त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.
“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का नाही जेवायला येत? तुम्ही जेवायला आलात तर तीही पोटभर जेवेल. वत्सला हसते, आनंदी दिसते. परंतु कसली तरी चिंता तिला आहे. कीड कळीला आतून खात आहे. तुम्ही का नाही करीत दया?” सुश्रुतेने विचारले.
"मी का येथे येऊन राहू. येथे जेवायला येऊ?” नको, आजी, नको. मला मिंधेपणा नको. स्वावलंबन बरे. तुमची सहानुभूती आहे तेवढी पुरे. मला ना आई ना बाप. मी तुमच्याकडे एखादे वेळेस असा का येतो, माहीत आहे? आईची होणारी आठवण विसरण्यासाठी. कोणाशी मनातले सांगावे, बोलावे?" तो म्हणाला.
“नागानंद, तुमचे वडील काय करीत, कोठे राहत! " तिने प्रश्न केला..
“मला माहीत नाही. माझे वडील मी पाहिले नाहीत. पाहिले असले तरी आठवत नाही. कोणातरी आर्याने माझ्या आईची फसवणूक केली होती. त्याचे नाव तिने आम्हाला सांगितले नाही. ती म्हणे, 'त्याचे नाव जगाला सांगेन तर जग ते अनादरील. ते माझ्या मनातच राहू दे." माझी आई त्यांची मानसपूजा करी. जेवायला बसली तर शेजारी एक पान मांडी. त्या पानाचा नैवेद्य दाखवी. मी आईला विचारी, 'हे कोणाचे पान?' ती म्हणे, 'तुझ्या पित्याचे, तुझ्या जन्मदात्याचे.' शेवटी ती त्या पानातील एक घास खाई व मग ऊठे. एखादे वेळेस आई डोळे मिटून बसे. मी म्हणे, 'आई, डोळे मिटून कोणाला बघतेस?' ती म्हणे, 'माझ्या हृदयातील देवाला, तुझ्या जन्मदात्याला.' अशी माझी आई होती. अशी ती सती होती. तुच्छ मानल्या जाणाऱ्या नागांत अशा देवता जन्मतात. अहंकारी आर्यांना ते दिसत नाही. माझी आई! ती पावित्र्याची, प्रेमाची मूर्ती होती." नागानंद म्हणाला.
“तुम्हाला भावंडे नाहीत?” तिने विचारले. “आम्ही जुळी होतो. बहीण व भाऊ. माझी बीण गोरी गोरी पान होती. मी काळासावळा. परंतु माझ्या बहिणीचीही मला आठवण नाही. ती देवाकडे लहानपणी गेली. नागलोकी गेली. परंतु आई सांगत असे सारे. ती मला म्हणायची, 'तुझा रंग माझ्यासारखा आहे. परंतु तिचा त्यांच्यासारखा होता. " आम्ही दोनतीन वर्षांची झालो होतो. एके दिवशी आम्हा दोघांना निजवून आई कामाला गेली होती. तो इकडे आग लागली. आमची वसाहत भस्म झाली. आर्यांनीच लाविली ती आग. गावची मंडळी शेतात होती. ती धावत आली. माझी आई धाय मोकलून रडू लागली. आमचे घर पेटले होते. आम्ही आत जळून मरणार या कल्पनेनेच ती मूर्च्छित झाली. परंतु एका उदार आर्याने आगीत शिरून आम्हाला वाचविले. तोही बराच भाजला. तो घरी गेला. त्याचे पुढे काही कळले नाही. आई आम्हा दोघा लेकरांना घेऊन दुसरीकडे गेली. पुढे धाकटी बहीण मेली. मग आईला माझाच आधार. परंतु एका मातेचा निरोप घेऊन जात असता वीज अंगावर पडून ती मला सोडून गेली. ती कहाणी मी मागे सांगितली होती. " नागानंद म्हणाला.
“नागानंद!” सुश्रुतेने भावपूर्ण शब्दाने हाक मारली. "काय, आजी?” त्याने विचारले.
“अरे, माझा मुलगा, या वत्सलेचा पिता, तो तर मग तुम्हालाच वाचवण्याच्या कामात मेला. अंग भाजून तो घरी आला. नाही झाला बरा. तो मेला. त्याच्याबरोबर वत्सलेची आई सती गेली. तेव्हा वत्सला वर्षाचीही नव्हती. ती पोरकी झाली. तो आजारीपणात म्हणत असे, 'कशी होती अवळी जावळी मुले. एक गोरे, एक काळेसावळे, जणू दिवस व रात्रच जन्माला आली.' नागानंद! आणि वाचलेले तुम्ही वत्सलेला वाचवायला आलात! योगायोगाच्या गोष्टी. त्याने रत्नाकराने तुला आगीतून वाचवले. तू वत्सलेला पाण्यातून वाचवलेस. नागानंद, रडू नको. झाले गेले. नको रडू बाळ. ” सुश्रुता त्याला जवळ घेऊन म्हणाली.
“आजी, आम्ही अभागी. मी अभागी. मी वत्सलेला पोरके केले. मला वाचवण्यासाठी तिचे वडील न येते तर ते राहते. मग वत्सलेची आईही राहती. अरेरे, माझ्यामुळे हे सारे! माझ्यामुळे हे सारे! दुर्दैवी, कपाळकरंटा मी.” असे म्हणून तो डोक्यावर धडाधड हात मारून घेऊ लागला. सुश्रुतेने त्याला शांत केले. मुलासारखा तेथे तो बसला. सुश्रुतेच्या मांडीवर तो झोपला.
वत्सला गात गात बाहेरून आली. वनदेवतेप्रमाणे नटून आली. केसांत फुले घालून आली. कानात फुले घालून आली. गळ्यात फुलांच्या माळा घालून आली. नाना रंगांची वनफुले. नाना गंधांची वनफुले. वत्सला आली तो तिला शांत व गंभीर असे दृश्य दिसले.
“ वत्सले, गडगडब नको करू." आजी म्हणाली.
“यांना पाहायला यांच्या झोपडीत गेलो आम्ही. तो तेथे कोणी नाही. यांची बासरी आम्ही वाजविली. परंतु नीट वाजवता कोणालाच येईना. केव्हा आले हे? झोपलेतसे, आजी? यांना का बरे नाही वाटत? ही बघ यांच्या पायावरची ती जखमेची खूण. माझ्या पदराची पट्टी बांधली होती तेथे. का गं हे निजलेत? उठवते मी त्यांना गुदगुल्या करू? कानात फुलाचा देठ घालू ?" वत्सला हळूहळू आजीचा हात ओढीत विचारीत होती.
“वत्सले, आज एक महत्त्वाची गोष्ट कळली. सहज त्यांच्या बोलण्यातून प्रकट झाली. तुझ्या पित्याने जळणाऱ्या घरातून जी दोन मुले काढली त्यातील एक हे नागानंद! ते तुझे वडील असे कळल्यामुळे यांना दुःख झाले. माझ्यामुळे वत्सलेचे आईबाप गेले असे कळून नागानंद रडू लागले. डोके फोडून घेऊ लागले. मी त्यांना शांत केले. आता निजले आहेत मुलासारखे.” आजीने सांगितले.
“माझ्या बाबांनी यांना वाचविले. यांनी मला ! काय आहे योगायोग? आजी, काय आहे हे सारे?" तिने आजीला विचारले.
वत्सला आनंदून आली होती. परंतु गंभीर झली. ती तेथे बसली. तीही निजली. दमून आली होती. आजीच्या दुसऱ्या मांडीवर ती निजली. सुश्रुता त्यांच्याकडे पाहत होती. दोघांच्या डोक्यावरून तिने हात फिरवले. झोपेत नागानंदाचा एक हात वत्सलेच्या हाताजवळ आला. ते दोन्ही हात मिळाले. एकत्र मिळाले.
नागानंद जागा झाला. कोणाचा हात होता त्याच्या हातात? त्याने पाहिले. तो तो गोरा हात. त्याने आपला हात दूर घेतला. तो वत्सला जागी झाली. तिने त्याच्याकडे पाहिले.
“घ्या हो दोघे हातात हात! मी तुमचे हात एकमेकांच्या हातात देते. करा पाणिग्रहण. आजीच्या मांडीवर बसून पाणिग्रहण. तुम्ही परस्परांसाठी जन्मलेली आहात. तुम्ही एकमेकांपासून दूर राहू शकणार नाही. जवळ याल तर सुखाने नांदाल. वत्सले, बस. तुझ्या गळ्यातील ह्या माळांपैकी एक नागानंदाच्या हातात दे व एक तू आपल्या हातात घे. घाला परस्परांस खरेच खाली काय पाहता? मी सांगते. " आजी प्रेमाने म्हणाली.
वत्सलेने गळ्यातील एक माळ काढली व नागानंदाच्या हाती दिली. तिने एक माळ आपल्या हाती घेतली. उभयतांनी एकमेकांस घातल्या माळा. दोघे सुश्रुता आजीच्या पाया पडली. वृद्धेचे डोळे भरून आले. शतस्मृतींनी भरून आले. तिने त्यांना शुभ आशीर्वाद दिले! वत्सला व नागानंद यांचा विवाह झाला.