्रमाणे अनंत आकाशातील उंचावरची स्वच्छ व निर्मळ हवा क्षुद्र पाखरांना मानवत नाही, ती पाखरे घाणीने भरलेली, धुळीने धूसर झालेली खालची मलिन हवाच पसंत करतात, त्याप्रमाणे ह्या भारतातील मानवांना निःस्वार्थी व उच्च ध्येयवादाची हवा आज मानवेनाशी झाली आहे. ध्येयवादाची ते टर उडवीत आहेत. क्षुद्र भेदभावात मौज मानीत आहेत. आर्य व नागजातीचे तरुण ठायी ठायी एकमेकांचा समूळ उच्छेद करण्यासाठी संघटित होत आहेत. त्यांच्या त्यांच्या जातीतील ऋषीही आज द्वेषधर्माचे पुरस्कर्ते होत आहे. इतरांना पथदर्शन ज्यांनी करावे, ध्येयदर्शन ज्यांनी करावे, तेच रस्खलितमती व ध्येयच्युत झाले आहेत. देवा, पुढे काय होणार? हे द्वेषाचे वणवे एकदा पेटले म्हणजे काय होणार? आपली आशा नष्ट होणार, प्रयोग फसणार! दोन मानवप्रवाह एकत्र नांदवता न आले तर शेकडो प्रवाह पुढे कसे नांदवता येतील?
प्रभो, 'ह्या पवित्र प्रयोगाकडे लक्ष दे' म्हणून तू मला सांगितलेस. मी काळजीपूर्वक आरंभ केला आहे, परंतु मला धीर नाही निघत. मी तुला उठविले. क्षमा कर, देवा, परंतु पुढे कसे करू ते सांग."
प्रयोगपतीचे म्हणणे प्रभू शांतपणे ऐकून घेत होता. त्याने त्याला पोटाशी धरले. प्रसन्न दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या पाठीवरून व डोक्यावरून मंगल हात फिरविला. प्रभूचा स्पर्श होताच प्रयोगपतीचे नैराश्य जणू जातो. निरस्त झाले. सूर्य येताच धुके जाते, पाऊस पडताच रखरखीतपणा प्रभू म्हणाला, “वत्सा, भिऊ नको. तू प्रयोग सुरू ठेव. ज्या वेळेस प्रयोग फसणार फसणार असे वाटते त्याच वेळेस तो सफल होणार असे समजावे. अत्यंत उन्हाळा होऊ लागताच पावसाळा जवळ आला असे समजावे. अत्यंत हिवाळा होऊ लागला की, उन्हाळा जवळ आहे असे समजावे. अमावास्येचा काळाकुट्ट अंधार भरला म्हणजे विजेची चंद्रकोर लवकरच दिसणार असे समजावे. अत्यंत वेदना होऊ लागल्या की, मातेला नवीन सुंदर बाळ मिळणार असे समजावे. अत्यंत विरोधाच्या पोटातून विकास बाहेर पडत असतो.”
“खरेच, देवदेवा, लहान मुलांना नवीन चिमणे दात येत असतात त्या वेळेस त्याला ताप येतो, त्याला वांत्या होतात. अननुभवी माता घाबरते, परंतु घरातील अनुभवी वृद्ध आजीबाई सांगते, “घाबरू नकोस, सूनबाई, त्याला दात येत आहेत.' मुलाचा विकास व्हायचा असतो. त्या विकासाच्या आधी त्या वेदना होतात. काळेकभिन्न मेघ आले की त्यातूनच स्वच्छ अशा रजतधारा जगाला मिळणार यात संशय नाही. त्या काळेपणातून जगाला जीवन मिळते. "
“होय समजलास तू आता. तुला नाग व आर्य यांच्यात द्वेषाचे वणवे पेटणार असे दिसत आहे. परंतु हे द्वेष जातील. पोटातील विष बाहेर पडलेले बरे. होऊ दे एकदा द्वेषाची वांती ! परंतु ह्या द्वेषाच्या प्रदर्शनाबरोबर परस्पर प्रेमाचे संबंध उत्पन्न व्हावेत म्हणून बहुजनसमाजाला तहान लागली आहे. सामान्य आर्य जनता व सामान्य नाग जनता गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु सामान्य जनता एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य जनतेच्या या आशाआकांक्षातून महान तेज उत्पन्न होईल, महान शक्ती उत्पन्न होईल. द्वेषाची शक्ती फार नसते. अनंत अंधाराला एक प्रकाशकिरण येतो व मुकेपणाने दूर करतो. अनंत द्वेषाला निर्मळ प्रेमसूर्याचा एक प्रभावी किरण येईल व नष्ट करील. घाबरू नकोस तू. ज्या वेळेस अत्यंत निराशा वाटेल त्याच वेळेस श्रद्धेने आशा राख, आपल्या थोर हेतूंबद्दलची जी श्रद्धा, तिची अशा वेळेसच फार जरुरी असते. विरोधाच्या वेळी, तीव्र विरोधाच्या वेळीही जो आपल्या मंगलमय प्रयोगातच गढून राहतो व क्षण नि क्षण त्याला देतो, तोच खरा श्रद्धावान ध्येय जितके मोठे तितका पथ लांबचा व बिकट.
मी पुन्हा चिंतनात बुडी मारतो. प्रयोगाची ही पहिली अवस्था यशस्वी झाली की मला हाक मार. यश येईलच येईल. माझ्या दृष्टीला यश दिसत आहे. पहिलीच पायरी चढणे कठीण, पहिलेच पाऊल टाकणे कठीण! एकदा मूल दोन पावले चालू लागले की समजावे पुढे हे शकडो कोस सहज चालून जाईल! हिमालय चढून आकाशाला हात लावील! समजले ना? मारू चिंतनसिंधूत बुडी ? " प्रभूने प्रेमाने विचारले.
“मारा, देवा, चिंतनात रमून जा. मी करतो हा महान प्रयोग आता नाही एवढ्यातेवढ्याने घाबरणार. आर्य व नाग जात यांचा मधुर संगम झाला, यांचे मधुर मिलन झाले की उठवीन हळूच तुला. बीजाला फुटलेले पहिले सुंदर अंकुर, प्रयोगाला आलेले पहिले थोडे यश तुला दाखवून तुझे नवे आशीर्वाद घेऊन मग आणखी पुढे प्रयोग करू, एक दिवस असा मग येईल की, ह्या भव्य भारतभूमीत, सागराच्या सान्निध्यात, हिमालयाच्या छायेखाली, विविध प्रकारच्या वृक्ष-वनस्पतींच्या जवळ, स्वच्छ आकाशातील सुंदर प्रकाशात संस्कृतीतील मानव प्रेमाने एकत्र नांदत आहेत !” प्रयोगपती अमर आशेने म्हणाला.