वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियांच्या मनात एकदा एखादी गोष्ट रुजली की लवकर मरत नाही.
कामरूप देशात तर स्त्रीराज्यच होते. तिकडूनही शांतिसेना आली. लोकांना आश्चर्य वाटले. महान यात्राच जणू सुरू झाली. सत्यधर्माची यात्रा. प्रेमाची गाणी, विश्वक्याची गाणी, मानव्याची गाणी सर्वत्र वक्रतुंडाचा वाकडा धर्म ना कोणी ऐके, ना कोणी मानी. दुमदुमून राहिली.
जनमेजयाकडे एका राज्याचे सैन्य चालले होते. त्या सैनिकात उत्साह नव्हता. कसे तरी जात होते. तो वाटेत ही स्त्रियांची शांतिसेना आली. त्या सैनिकांबरोबर ही सेना उभी राहिली. संसारात नाना आपत्तींशी झगडणाऱ्या त्या थोर स्त्रिया तेथे सत्याच्या विजयार्थ धैर्याने उभ्या होत्या. त्यांच्या हातात शांतीच्या पताका होत्या. 'ॐ शांतिः शांतिः शांतिः' असे पवित्र शब्द त्या पताकांवर लिहिलेले होते. नाग व आर्य एकमेकांत मिठी मारीत आहेत. अशीही चित्रे काहींच्या पताकांवरून होती. 'मानवधर्माचा विजय असो.', 'सत्यधर्माचा विजय असो' अशी ब्रीदवाक्ये त्या भगिनी गर्जत होत्या.
त्या सैन्याचा नायक पुढे आला. त्याने विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?"
वत्सला म्हणाली, “आम्हाला विवेक हवा. माणुसकी हवी. आम्ही स्त्रिया अधर्म होऊ देणार नाही. पुरुषांना सत्पथ दिसत नसेल तर आम्ही दाखवू आम्ही. घरी दिवा लावतो. आज बाहेर लावीत आहोत. दिवा लावणे हे स्त्रियांचे काम. तुम्ही सारे अंधारात वावरत आहात. तुम्ही कोठे चाललात? जनमेजयाला मदत करायला? त्याच्या बाजूने उभे राहून नागांशी लढाई करायला? इंद्रासारख्या थोरांशी युद्ध करायला? तुम्हाला मरायला जायचे असेल तर आधी आम्हाला मारा. या सैन्यातील सैनिकांना युद्धार्थ जाण्याची खात्रीने इच्छा नाही. आमच्या पतींना, आमच्या मुलांना, आमच्या भावांना विनाकारण समरभूमीवर तुम्ही का घेऊन जाता? कुरुक्षेत्रावर काय झाले? अठरा अक्षौहिणींतील सात राहिले. परंतु लाखो स्त्रिया निराधार झाल्या. ते का पुन्हा करणार? या सैनिकांच्या मनात कोणाविषयीही द्वेष नाही. नागजातीत यांचे मित्र असतील, आप्त असतील. नाग लोक वाईट नाहीत. आम्हा स्त्रियांत अनेकींचे पती नाग आहेत. अनेकींच्या सुना नागजातीच्या आहेत. नागलोक थोर आहेत. परवा आमच्या गावी जनमेजयाचे अधिकारी आम्हास जाळण्याची भीती दाखवू लागताच आमच्यातील एका शूर नागकन्येने हातात हसत निखारे घेतले व म्हणाली, “स्त्रियांना सती जाण्याची सवय आहे. त्यांना अग्नीचे भय नाही. अग्नी त्यांचा घरोब्याचा मित्र आहे.' ही पाहा ती शूर स्त्री ! तिचे लग्न होऊन दहा दिवसही झाले नाहीत. एका आर्य तरुणाजवळ तिने लग्न लाविले. आता यांना का जाळणार? कोणते पाप केले यांनी? काळे नि गोरे रंग घेऊन काय बसलात? काळ्या रात्रीचे चंद्राशी लग्न लागत असते. हजारो नक्षत्रांच्या अक्षता त्या वेळेस त्यांच्यावरून ओवाळून टाकतात. काळा रंग का वाईट? काळ्या लाटांच्या डोक्यावर पांढरी फेसांची फुले उधळली जात असतात. वेद सांगतो 'अंतर्मुख हो.' काळे असोत गोरे असोत. काळी करवंदे का कडू असतात? ती रानाची करवंदे किती रसाळ व मधुर असतात. ती काळी म्हणून फेकाल तर मूर्ख ठराल. या काळ्या नागकन्या म्हणजे मंजूळ मैना आहेत. काळ्या कोकिळा आहेत. प्रेमाचे संगीत त्यांनीच ऐकवावे, त्यागाच्या श्रुती त्यांनीच जगाला द्याव्या. तुम्ही जनमेजयाच्या साहाय्यास जात आहात. नागांना शिक्षा करण्यासाठी जात आहात. मग आम्हाला आधी करा. आम्ही अपराधी आहोत. आम्ही नागांना प्रेम देतो. आम्ही त्यांना तुच्छ मानीत नाही. आम्ही त्यांना घरात घेतो. एकरूप मानतो. आमही जनमेजयाच्या आज्ञा मोडल्या आहेत. मारा आम्हाला. काय रे, सैनिकांनो! तुम्ही का जाता लढाईला ? तुमचे काय आहे त्यात हित? त्यात आहे का धर्म, आहे का न्याय? राजा हाक मारतो, चाललात. मनुष्याने सदसद्विवेकबुद्धी विकू नये. राजा आपणास अंध करू लागला तर आपण होऊ नये. बुद्धीचा डोळा बंद करणे हे सर्वात मोठे पाप आहे. आपण आर्य वेदधर्म मानतो. वेदधर्म म्हणजे विचारधर्म, गायत्रीमंत्र 'बुद्धी तेजस्वी ठेव' असे सांगतो. तुम्ही विचार केलात का? अविचाराने घाव घालू नका. तुम्ही म्हणाल, “राजा पैसे देतो. आम्ही अर्थाचे दास' परंतु राजाने कोठून आणला पैसा? आमच्या धान्यातील तो धान्य घेतो. आमच्या गुरांतून तो गुरे घेतो. लक्षावधी राजांचे ते गोधन असते. परंतु ते कोठून आले? त्या आम्हीच दिल्या गाई. आम्हीच भरली राजाची कोठारे. त्यातून तुम्हाला मिळते हजारो लाखो नाग आर्यापेक्षाही अधिक श्रम करतात. त्या श्रमातून तुम्हाला धनधान्य मिळते. त्यांच्यावर का तुम्ही प्रहार करणार? हा अधर्म आहे, ही कृतघ्नता आहे. प्रजेचे न ऐकता एका राजाचे ऐकणे हा मूर्खपणा आहे. राजा प्रजेचे ऐकत नसेल तर तो राजाच नव्हे, तो एक लुटारू चोर आहे. त्याची आज्ञा ऐकणे म्हणजे चोराला साहाय्य करणे. हा का आर्यधर्म? गावोगाव जाऊन पाहा. गावोगाव आर्य व नाग यांचे संबंध प्रेमाचे आहेत. एका दोल्यावर आर्य व नाग मुले झोके घेत आहेत, आकाशाला हात लावीत आहेत, एकत्र खेळत आहेत, एका नदीमध्ये डुंबत आहेत, एकत्र उठत आहेत, बसत आहेत. परंतु काही मोठ्यांच्या मनात आला द्वेष, बसली अढी. ह्या मोठ्यांचा होतो खेळ, लहानांचा जातो जीव! जनमेजयाला म्हणे नागांचे वावडे ! त्या वक्रतुंडाचे म्हणे नाग दिसताच वाकडे होते तोंड निघून जा म्हणावे दुनियेतून. या भूमीत राहू नका. या भूमीत आम्ही राहणार, परस्परांस प्रेम देणार. काय रे, सैनिकांनो? बोला ना. आहे का तुमच्या मनात नागांचा द्वेष? सांगा. ('नाही, नाही' म्हणतात.) नाही तर मग कोठे जाता? आनाथांचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म. आज नाग अनाथ आहेत. त्यांच्या बाजूने उभे राहा. जा इंद्राच्या झेंड्याखाली. त्याने नागांना संरक्षण दिले आहे. सत्याची तुम्ही बाजू घ्या. सत्य हा आपला राजा ना जनमेजय ना कोणी. जा माघारे. सत्यधर्माचे सैनिक बना. असत्याकडे जायचे असेल तर आमचे मुडदे पाडून जा. या आम्ही उभ्या आहोत तुमच्या मायबहिणी. चालवा तुमच्या असिलता, मारा बाण, फेका शक्ती ! आमचे बलिदान होवो.”
ते सर्व सैनिक गर्जना करून उठले. ते माघारे चालले. “आम्ही सत्याला ओळखू. नाग आमचा भाऊ आहे. आम्हाला हे राजे फसवतात. धूर्त कपटी राजे. शाब्बास, स्त्रियांनो! तुम्ही खरा धर्म दिला. ज्ञानाचा दिवा लाविलात. प्रेमाचा विजय असो. खऱ्या शांतीचा विजय असो.” अशा गर्जना करीत ते सैनिक मागे वळले.
ती वार्ता क्षणात सर्व गेली. ठिकठिकाणी गोळा होणारी सैन्ये पांगली. त्या त्या राजांनाच क्रांती होईल अशी भीती वाटू लागली. इंद्र आनंदला, हजारो सैनिक स्वेच्छेने त्याच्याकडे येऊ लागले. जनमेजय काळवंडला. तो चिंताक्रांत झाला. स्वतःचे साम्राज्यच गडगडणार, गावोगाव स्वराज्य होणार, असे त्याला वाटू लागले.
" राजा, धीर सोडू नको. तो एक तरुण नागानंद व त्याची बायको वत्सला यांनी हा धुमाकूळ माजवला आहे. त्या दोघांना बद्ध करून आणले तर ही चळवळ थंडावेल. सारे सुरळीत होईल.” वक्रतुंड म्हणाला.
“दुसऱ्या स्त्रिया उभ्या राहिल्या. आणि या आर्यस्त्रियांना का मी छळणार? नाग राहिले बाजूला. आर्यमातांवर का मी हत्यार उगारणार?” जनमेजयाने विचारले.
“राजा, ह्या आर्यस्त्रियाच नव्हेत. ज्यांना नागांविषयी सहानुभूती वाटते त्या नागच समजाव्या. आणि शेवटी स्त्री काय पुरुष काय ? अपराध्याला दंड करणे हे तुझे काम. ह्या स्त्रियांना अबला म्हणून सोडून देण्यात अर्थ नाही.
अबला असत्या तर घरात बसल्या असत्या. ज्या अर्थी त्या बाहेर पडल्या आहेत, त्या अर्थी त्यांनाही एकच नियम जो पुरुषांना नियम तोच त्यांना. राजा, कारुण्यवृत्ती होऊ नकोस. क्षत्रियाला अनाठायी करुणा साजत नाही. कठोर हो. धर्मासाठी कठोर हो. आर्यधर्म स्वच्छ ठेविला पाहिजे.” वक्रतुंड विष पाजीत होता.
“परंतु आर्यधर्म म्हणजे काय?” राजाने विचारले.
“आर्यधर्म म्हणजे आनार्यांना नष्ट करणे, किंवा त्यांना आर्यधर्माची दीक्षा देणे. त्यांचे वैशिष्ट्य नष्ट करून आर्यत्व त्यांच्या ठायी आरोपिणे.” वक्रतुंड म्हणाला.
“परिस्थिती तर बिकट होत चालली. " जनमेजय म्हणाला.
“राजा, मी त्या वत्सलेला व नागानंदास बद्ध करून आणतो. त्यांनी चावटपणा मांडला आहे. 'राजा, राजाच नव्हे. तो जनमेजय लुटारू आहे. चोर आहे.” असे सांगतात. जिव्हा कापल्या पाहिजेत. होळीत फेकले पाहिजे. " वक्रतुंड म्हणाला.
“जा, त्यांना आणा बद्ध करून. इतके दिवस संयम राखीत होतो. परंतु माझा संयम यांना दुबळेपणाचे लक्षण वाटत आहे. होळ्याच पेटवू आणा. आर्य वा नाग स्त्रीपुरुष आणा बांधून. माझी आज्ञा मोडणारे सारे अपराधी आणा. आज्ञा मोडणाऱ्या स्वतःच्या मुलासही हंसध्वज राजाने तप्त तेलात टाकिले. कठोर झालेच पाहिजे. जा, वक्रतुंड, आणा त्या उद्धटांना मुसक्या बांधून.” जनमेजय रागाने लाल होऊन म्हणाला.
“होय, महाराज, आर्यधर्माचा विजय असो." असे म्हणून वक्रतुंड निघून गेला.