१. काळाची कल्पना
भारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या कल्पनेत मोठे स्वारस्य आहे. मनुष्य जितका विशाल दृष्टीचा, तितकी त्याची काळाची कल्पनाही विशाल असते. महात्माजी म्हणाले, “मी सहा महिन्यांतच स्वराज्य देतो.” परंतु हे महात्माजींचे सहा महिने. पन्नास वर्षांत राष्ट्राला स्वराज्य मिळाले, तरी ते सहा महिन्यांतच मिळाल्यासारखे आहे. राष्ट्राच्या आयुष्यात शतके म्हणजे क्षण असतात. व विश्वाच्या इतिहासात युगे म्हणजे क्षण असतात.
महापुरुष या दृष्टीने पाहात असल्यामुळे ते निराश होत नसतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की जातो तो क्षण महत्त्वाचा मानावयाचा नाही. याच क्षणी कार्य झाले पाहिजे असा तर निश्चय हवा. परंतु त्याबरोबरच, एकनिष्ठ प्रयत्नाबरोबर काळ अनंत आहे ही कल्पना जवळ असावी. जगात काही फुकट जाणार नाही. प्रयत्नवाद व आशावाद या दोहांचा समन्वय भारतीय संस्कृती करते.
२. श्राद्ध
पूर्वजांबद्दल अत्यंत आदर पौर्वात्यांत आहे. चीन व जपान या देशांत वृद्धपूजा हा धर्मच झाला आहे. भारतीय संस्कृती वृद्धांबद्दल आदर शिकविते. तुम्ही भारतात कोठेही जा, तेथे वृद्धांबद्दलची पूज्यबुद्धी दिसेल. खेड्यांत तुम्ही जा. म्हाताऱ्या मंडळींस मोठ्या आदराने तेथे वागवितात. म्हातारा मनुष्य भेटताच “या दाजी” असे म्हणून घोंगडी पसरतात.
घरातही वृद्धांना फार मान. काही समारंभ असो, आधी त्यांना नमस्कार. त्यांना लोडाशी बसवितील, त्यांचा आशीर्वाद घेतील. त्यांचे पाय चेपतील, त्यांच्या गोष्टी ऐकतील.
वृद्धपूजा म्हणजे ज्ञानपूजा. ज्ञानपूजा म्हणजे अनुभव. अनुभव
म्हणजे ज्ञान.
त्या शुभ्र केसांत अनुभवाचे शुद्ध ज्ञान असते. त्या वाकलेल्या पाठीवर अनुभवांचे मौल्यवान गाठोडे असते. त्या सुरकुतलेल्या शरीरावर कित्येक वर्षांचा इतिहास असतो. पूर्वीची परंपरा वृद्धांना माहीत असते. त्यांनी तो परंपरेचा दीप स्वतः पाजळून नवीनांच्या हातांत दिलेला असतो.
भारतीय संस्कृतीत श्राद्धदिन आहे. श्राद्ध म्हणजे पूर्वजांबद्दल आदर. महात्म्यांचे श्राद्ध सर्वांनी करावयाचे. श्रीरामचंद्र किंवा श्रीकृष्ण यांचे आपण श्राद्ध करीत नसतो, परंतु त्यांची जयंती करीत असतो. ज्यांना आपण अवतार मानिले, त्यांची जयंती करावयाची. कारण जन्मच मंगलासाठी असतो.
भवोहि लोकाभ्युदयाय तादृशाम् । ते जन्मताच दिशा प्रसन्न होतात, वारे मधुर वाहतात. परंतु इतर लोकांचे तसे नाही. इतर लोक कसे होते हे ते मेल्यावर कळते. त्यांची सारी आयुर्मर्यादा पाहून मग त्यांचे मोल ठरवावयाचे असते. श्रीज्ञानदेव, श्रीतुकाराम, श्रीशिव छत्रपती यांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. कारण जन्मतःच त्यांचा मोठेपणा ज्ञात नव्हता तो पुढे ज्ञात झाला. श्रीशिवछत्रपतीही पुढे अवतार समजले जाऊ लागले व त्यांची जयंती करण्यात येऊ लागली.
थोर महात्मे हे कोण्या जातीचे, कोण्या गावाचे नसतात. ते सर्वांचे असतात. म्हणून त्यांच्या श्राद्धांत सर्वांनी गोळा व्हावयाचे. काही महात्मे जगाचे असतात. काही देशाचे असतात. काही प्रांताचे असतात. काही गावाचे असतात. त्यांचे त्यांचे उत्सव त्या त्या मानाने साजरे होतात.
परंतु आपले आई-बाप आपल्याला मोठेच आहेत. आपले पूर्वज आपणांस पूज्यच आहेत. ते जगाला माहीत नाहीत, परंतु आपणांस माहीत असतात. त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. कृतज्ञतेसारखी मधुर वस्तू क्वचितच असेल.
भारतीय संस्कृती रोज पितृतर्पण व ऋषितर्पण करीत असते. ऋषींचे स्मरण व पूर्वजांचे स्मरण. ज्यांनी ज्ञान दिले त्यांचे स्मरण. ज्यांनी देह दिला त्यांचे स्मरण. सर्वांची नावे आपण कशी घेणार? त्या तर्पणात काही नावे असतात. परंतु ती नावे सर्व ज्ञात-अज्ञात ऋषींची व पितरांची प्रतिनिधिभूत असतात.
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले स्मरण. ज्या दिवशी आई - बाप वारले, त्या दिवशी त्यांचे स्मरण करावयाचे. आपण तीन पिढ्यांचे स्मरण करतो. परंतु तीन पिढ्यांचे स्मरण म्हणजे जणू सर्वांचेच स्मरण असते. श्राद्धाच्या दिवशी घर सारवून स्वच्छ ठेवावयाचे. एक प्रकारे गंभीर वातावरण घरात असते. पिंडांना नमस्कार करण्यासाठी घरातील लहानथोर जमतात. आप्तेष्ट येतात. श्राद्धाच्या दिवशी तीनच पिढ्यांचे स्मरण. परंतु सर्व पूर्वजांबद्दल एक दिवस वर्षांतून ठेविलेला आहे. भाद्रपद महिन्यातील अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून मानलेली आहे. त्या दिवशी सर्व पितरांचे स्मरण करावयाचे.
श्राद्ध म्हणजे कृतज्ञता. रोज आपण आपल्या व्यवहारात दंग असतो. परंतु वर्षातून एक दिवस तरी आई-बापांचे स्मरण हवे. भारतीय संस्कृतीत श्राद्धाला फार महत्त्व आहे. पाणी देण्यास कोणी तरी हवे, नाही तर मरणोत्तर गती नाही असे समजण्यात येई. नरकापासून तारतो तो पुत्र, अशी पुत्र शब्दाची व्युत्पत्तीही देण्यात येई. ज्याला पुत्र नाही, त्याचे घर अमंगल मानण्यात येई. पुत्राशिवाय घराला शोभा येत नाही.
याचा अर्थ एवढाच की परंपरा चालावी. आपण आपली कुलपरंपरा कोणाच्या तरी हातात देऊन निघून जावे. जो वंशतंतू आपल्या हातात आला, तो आपण तोडणे म्हणजे पाप आहे. तो तंतू अखंड ठेविला पाहिजे. अशा रीतीने आपण अमर होत असतो. पुत्र असला म्हणजे पितरांना स्वर्ग मिळतो. पितर अमर होतात. पुत्रांच्या रूपाने ते अमर होतात. सर्व पूर्वजांचे पुंजीभूत स्वरूप पुढील वंशतंतूंस असते; म्हणजेच ते सारे अमर होतात हा अर्थ.
प्रत्येक देशात ही श्राद्ध-कल्पना आहे. पाश्चिमात्य देशांत
पुण्यतिथींच्या दिवशी समाधीवर फुले वाहतात.
श्राद्धाच्या दिवशी दोन हेतू प्रधान असतात. एक पूर्वजांचे कृतज्ञतेने स्मरण आणि दुसरे आपणासही असे मरावयाचे आहे, याचेही स्मरण. श्राद्धाच्या दिवशी दान करावे. एक दिवस सारे सोडून जावयाचे आहे, त्याची तयारी करावयाची. थोडे थोडे देऊन टाकावयास शिकावयाचे. श्राद्धदिन म्हणजे नम्रता शिकण्याचा दिन, अनासक्ती शिकण्याचा दिन, “कर्तव्य नीट कर, केव्हा जावे लागेल याचा नेम नाही” अशा चेतवणीचा दिन.
श्राद्धाच्या दिवशी आपण ब्राह्मण बोलावतो. त्यांना भोजन देतो. श्राद्धाचे स्वरूप कालाप्रमाणे बदलेलही. समजा, आज कोणी असे जेवण वगैरे न दिले, तरी तो अधर्म आहे असे नाही. दुसऱ्या स्वरूपात दान दे. खादी घेऊन ती वाट. एखाद्या संस्थेला साहाय्य कर. परंतु श्राद्ध केलेच पाहिजे. श्रद्धेने, कृतज्ञतेने पूर्वजांचे स्मरण व आपल्या मरणाचे स्मरण ताजे राहावे म्हणून त्या निमित्ताने त्याग, असा श्राद्धविधी आहे.
३. एकान्त एकाग्रता
भारतीय संस्कृतीत एकान्त ही एक महत्त्वाची वस्तू आहे. संसाराच्या रामरगाड्यातून मन जरा अलिप्त करावयाचे. मन शांत करावयाचे. मनावरची सारी सुखदुःखाची गाठोडी क्षणभर काढून फेकून द्यावयाची. मनाला मुक्त करावयाचे.
एकान्त म्हणजे विश्रांती. त्या वेळेस आपण आपल्या खोल स्वरूपाशी जणू मिळून जावयाचे. आत आत जावयाचे. आकाशात शेकडो ढग येतात, हजारो वारे सुटतात, धुळीचे लोट उठतात, पाखरे उडतात. परंतु या सर्वांच्या पाठीमागे आकाश निळे निळे असते. त्या आकाशाला या गोष्टींचा स्पर्श नाही. आपले हृदयाकाश असेच करावयाचे. रिकामे करावयाचे. स्वच्छ करावयाचे. यासाठी एकान्ताचा आश्रय करावयाचा.
जरा सायंकाळी टेकडीवर जाऊन बस. नदीकाठी जाऊन बस. उचंबळणाऱ्या सागराला पाहा. रमणीय बागेत जा. जरा संसारातील त्रास, चिंता विसर. परंतु मनुष्याला संसाराचा इतका हव्यास आहे, की तो फिरावयासही एकटा जाणार नाही. चार जणांना हाक मारून फिरावयास जाईल. तोच संसार बरोबर. त्याच गप्पा. कचेरी- कोर्टाच्या गप्पा, शाळा-कॉलेजातील गप्पा, आपापल्या कर्मक्षेत्रातील गप्पा. सर्वांची निंदास्तुती चालावयाची.
आपले मन म्हणजे जणू उकिरडा ! साऱ्या जगाची घाण जणू तेथे येऊन पडलेली असते. आपले मन म्हणजे जणू चावडी किंवा चव्हाटा. सर्वांची चर्चा या मनात सदैव चाललेली. अमेरिकेतील निसर्गप्रेमी थोरो याने एके ठिकाणी असे म्हटले आहे: “Our mind is like a bar-room !” वकिलांच्या बैठकीत साऱ्या जगाच्या उठाठेवी चालतात, तसे आपल्या मनाचे आहे.
परंतु या मनाला स्वतःच्या आत्म्याची ओळख नसते. त्याला स्वतःच्या जीवनात काही आनंदच नाही. आनंदाचा झरा आत आहे याची जाणीव त्याला नाही. त्याचा आनंद परवश आहे. वर्तमानपत्र वाचले नाही की चुकल्यासारखे होते. कोणाचे पत्र आले नाही म्हणजे वाईट वाटते. ज्याचे टपाल रोज पुष्कळ येते, त्याला वाटते आपण केवढे मोठे! जगाशी किती संबंध!
परंतु हा मोठा मनुष्य दरिद्री असतो ! त्याला त्याच्या आत्म्याचे एकही पत्र मिळत नसते. त्या आत्म्याची एकही हाक त्याला ऐकू येत नसते. या आत्म्याची पत्रे ज्याला येऊ लागली, त्याच्याहून भाग्यवान कोण? या आत्म्याची नेहमी उपेक्षा होत असते. तुरुंगात ज्याप्रमाणे कैद्याची उपेक्षा होते, परंतु तुरुंगाच्या भिंतीची प्रत्येक क्षणी पाहणी होते, लिंपालिंपी होते, त्याप्रमाणे या देहातील कैदी जो आत्मा त्याची उपेक्षा होते. परंतु या देहाची मात्र कोण काळजी! तो कैदी आत मरत आहे! अरे, त्याची जरा गाठ घे.
एकान्ताची ज्याला सवय आहे, त्याची पटकन एकाग्रताही होते. एकाग्रतेची आपणांस फार आवश्यकता असते. कोणताही प्रश्न सोडविताना मन एकाग्र करता आले पाहिजे. संसार वा परमार्थ, त्या त्या वेळच्या महत्त्वाच्या गोष्टी उलगडताना जर मनाची, बुद्धीची एकाग्रता करता आली नाही, तर प्रश्न सुटत नाही. आपण गोंधळून जातो. महात्माजींच्यासारखे महापुरुष पटकन चित्त एकाग्र करून सर्व परिस्थितीचे आकलन करून घेऊ शकतात.
एकान्तात आपणांस सामर्थ्य मिळते, आशा मिळते. जणू देवाघरी जाऊन ताजेतवाने होऊन येतो. एकान्त म्हणजे एक प्रकारे मरण. मरणानंतर जसा पुन्हा नवीन जन्म, त्याप्रमाणे एकान्तातून जणू पुनर्जन्म होऊन आपण बाहेर पडतो.
आपल्या सर्वांच्या घरात देवघर असते. ती एकान्ताची जागा. तेथे जाऊन सारे काही विसरावयाचे. देवाजवळ उघडे व्हावयाचे. त्याचा हात सर्वांगावरून फिरवून घ्यावयाचा. केवढे समाधान ते असते! केवढी शांती!
देवाजवळ क्षणभर बसून आलेला मग दानवांना भारी होतो. अपार चैतन्य त्याच्याजवळ असते. दुर्दम्य आशावाद तो घेऊन येतो. श्रद्धेचे सामर्थ्य घेऊन येतो. एकान्त म्हणजे संजीवनसिंधू घेऊन मिळविण्याची जागा. एकान्तात हसण्यासाठी रडणे असते. उड्डाण करण्यासाठी संकोच असतो. कर्माचा जोरदार वेग निर्माण करण्यासाठी कर्मशून्यच असते. एकान्त म्हणजे सर्व सामर्थ्याचा साक्षात्कार !
एकान्त म्हणजे माणूसघाणेपणा नव्हे. जगाला तुच्छ लेखणे नव्हे. जगाला विटणे नव्हे. एकान्त म्हणजे स्वतःचे बरबटलेले जीवन धुऊन टाकण्याची जागा. चिखलाने अत्यंत भरलेले वस्त्र ज्याप्रमाणे एका बाजूला जाऊन आपण धुतो, त्याप्रमाणे अत्यंत मलिन झालेले जीवन एकान्तात जाऊन धुवावयाचे. समाजाची सेवा अधिक उत्कटतेने व आशेने, अधिक सामर्थ्याने व श्रद्धेने करता यावी म्हणूनच एकान्त सेवावयाचा. मरण म्हणजे सर्वांत मोठा एकान्त !