ब्रह्मा, ताडपत्रावर लिहिण्याची चाल, जादुमंत्र, संस्कृताचें मूळ, आटक नदीचे पलीकडेस जाण्याची बंदी. पूर्वी घोडी वगैरे जनावरें ब्राह्मण लोक खात होते, भट, राक्षस, यज्ञ, बाणासुरांचे मरण, परवारी, सुताचे पाष्टींचे चिन्ह, बीजमंत्र, माहार, शूद्र, कुळकर्णी, कुळंबी, कुणबीण, शूद्रांचा द्वेष, सोंवळें, धर्मशास्त्र, मनू, भट, पंतोजींचे शिक्षण, मोठा भयंकर परिणाम, प्रजापतींचे मरण, ब्राह्मण इत्यादिकांविषयी.
थो० वामन मेल्यामागें उपाध्यांचा कोण अधिकारी झाला ?
जो० या प्रसंगी थोर कुलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही, सबब ब्रह्मा या नांवाचा एक पटाईत कारकून होता, तोच सर्व राज्यकारभार चालवू लागला, तो मोठा कल्पनेबाज व जशी वेळ पडेल तसे वागून आपला मतलब साधाणारा होता त्याच्या बोलण्याचा काडीमात्र विश्वास नसे, म्हणून त्यास चार तोंडांचा ब्रह्मा म्हणण्याचा प्रचार पडला असावा. सारांश, तो अतिशय दक्ष, हट्टी, धूर्त, धाडस आणि निर्दय होता.
थो० ब्रह्मानं प्रथम काय काय केलें?
जो०- ब्रह्माने प्रथम ताडपत्रांवर खिळ्यानें उकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही इराणी जादूमंत्र व ज्या कांही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कित्येक गोष्टी त्यांत सामील करून त्या सर्वाचें त्यानें त्यावेळच्या सर्वकृत (ज्याचा अपभ्रंश संस्कृत) चालू भाषेत, आतांच्या फारशी बयतीसारिखीं लहान लहान कवनें करुन त्या सर्वांचा सार ताडपत्रावर टिपून ठेविला पुढं त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेर्णेकरून बह्याच्या मुखापासून त्या कादंबऱ्यासहित जादूमंत्र विद्या निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी. इतक्यांत उपाध्ये लोक उपासाने मरू लागले, यामुळे ते इराणांत परत माघारे चोरून छपून पळून जाऊ लागले; तेव्हा त्यानें आटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लघून पलीकडेस जाऊं नये म्हणून तलाख घालून बंदोबस्त केला.
धों० त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले जीव वाचविले?
जो०- त्यांनी मग तेथील झाडांचीं फळें, पाने, जमिनींतील कंदमुळे व जंगलांतील अनेक तऱ्हेचे पशुपक्षी तर काय, पण कित्येकांनी अखेरीस आपल्या बसल्या घोड्यांचासुद्धां वच करून त्यांस भाजून खाऊन आपले जीव वाचविले. यामुळे त्यांजवरचे रक्षक त्यांस भ्रष्ट म्हणू लागले. पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस, आणि भ्रष्ट या शब्दाचा अपभ्रंश भट झाला. नंतर त्या भटानी अशा अडचणीत पडल्यामुळे नाना तऱ्हेच्या प्राणीमात्रांचे मांस खाल्लें व त्याची त्यांस लाज वाटू लागल्यामुळे त्यांनी तें खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे; परंतु त्यातून कित्येक भटांस मांस खाण्याची रुची लागलेली संवय सुटेना, त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्या नीच कर्माचा दोष छपविण्याकरितां पशूंचा वध करून त्यांचं मांस खाण्यामध्ये अगाध पुण्य आहे म्हणून त्या पशूचे वधास पशूयज्ञ, अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नावे देऊन ती ग्रंथी दाखल केली.
थों० नंतर ब्रम्ह्याने काय केलें?
जो०- पुढे बळी राजाचा पुत्र बाणासूर मरताच त्याच्या एकदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे, जिकडे पहावें तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐषआरामात गुंतला. अशी संधी पाहून ह्याने आपल्याबरोबर त्या सर्व बुभुक्षित भट परिवारांस (ज्याचा अपभ्रंश हल्ली "परिवारी" होय) घेऊन त्याने राक्षसावर (रक्षकावर) एकाएकीं रात्री घाला घालून त्यांचा अगदी मोड केला. नंतर त्यानें बाणासुराच्या राज्यांत शिरण्याचे पूर्वी असा विचार केला की, पुढे कदाचित् न जाणों आपल्यावर एकादें संकट येऊन आपली सर्वाची दाणादाण झाल्यास पुनः आपण आपल्या परिवारातील एकमेकानी एकमेकांस ओळखून काढिता घावें, म्हणून ब्रम्ह्याने एकंदर सर्व आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यांत एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचें जातीसूचक चिन्ह म्हणजे ज्यास हल्लीं ब्रम्हसूत्र म्हणतात ते घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीजमंत्र, म्हणजे ज्यास हल्ली गायत्री म्हणतात, ती शिकवून पुढे त्याजवर कसाहि प्रसंग गुजरला, तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रियास सांगू नये म्हणून तलाख मारून टाकिली यावरुन भट लोक आपापल्या परिवारातील एकमेकांस एकमेक सहज ओळखून काढू लागले.
झो० यानंतर ब्रम्ह्याने काय केलें?
जो० नंतर बम्ह्याने त्या आपल्या सर्व परिवारी भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्याने त्यांतील कित्येक लहानमोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेताच त्यापैकीं रणांगणीं कबरा बांधून लढणाऱ्या महाअरी (हल्लींचा ज्याचा अपभ्रंश महार होय) क्षत्रियांशिवाय जे लोक त्याच्या तावडींत सांपडले होते तेवढ्यांचे मात्र त्यानें सर्व हरण करून त्या सर्वास केवळ सत्तेच्या मदानें क्षुद्र लोक (ज्याचा अपभ्रंश शूद्र होय) मानून आपले दास केले. त्यांतून कित्येकांस आपल्या लोकांच्या घरोघर सेवाचाकन्या करण्याकरिता वाटून दिलें. बाकी राहिलेल्या शुद्रांची गांवोगांव एकेक भटकामगार पाठवून कुळेवारी करून त्यांजपासून शेतातील काम करून घेऊन, त्यांचे पोटापुरतें अन्न देण्याची वहिवाट घातली. यावरून त्या कामगाराचे नाव कुळेकरणी पडलें. (ज्याचा अपभ्रंश कुळकर्णी होय) त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळांची नावे कुळवाडी अशी पडली, (ज्याचा अपभ्रंश कुळंबी अथवा कुणबी होय) व त्या दास कुणब्यांच्या स्त्रियास नेहमी शेती पुरते काम नसल्यामुळे कधीं कधीं कारणपरत्वें भटांच्या घरी सेवाचाकऱ्या करावयास जावें लागत असे; यास्तव कुणबीण आणि दासी या दोन शब्दांमध्ये तीळमात्र भेद दिसून येत नाहीं वर लिहिलेल्या मूळ आधारावरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होत जाऊन शूद्रांस किती नीच मानू लागले की, त्याविषयी सर्व हकीकत लिहू गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल, या भयास्तव त्यापैकी कांहीं कांही. सांप्रत मुद्दे आढळतात, ते थोडक्यात येथे लिहितो, ते येणेप्रमाणे:- हल्लींचे भट (मग ते झाडणाऱ्या मांगा महारासारिखे अक्षरशून्य का असेनात) उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही तीं नीच कर्मे आचरून पापपुण्याचा विधिनिषेध न मानितां अज्ञानी शुद्रांस फसविण्यास काडीमात्र मागेपुढे पाहात नाहीत. शेवटीं त्यांचा कोठें उपाय चालेनासा झाला म्हणजे ते शूद्रांचे दारोदार धर्माच्या मिषानें दोम दोम करून आपली कशी तरी पोटे जाळतात; परंतु शूद्रांचे चाकर होऊन त्यांच्या शेतात गुर्रे सांभाळून त्यांच्या गोठ्यांतील शेण वाहून शेणखईत नेऊन टाकण्यास, नांगर, कुळव, मोटा आणि गाड्या हांकण्यास, खांदणी, खुरपणी आणि कोळपणी करण्यास, सोनखताच्या पाट्या डोईवर वाहून झाडास खतविण्यास, कडब्याच्या आळाशा वाहून गंजी रचण्यास, रात्री हातांत काठ्या घेऊन शेताची राखण करण्यास व त्यांचे शेतांतील धान्याची व भाजीपाल्याची ओझी वाहून त्यांच्या घरीं नेऊन टाकण्यास लाजतात, ते शूद्रांचे घरी चाकरीस राहून त्यांची घोडी खाजवून त्यांच्या घोड्यापुढे धांवण्यास, त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास, त्यांच्या घरांतील झाडलोट करून त्यांची उष्टी काढून खरकटी भांडी घासण्यास, त्यांच्या घरांतील समया घांसून दिवे लावण्यास व त्यांच्या घरीं चिखलमाती वाहून बिगाऱ्याचे काम करण्यास लाजतात. त्याचप्रमाणे भटणी शूद्रांच्या चाकरिणी होऊन त्यांच्या स्त्रियास उटणी लावून त्यांस नाहू घालून त्यांचे केस विंचरण्यास, त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्याचे पाय चेपण्यास व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धुऊन त्यांचे जोडे सांभाळण्यास लाजतात. पुढे जेव्हा ते महाअरी आपल्या शूद्र बांधवांस भटांच्या हातांतून सोडवावे म्हणून भटावर हमेशा हल्ले करू लागले, तेव्हा एकंदर सर्व भट, शूद्रांचा इतका द्वेष करू लागले कीं ते शूद्र शिवलेले अन्नसुद्धा खाईनातसे झाले व त्याच द्वेषावरून हल्लींचे भट शूद्र शिवलेले अन्न तर काय पण ते शूद्र शिवलेले पाणीसुद्धा पीत नाहींत त्यांनी आपणांस कोणी शूद्रांनी शिवूं नये याजकरिता सोवळें होण्याची चाल पाडली. पुढे कित्येक शूद्रद्रोही भटग्रंथकारानी जनाची तर नाहीं, पण मनाची सुद्धा काडीमात्र लाज न धरितां सधी पाहून त्या सोंवळ्याचें इतके महत्व वाढविलें को सोवळ्या भटास एकादे शूद्राचा स्पर्श झाला असतांसुद्धां तो वास्तविक अपवित्र होतो, म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तकें करून ठेविली आहेत; व कांहीं कालानंतर शूद्रांस आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीं तरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहीत, या भयास्तव शूद्रांस मुळींच कोणी ज्ञान शिकवूं नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले, इतकेंच नाहीं परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थ संबंधी ग्रंथ वाचीत असल्यास त्यांतील एक शब्दसुद्धां शूद्रांचे कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकिला याविषयी मनुसंहितेत दाखलेही सांपडतात, त्या आधारावरुन हल्लीचे सोवळे भट तसले अपवित्र पुस्तक शूद्रांचे समक्ष वाचीत नाहीत. आता जरी। ख्रिस्ती म्हणविणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकानें विद्याखात्यांतील पोटार्थी भटपंतोजीच्यानें शूद्रांस आम्ही लिहिणें शिकविणार नाहीं, असें उघड तोंडाने म्हणवत नाहीं, तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शूद्रांस त्यांविषयीं खरा समज देऊन आपलें महत्व कमी करून घेववत नाहीं. सबब ते शूद्रांचे मुलांस केवळ कामापुरतें व्यावहारिक ज्ञानसुद्धां न शिकवितां ते त्यांच्या मनात अनेक तऱ्हेची अपुरती देशाभिमानाची खोटी तत्वें मात्र भरवून त्यांस पक्के इंग्लिश राज्यभक्त करून अखेरीस त्यांस शिवाजीसारिख्या धर्मभोळ्या, अज्ञानी, शूद्र राजानें आपला देश म्लेंच्छांपासून सोडवून गाई ब्राह्मणांचे कसें पालन केले, याविषयी अनेक हुलथापा देऊन त्यांस पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडितात. यामुळे शूद्र समाजाचे मानाप्रमाणे ते मोठाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत. एकंदर सर्व खात्यांत भटांची गर्दी होऊन ते शूद्रावर इतक्या सफाईनें जुलूम करितात, कीं त्याविषयीं यथासांग हकीगत लिहू गेल्यास, कलकत्त्यातील नीळ पिकविणान्या इंग्लिश लोकांचे जुलूम 'खडींत नवाटकेसुद्धां भरणार नाहीत. आता चहुंकडे भटांच्या हातांत ( नांवाला मात्र टोपीवाले) सत्ता असल्यामुळे ते गरीब व अज्ञानी शूद्र रयतेचें तर काय, पण ते सरकारचेंसुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते यापुढेही सरकारचे नुकसान करणार नाहींत असे कोणाच्यानें म्हणवणार नाहीं. याविषयीं आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून तें, आंधळ्याच सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या धोरणानें वागते. यास्तव ह्यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होईल यांत तिळमात्र संशय नाही. सारांश, ब्रम्ह्याने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांस दास केल्यानंतर तो गवर्न इतका फुगला होता की, महाअरींनीं त्याचें नांव थट्टेने "प्रजापती" पाडिलें होतें असा तर्क निघतो. परंतु ब्रम्हा मेल्यावर आर्य लोकांच्या मुळच्या भट नांवाचा लोप होत जाऊन त्यांचे नांव ब्राह्मण पडलें.