नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंडाला अत्यानंद झाला. जनमेजयासमोर हे दोन बंडखोर केव्हा उभे करीन असे त्याला झाले होते.
हस्तिनापुराला या दोन राजबंदीसह रात्रीच्या वेळी ते आले. नागानंद व वत्सला यांना एका कोठडीत ठेवण्यात आले. शेजारच्या कोठड्यांतून शेकडो नाग स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेले होते. आणखी अभागी जीवन आले असे वाटून त्यांना वाईट वाटत होते. परंतु पहारेवाल्यांकडून वत्सला व नागानंद, दोघे आली आहेत, असे कळताच सर्व राजबंदींनी 'वत्सलानागानंदकी जय' अशा गर्जना केल्या. परंतु वत्सला व नागानंद यांना पहारेकऱ्यांबरोबर निरोप पाठविला. “जयजयकार आमचा नका करू. जयजयकार आस्तिकांचा करा. त्या महर्षीचा करा. जयजयकार प्रेमधर्माचा करा. ऐक्यधर्माचा करा. "
सर्व राजबंदींनी “भगवान आस्तिकांचा विजय असो. प्रेमधर्माचा विजय असो.” अशा गर्जना केल्या. त्या गर्जना जनमेजयाच्या कानी गेल्या. आज का या गर्जना, हे त्याच्या लक्षात येईना. इतक्यात वक्रतुंड आला.
“आणले दोघांस पकडून." तो ऐटीने म्हणाला.
“ त्यामुळेच का ह्या जयगर्जना ! त्यांना पाहून इतर बंदी गर्जना करीत आहेत वाटते. " जनमेजयाने विचारले.
"बेट्यांना मरण जवळ आहे ते दिसत नाही. आता गर्जत आहेत, मग ओरडतील रडतील.” वक्रतुंड म्हणाला.
“गर्जना करणाऱ्या मेघाला शेवटी वीज जाळते व मेघ रडू लागतो.” जनमेजय म्हणाला.
“या वाळवंटासही अग्नीच्या ज्वाळा जाळतील. रडत-ओरडत मरतील.” वक्रतुंड म्हणाला.
“उद्या सर्व राजबंदींना स्थानबद्ध स्त्रीपुरुषांना बाहेर काढावे. शृंखलांसह बाहेर काढावे. त्यांच्यादेखत नागानंद वत्सला यांची पहिली संयुक्त आहुती द्यावी. दांपत्याची संयुक्त आहुती ! अशा संयुक्त आहुत्या किती देता येतील? किती आहेत असे जोड?” जनमेजयाने विचारले.
“दोन हजारांवर आहेत. अजून येत आहेत. " वक्रतुंड म्हणाला.
प्रभात झाली. आज लाल लाल सूर्य उगवला होता. तो का संतप्त झाला होता? संसाराचे स्मशान करणाऱ्या मानवांचा का त्याला तिटकारा वाटत होता? आपण या मानवजातीसाठी रात्रंदिवस तापतो. परंतु ही मानवजात शेवटी पैकिंमतीची ठरली म्हणून का त्याला संताप आला होता? आपणच द्वादश नेत्र उघडावे व भस्म करावे सारे जगत् असे का त्याला वाटत होते? नाही. देवाला असे वाटत नाही. तो आशेने आहे. शेवटी सारे गोड होईल, आंबट आंबा पिकेल ही अमर आशा त्याला आहे.
प्रचंड होमकुंडे धडधड पेटू लागली. सर्वत्र सैन्याचे थवे ठायी सज्ज होते. कारागृहातून स्त्रीपुरुष नागबंदी बाहेर काढण्यात आले. त्यांना दोरीने बांधून उभे करण्यात आले. नागानंद व वत्सला यांनाही आणण्यात आले. एका बाजूला त्यांना उभे करण्यात आले.
राजधानीतील स्त्रीपुरुषाचे थवे लोटले. सर्वांचे डोळे भरून आले. ही निरपराध माणसे का आगीत फेकली जाणार? यासाठी का ही होमकुंडे धडधडत आहेत? अरेरे! त्या ज्वाळा ध्येयाकडे जाणाऱ्या जीवांच्या धडपडणाऱ्या आत्म्यांप्रमाणे दिसत होत्या. मानवात प्रेम नांदावे, बंधुभाव नांदावा यासाठी धडपडणाऱ्या जीवांना भेटून पवित्र होण्यासाठी त्या ज्वाळा तडफडत होत्या. ध्येयार्थी व्यक्तींना ध्येयाचा मार्ग विचारण्यासाठी त्या ज्वाळा उसळत होत्या. त्या तेजस्वी सूर्यनारायणाच्या चरणांशी आम्ही कसे जावे हे त्या ज्वाळांना विचारावयाचे होते. सूर्य त्यांचे ध्येय. तेजाच्या समुद्रात बुडण्यासाठी त्या वर जाऊ पाहत होत्या. प्रेमसमुद्रात, चित्सिंधूंत डुंबणारा मानवच आपणास मार्ग दाखवील असे त्या ज्वाळांना वाटत होते. ज्वाळांनो, वर वर जाणाऱ्या ज्वाळांनो! खाली केले तरीवर उफाळणाऱ्या अदम्य बाळांनो चालू द्या तुमची धडपड, उत्तरोत्तर, उच्चतर जाण्याची धडपड !
जनमेजय आला. वक्रतुंड आला. इतर मोठे मोठे राजपुरुष आले. तेथे एका सिंहासनावर महाराजाधिराज जनमेजय बसला. त्याच्या नावाने ललकारी झाली. परंतु सर्व नागबंदीनी “प्रेमधर्माचा विजय असो ! ऐक्याचा विजय असो !" अशी गर्जना केली.
“छाटून टाकू जिभा.” अधिकारी म्हणाला.
“आमची जाळून राख केलीत तरी त्या राखेतूनही प्रेमधर्माचा विजय असो हीच गर्जना होईल. ती गर्जना तुमच्या कानात शिरेल. तुमच्या हृदयात उठेल. ती गर्जना, तो मंत्र तुम्हाला ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही. " नागानंद म्हणाला.
वक्रतुंड भेसूर हसला. जनमेजयाने तिरक्या वक्रदृष्टीने पाहिले. “ आणा त्या दोघांना पुढे. " जनमेजयाने आज्ञापिले. वत्सला व नागानंद यास पुढे आणण्यात आले.
“तुम्ही आर्य दिसता. अनार्याजवळ का केलेत लग्न ? कस्तुरीने मातीच्या दिपळाशी मिळावे हे आश्चर्य आहे. पतीला सोडून देण्यास तयार असाल तर तुम्हाला मी सोडतो. आर्यांची हत्या माझ्या हातून शक्य तो होऊ नये अशी माझी इच्छा आहे. बोला, तुम्ही आहात तयार ? आर्यधर्माची सेवा करावयास आहात तयार? आर्यधर्म निर्मळ ठेवावयास आहात तयार ?” जनमेजयाने वत्सलेस विचारले.
“मी जगू इच्छित नाही, मी मरू इच्छिते. आर्यपुरुषांप्रमाणे मी उल्लू नाही, मी आर्यस्त्री आहे. आर्यपुरुषांनी खुशाल नागस्त्रिया भोगिल्या व त्याचा त्यागही केला. असला आर्यधर्म माझा नाही. तुम्ही आर्यपुरुष स्त्रियांना कचरा मानीत असाल. परंतु आम्ही आर्यस्त्रिया पुरुषांना कचरा मानीत नाहीत. तुमच्या अर्जुनाने उलूपी, चित्रांगी यांना रडत ठेविले. हा तुमचा आर्यधर्म वाटते? आर्यपुरुषांचा हा धर्म असेल, आर्यस्त्रियांचा निराळा धर्म आहे. मी नागानंदांना सोडणार नाही. पत्नीला सोडून पती जात असेल, परंतु पतीला सोडून पत्नी जाणार नाही. 'आपल्या पतीचा त्याग कर' असे तुला सांगवते तरी कसे? सावित्रीची कथा कधी ऐकली आहेस का? नदी समुद्राकडेच जाणार, ती का मागे वळेल? राजा, अधर्म करायला मला कसे सांगतोस? ही का तुझी संस्कृती? तुम्ही पुरुष संस्कृती बुडवायला निघालात; तरी आम्ही स्त्रिया ती बुडू देणार नाही आणि नागजात का वाईट? काय आहे त्यांच्यात वाईट? टाकून जाणाऱ्या आर्यांचे प्रेमस्मरण करीत पतिव्रता राहणाऱ्या त्या नागस्त्रिया, त्यांच्या चरणांचे तीर्थ घे व पवित्र हो. काय आहे तुझ्यात अधिक? कशाला आर्यांनी तोरा मिरवावा?' तिने तेजस्वी वाणीने विचारले.
“आम्ही आर्य क्रूर सर्पांची पूजा करून द्वेषी होत नाही. नाग द्वेषी असतात. माझ्या पित्याला कसे मनात दंश ठेवून त्या एका नागाने मारले तुम्हाला माहीत नाही? अशी ही जात, आर्यलोक सूर्याची उपासना करतात. परब्रह्माची प्राप्ती करून घेऊ पाहतात.” जनमेजय म्हणाला.
“नागांच्या ऋषींची तुझ्या पित्याने विटंबना केली. त्याने साप मारून ऋषीच्या गळ्यात अडकविले. म्हणून त्या नागतरुणाने त्याची हत्या केली. परंतु समजू या की, तो तरुण द्वेषी होता. आणि तू रे? त्या एका हत्येची हजारो नागांना जाळून बदला घेणारा तू, तू किती द्वेषी ? नागांची पूजा करून नागलोक द्वेषी नाहीत होत. ते तुमच्यापेक्षा अधिक उदार आहेत. नागांची पूजा नागांप्रमाणे क्रूर होण्यासाठी ते नाहीत करीत. क्रूर अशा नागातही ते परब्रह्म पाहून त्यांची उपासना करतात. सूर्य तेजस्वी आहे, मंगल आहे.
त्याच्या ठिकाणी पूज्य भाव धरणे सुलभ आहे. परंतु वाकड्या विषारी सापाचे ठिकाणीही मांगल्य पाहणे ही मोठी दृष्टी आहे. तुमच्या आर्यांच्या दृष्टीपेक्षा ही विशाल दृष्टी आहे. अशा सर्पाची पूजा करून नागलोक उदारचरित बनले आहेत. आमच्या गावात मी बुडत असता एक नागतरुणच धावला. त्या तरुणाच्या चरणी मी प्रेम नको वाहू तर का आर्यदगडांच्या वाहू! मी नागांविषयी सहानुभूती दाखवीत असे म्हणून माझ्या गावातील आर्य काही मला पाण्यातून काढण्यासाठी धावले नाहीत. हा ऐका आर्यधर्म? हा तर अकारण द्वेषधर्म आहे. राजा, आमच्या गावी वाघांचा उपद्रव होत असता या माझ्या नागानंदांनीच तो उपद्रव दूर केला. यांनीच आपले प्राण संकटात घातले असे हे नाग आहेत. तुम्ही आर्यच क्रूर आहात. तुमच्या पूर्वजांनी आपल्या भाऊबंदकीसाठी सर्व भरतखंडातील क्षत्रियांचा विनाकारण संहार केला. माझे आजोबा तुमच्या पूर्वजांच्या लढाईतच मरण पावले. तुम्ही आर्यांनी तुमच्या क्षुद्र भांडणासाठी लाखो स्त्रियांना रडविले. आणि आता आज तूही स्वतःच्या मनातील द्वेषासाठी लाखो निरपराधी नागांचे हनन व हवन करीत आहेत. तुमचा धर्म हेच का सांगतो? तुमचा धर्म का वधिक- धर्म आहे? तुमची संस्कृती अशी अनुदार व नृशंस असेल तर कोणाला वाटेल तिजविषयी अभिमान? तुमचा धर्म वधिकाचा असेल तर कोण त्या धर्माला हृदयाशी धरील? अशा संस्कृतीसमोर मान वाकविण्यापेक्षा मेलेले काय वाईट? अशा पापांत सहकारी होण्यापेक्षा अग्निकाष्ठे भक्षिलेली बरी. राजा, टाक, जाळून टाक. सत्याला, प्रेमाला तपश्चर्येला, सतित्वाला, पावित्र्याला, निरपराधीपणाला जाळून टाक. आयांना मुलांसह जाळ. पतींना पत्नीसह जाळ. मित्रांना मित्रांसह जाळ. आर्यधर्माची ही द्वेषध्वजा फडकव. सूर्याची उपासना करणारे तुम्ही आर्य! सूर्याप्रमाणे सर्वांची जीवने समृद्ध करणे, ती प्रकाशमान करणे, ती आनंदमय करणे हा वास्तविक सूर्योपासकांचा धर्म ! तुम्ही विष्णूची पूजा करणारे. सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या तेजोमयाला पाहणारे. सर्वांच्या ठायी प्रकाश पाहणे, पावित्र्य पाहणे, मांगल्य पाहणे म्हणजेच परब्रह्मप्राप्ती! राजा, द्वेषाने नाही रे देवदर्शन. अशी खाली का मान घालतोस? तुझ्या द्वेषाग्नीला शांत करण्यासाठी आम्ही भगिनी येथे उभ्या आहोत. प्रथम आम्हा दोघांची आहुती दे. प्रेमपूर्ण जीवनाची आहुती!”
होमकुंडे धडधडत होती. राजा का फेकणार नागानंद व वत्सला यांना? जनमेजय का जाळणार त्या हजारो स्त्री-पुरुषांना? एकेक क्षण म्हणजे मरणाचा जात होता.
“राजा, यांना करू अर्पण?" वक्रतुंडांने विचारले. राजा बोलेना. खाली मान घालून तो बसला होता.
“राजा, काय आहे आज्ञा ?” वक्रतुंडाने पुन्हा विचारले.
*आज या सर्वांना घेऊन जा. विचार करायची त्यांना संधी देऊ या. वत्सले, आणखी विचार कर. तुला अवधी देतो, किती अवधी ते आज सांगत नाही. जा या सर्वांना घेऊन, " जनमेजयाने आज्ञापिले.
सर्वांना हायसे वाटले. बलिदानार्थ काढलेल्या त्या सर्वांनी प्रभूला मनात धन्यवाद दिले. त्यांचे डोळे भरून आले होते.