वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.
कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?”
“हा नागानंद या गावात आला म्हणून हे संकट आले.” एकजण म्हणाला.
"त्याचे वत्सलेवर प्रेम आहे, तिचे त्याच्यावर आहे. हे पाप देवाला बघवत नाही. म्हणून तो करतो आहे शिक्षा." दुसरा म्हणाला.
“हाकलून लावा दोघांना या गावातून." तिसरा म्हणाला.
"परंतु त्यांना हाकलू तर आपल्या मुलीही बंड करतील. मोठे कठीण झाले आहे काम ! " चौथा म्हणाला.
“ त्यांना कशाला हाकलता ? वाघ वाघीण मारा ना? देवाला का नावे, दुसऱ्याला का नावे? स्वतःच्या दुबळेपणाला नावे ठेवा." एक आर्यकन्या येऊन म्हणाली.
“ही त्या वत्सलेची मैत्रीण. मोठी धृष्ट आहे पोरगी.” एकजण म्हणाला.
“वत्सलेची मैत्रीण होणे काही पाप नाही. तिने काय केले वाईट? तिचे प्राण वाचवायला कोणी तरी झालात का पुढे?” ज्याने तिचे प्राण वाचवले त्याच्या चरणी तिने प्रेमपुष्प का वाहू नये?" तिने विचारले.
“तो तरुण एवढा आहे पुरुषार्थशाली, तर या वाघांचा उपद्रव का नाही दूर करीत ? खरे पौरुष स्वस्थ नसते बसले." दुसरा कोणी म्हणाला. “आज रात्री मारणार आहेत ते वाघ. केला आहे त्यांनी निश्चय " असे म्हणून ती निघून गेली.
“मेला तर परस्पर पीडा टळेल.” कार्तिकचे वडील तेथे येऊन म्हणाले.
“कोण मेला तर? वाघ की तो नाग?” एकाने विचारले. “दोघे मरोत.” आणखी कोणीतरी म्हटले.
वाघाने एक गाय मारून रानात टाकिली होती. तेथे रात्री वाघ येईल अशी नागानंदाला खात्री वाटत होती. त्याने वाघाला मारण्याचे निश्चित केले. तिसरे प्रहरी वत्सला शेतावर आली. नागानंद भाल्याचे पाते घाशीत होता. त्याला धार लावीत होता.
" तुम्ही का एकटे जाणार वाघाच्या शिकारीला ?” तिने विचारले.
"हो." त्याने उत्तर दिले.
"मी येऊ बरोबर?" तिने विचारले.
“नको." तो म्हणाला.
"का?" तिने कंपित स्वरात विचारले.
“दुसऱ्याच्या मदतीने, एका स्त्रीच्या साहाय्याने, मी वाघ मारला अशी माझी निंदा करतील. माझ्या यशाला कलंक नको, नागानंदाच्या नावाला काळिमा लागावा असे तुला वाटते?” त्याने प्रश्न केला.
“मी का दुसरी, मी का परकी?" तिने डोळ्यात पाणी आणून विचारले. “परंतु तू माझ्या हृदयात आहेस, माझ्या जीवनात आहेस, म्हणूनच
येऊ नकोस. तुझी शक्ती माझ्या हातात येऊन बसेल. आपण निराळी नाही, म्हणूनच येण्याची जरुरी नाही." तो म्हणाला.
"बरेवाईट झाले तर?" तिने विचारले.
“तू माझी आठवण नाही ठेवणार?" तो म्हणाला. ती अधिक काही बोलली नाही. ती निघाली. तो तिला थोडे पोचवायला गेला.
“जा तुम्ही माघारे. अंधार होईल तुम्हाला परत जायला.” ती म्हणाली.
“आज अंधार नाही. आज पौर्णिमा आहे." तो म्हणाला.
“मला सदैव अमावास्याच आहे." ती म्हणाली.
“ वत्सले, ही घे फुले. ही सायंकाळी फुलतात, कोमल व सुगंधी आहेत. ही फुले लवकर कोमेजत नाहीत. कोमेजली तरी वास त्यांचा जात नाही. त्यांच्या सुकलेल्या पाकळ्यांनाच अधिक वास येतो. जरा त्यांचेवर पाणी शिंपडावे की लगेच सर्वत्र पसरतो वास घे, घे ना." तो म्हणाला.
ती घेईना. हात पुढे करीना.
“तुझ्या चरणांवर ठेवू, तुझ्या मस्तकावर वाहू?" त्याने सद्गदित होऊन विचारले. तिने हात पुढे केला. त्याने तिच्या हाती ती फुले दिली. तिने ती हृदयाशी घरली.
“वास घेऊन बघ." तो म्हणाला.
“या फुलांचा केवळ नाकाने नसतो वास घ्यायचा. या फुलांचा रोमारोमाने वास घ्यायचा असतो." ती म्हणाली.
“जा आता." तो म्हणाला.
“जा तुम्ही.” ती म्हणाली.
“वत्सले, काय नेतेस बरोबर ?” त्याने दुरून विचारले.
“तुमचे अमर निर्मळ प्रेम, तुमची सुगंधी मूर्ती.” ती वळून म्हणाली.
“तुम्ही काय नेता बरोबर?" तिने दुरून विचारले. “ते मोठ्याने सांगू नये.”" तो दुरून म्हणाला.
रात्रीची वेळ झाली. दीड प्रहर रात्र होऊन गेली. चंद्र चांगलाच वर आला होता. पौर्णिमेचा चंद्र. दुधासारख्या प्रकाशात पृथ्वी न्हाऊन निघाली होती. नागानंद हातात भाला व तलवार घेऊन छपून बसला होता. ती पहा वाघाची भयंकर डुरकाळी ऐकू आली. गावातील गाईगुरे हंबरू लागली, थरथरू लागली, नागानंद सावध होऊन बसला.
शेपटी आपटीत आपटीत तो पाहा येत आहे वाघ! त्याचे ते पिवळे धमक सोन्यासारखे रसरशीत अंग व त्यावर ते पट्टे! तो पाहा त्याचा मृत्यूप्रमाणे जबडा! ते पाहा आगीसारखे डोळे! भेसूर सौंदर्य! ती त्याची तीक्ष्ण नखे ! हुंगीत हुंगीत येतो आहे. कसला घेत आहे वास? त्याला का माणसाचा वास आहे? छे: भ्रम झाला त्याला बहुधा. तो समोरच्या भक्ष्यावर तुटून पडला. मोहाला बळी पडला. समोरची मेजवानी पाहून भुलला व जवळ छपलेले मरण त्याला कळले नाही!
पंजांनी तो गाईला फाडफाडून खात होता. मध्येच डुरकाळी मारी. प्रेमळ काळी. तो का राणीला बोलवीत होता? वाघिणीला हाक मारीत होता ? खा, पोटभर मास, खा. हे काय? अस्वस्थ का झाला वाघ? काय बघतो आहे? काय हुंगतो आहे? सभोवती हिंडतो आहे. पुन्हा लागला ताव मारायला. खा, खा, , पोटभर मांस. पुढची चिंता पशूंनी करू नये!
तो पाहा लांब भाला जोराने घुसला त्याच्या अंगात! वाघाने उडी मारली. चवताळला तो ! खवळला तो ! प्रचंड गर्जना केली त्याने. त्या मृत गाईच्या देहातील अणुरेणूही त्या गर्जनेने जिवंत झाले असतील. त्या डुरकाळीने मढी खडबडून उठली असती, जिवंतांची मढी झाली असती. वाघाच्या अंगात तो भाला घुसला होता. त्या भाल्यासकट तो उसळला, नागानंदाच्या कीर्तीचा व पराक्रमाचा झेंडाच जणू वाघ नाचवीत होता, फडकवीत होता. वाघाने नागानंदावर झेप घेतली, परंतु ती त्याने चुकविली. त्याने तलवार मारली, परंतु ती त्या भाल्यावर आपटली, भाला तुटला, पुन्हा आला वाघ, बों, बों करून आला. नागानंदाने त्या वेळेस तलवारीचा असा वार केला की, वाघाचे मुंडके तुटले. वाघ मरून पडला. परंतु ही कोणाची आरोळी? अरे ही वाघीण आली! ती चवताळली. नागानंद उभा राहिला. पावित्र्यात उभा राहिला. ती रक्तरंजित तलवार त्याच्या हातात होती. वाघीण फार क्रूर दिसत होती. परंतु वाघिणीच्या पाठीत कोणी मारली तलवार? वाघीण मागे मुरडली. कोण होते तेथे ? नागानंद एकदम थांबला. त्याने वाघिणीवर वार केला. वाघिणीने कोणाला धरले होते? कोणाला मारला पंजा? पुन्हा ती वळली, पुन्हा नागानंदाचा वार ! पडली मरून. वाघ वाघीण तेथे मरून पडली. परंतु, नागानंदाच्या मदतीला कोण आले होते धावून! नागानंद व वत्सला एकमेकांस बिलगून बसली होती. ते दोन जीव समोर
मरून पडले होते. रानांतील राजाराणी तेथे मरून पडली होती. “तुला लागले का?" नागानंदाने हळूच विचारले. “हो.” ती म्हणाली.
“कोठे?” त्याने भीतीने व प्रेमाने पाहून विचारले.
“येथे.” ती नागानंदाच्या छातीवर हात ठेवून म्हणाली. नागानंदाच्या छातीतून रक्त येत होते. पंजा तेथे लागला होता. त्याची तंगडीही रक्तबंबाळ झाली होती. वत्सलेने पदर फाडला व नागानंदाच्या घावावर तिने पट्टी बांधली. छातीवर हात धरून ठेवला.
“ असा हात किती वेळ धरणार? थांब, येथे मी पाला बघतो. रक्त
थांबवणारा पाला. तो त्यावर बांधतो." तो म्हणाला. त्याने ती वनस्पती शोधली. चांदण्यात त्याला सापडली. पाला काढून तो चोळून छातीवर बांधण्यात आला. रक्त जरा थांबले.
“ वत्सले, तुला नाही ना लागले?” त्याने पुन्हा विचारले.
“नाही. तेवढे माझे भाग्य नाही. तुम्हाला मदत करताना आज वाघाने
मला मारावे असे मनात येत होते. तुमचे प्राण वाचवण्यात मला मरण मिळाले
असते तर मी कृतार्थं झाले असते.” ती म्हणाली.
“मग वाघिणीच्या पुढे का नाही उभी राहिलीस? तू तिच्यावर वार का केलास? तुलाही जगायची इच्छा आहे. नाही म्हणू नकोस. सांग, जगायची इच्छा आहे की नाही?” त्याने विचारले.
"जर तुम्ही जवळ असाल तर !” ती म्हणाली.
" वत्सले, तू आपले प्राण संकटात का घातलेस?” त्याने विचारले.
“ तुम्ही मागे माझ्यासाठी का घातले होतेत?" तिने विचारले.
“तू उपकार फेडायला आली होतीस. होय ना? शेवटी मी परकाच आहे. माझे देणे देण्यासाठी आलीस. मी माझे प्राण तुझ्यासाठी पाण्यात फेकले. ते ऋण परत करण्यासाठी आलीस! देणेघेणे हेच ना तुझे माझे नाते ? अरेरे.” तो खिन्नतेने म्हणाला.
“नागानंद, खिन्न नका होऊ. मी प्रत्युपकारासाठी नाही आले बरे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रेमामुळे आले. तुमचे शरीर आता तुमचे नाही. ते माझे आहे. ते माझे नसते तर त्या दिवशी ते वाचले नसते. हे माझे शरीरच वाचवण्यासाठी मी आले. नागानंद, आपण दोघे का वाचलो ? खरोखर का वाचलो? का त्या प्रक्षुब्ध प्रवाहात आपली जीवने एकत्र आली? पाण्यात दोन काष्ठे एकत्र येतात व पुन्हा हेलकाव्याबरोबर दूर जातात. परंतु आपण का यासाठी एकत्र आलो? पुन्हा दूर होण्यासाठी एकत्र आलो? नाही. नाही.. आपण एकमेकांची आहोत. तुम्ही माझे व मी तुमची. आपली कोणीही ताटातूट करू शकणार नाही. वाघ येवो की मृत्यू येवो.” असे म्हणून तिने नागानंदाच्या गळ्याला मिठी मारली. त्याने तिला हृदयाशी धरून ठेवले.