प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान वादळात बुडणार? अशी धास्ती वाटू लागली होती. प्रयोगपतीच्या श्रद्धेची परीक्षा होती. त्याने प्रयत्न सुरू ठेवले. श्रद्धेस यश आले. पहिले पाऊल टाकण्यात आले.
प्रयोगपतीने परमेश्वरास मंगल गीतांनी जागे केले. प्रभू चिंतनातून उठला. प्रयोगपतींचे आनंदी मुख पाहून त्याला समाधान वाटले.
“पहिला प्रयोग पार पडला ना?” प्रभूने विचारले. “होय. देवा!” प्रयोगपती नम्रपणे म्हणाला.
प्रभू म्हणाला, “प्रयोग पुढे चालू दे. आणखी अन्य मानवी प्रवाह या भरतभूमीत आणा. ऐक्याचे पाऊल आणखी पुढे पडू दे. नाना धर्म, नाना संस्कृती येऊ देत हळूहळू एकत्र. प्रथम प्रथम स्पर्धा होईल. झगडे होतील. परंतु त्यातून शेवटी परमैक्य प्रकट होईल. माझ्या दृष्टीने ते सर्व संस्कृतीचे ऐक्य दिसत आहे. भरतभूमीत ती माझी इच्छा तृप्त झालेली मला दिसत आहे. आर्य व नाग यांच्या ऐक्यात किती अडचणी आल्या! परंतु त्या काहीच नव्हत्या. पुढे याहून मोठ्या अडचणी येतील. ज्या नागांची व आर्यांची आज एकी झाली त्यातूनही पुढे निराळे प्रश्न उत्पन्न होतील. आर्य लोक नागांची संस्कृती आत्मसात करतील. परंतु नागांना खाली खाली लटकतील. त्यांना एक प्रकारे ठिकठिकाणी अस्पृश्य करतील. त्यांच्या शेत्याभात्या जप्त करतील. त्यांना केवळ परावलंबी करतील. त्यामुळे आर्य व नाग यांच्या झगड्याऐवजी स्पृश्य व अस्पृश्य या नावाने झगडा सुरू होईल. परंतु त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. काही उदार स्पृश्य ह्या अस्पृश्यांना पुन्हा प्रेमाने जवळ घेऊ पाहतील. परंतु मग अस्पृश्यच रागावून दूर राहू लागतील. ते म्हणतील, 'आम्ही अलगच राहू' परंतु त्यांचा हा राग हळूहळू दूर होईल. प्रथम आई रडणाऱ्या मुलाला घेत नाही. मग ती त्याला घेऊ गेली तर चिडलेले मूल आईजवळ जात नाही. तसेच हे आहे. परंतु शेवटी मायलेकरे एकत्र येतीलच. तसे हे प्रवाह पुन्हा जवळ येतील. तसेच हिंदू व मुसलमान असे झगडे होती. हिंदू-मुसलमान प्रथम लढतील, भांडतील. परंतु मागून ते एकमेकांची संस्कृती अभ्यासू लागतील, एकमेकांच्या सुंदर चालीरीती घेतील. एकेमकांच्या निरुपद्रवी धार्मिक आचारांविचारांस मान्यता देतील. एकमेकांच्या साधुसंतांस भजतील. परंतु पुन्हाही कोणी मध्येच व्यत्यय आणतील. पुरी होत येणारी इमारत ढासळू लागेल. या देशाची शकले करण्याचे विचार उत्पन्न होतील. प्रयोगपते, तुझे हजारो वर्षांचे प्रयत्न मातीत मिळणार, असे तुला वाटेल. सर्वांना अंधार घेरील. कसे पाऊल टाकावे असा विचार पडेल. परंतु ह्या देशाचे तुकडे करा असे म्हटले जाताच झोपलेलेही जागे होतील. न बोलणारेही बोलू लागतील. सर्व सत्प्रवृत्तीचे लोक पांगलेले होते ते एक होतील. म्हणतील, नाही होऊ देणार तुकडे. आम्ही एकत्र राहू. परस्परांचे मांगल्य पाहू, तडजोड करू. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्नच सारे उठतील व ऐक्याचे प्रयत्न करू लागतील.
प्रयोगपते, मधूनमधून असे कसोटी घेणारे प्रसंग येतीलच. त्या त्या काळी निरनिराळ्या वेषांत निरनिराळ्या मिषांनी काही वक्रतुंड नेहमी राहतीलच तुझ्या प्रयोगाला विरोध करण्यासाठी उभे. ते आपापल्या समूहास दुसऱ्यांपासून सर्वस्वी अलग राहावयास शिकवतील. लहान लहान मुलांची मने द्वेषाने भरू पाहतील. रात्रंदिवस सर्वांच्या कानीकपाळी 'द्वेष द्वेष', 'सूड सूड' म्हणून ओरडत राहतील. आणि शेवटी सर्वांना सांभाळू पाहणाऱ्या ऐक्याचा विजय होईल. जीवनाचे स्वरूप शेवटी संहार हे नसून सहकार्य हे आहे ही गोष्ट सर्वांना पटेल. द्वेष सदैव विजयी होऊ शकत नाही. आत्म्याला सर्वांना भेटण्याची इच्छा असते. कोंडी फोडून उड्डाण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. कवची फोडून, अंडे फोडून पक्षी बाहेर पडतो व अनंत आकाशात नाचू गाऊ लागतो, त्याप्रमाणे मानवी आत्माही सर्व कृत्रिम बंधने तोडून पंख फडफडवून बाहेर पडेल. द्वेषाचीच उपनिषदे पसरवणारे वक्रतुंड सरळ होतील.
उच्च ध्येयासाठी ज्या वेळेस आस्तिकांसारखी एखादी महान विभूती शांतपणे प्राणयज्ञ करावयास उभी राहते, त्या वेळेस सर्व लोक गंभीरपणे, उत्कटपणे विचार करू लागतात आणि त्या विभूतीभोवती गोळा होतात. उदात्त त्याग शेवटी विजयी होतो. सकळ चराचरासाठी रात्रंदिवस जळणाऱ्या सूर्याभोवती इतर ग्रहोपग्रह शेवटी प्रदक्षिणा घालू लागतात व त्याच्यापासून प्रकाश घेऊन प्रकाशमान होतात. सर्वोदयासाठी निरपेक्षपणे सर्वस्वाचा होम करणाऱ्यांच्या भोवती मानवी समाज शेवटी प्रदक्षिणा घालील. अशा रीतीने विरोधातून शेवटी विकासच विजयी होऊन बाहेर पडेल. म्हणून तू कधीही निराश होऊ नकोस. घाबरु नकोस. सत्प्रवृत्तीवर विश्वास ठेवून काम कर. शेवटी सत्याचा जय होईल, यावर श्रद्धा ठेव. सत्कर्मासाठी धडपडत राहा. मानवांना प्रेमाने जवळ आणण्यासाठी झट. एकमेकांचा चांगुलपणा पाहावयास शिकव. या सुंदर व विशाल भारतदेशात मानवैक्याचा प्रयोग संपूर्णपणे यशस्वी होईल. तो यशस्वी झालेला माझ्या डोळ्यांस दिसतही आहे!”
“प्रभो, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशक्य वाटणारे शक्य करू. मानव शेवटी अंतर्यामी एक आहे हे सर्वांना कळून पराकोटीचा आनंद होईल. देवदेवा, तू चिंतनात रमून जा. आम्ही तुझे पाईक काळजीपूर्वक श्रद्धापूर्वक प्रयोग परिपूर्णतेस नेल्याशिवाय राहणार नाही. या भव्य व सुंदर भारतदेशात तो प्रयोग शेवटच्या परिणत दशेला आला की आम्ही तुला हाक मारू. प्रयोगाचे हे फळ पिकून गोड झाले की ते तुझ्या मंगल चरणी वाहू व कृतार्थ होऊ." प्रयोगपती म्हणाला.
प्रभूने चिंतनसिंधूत पुन्हा बुडी घेतली प्रयोगपती पुन्हा पुढील कार्याला लागला. महान देवदत्त कार्य! देवाचा महान भारतीय प्रयोग !