गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. रस्ते बांधतांना आपण अनेक गोष्टींचा विचार करीत नाही हे त्याचे एक कारण आहेच; परंतु इतरही अनेक कारणे आहेत. त्याबाबत..
हे तीर्थयात्रेस जाताना वाढदिवस, लग्न किंवा अशाच प्रसंगांसाठी जाताना होत आहेत. वाहने भाड्याने घेताना किंवा बाहेरच्या चालकाची सेवा घेताना त्याच्याबद्दल अनेकदा काहीच माहिती नसते.
गाडीचा चालक पूर्ण व नियमित गाडीचालक असावा, फार वयस्कर नसावा, तो रागीट नसावा आणि तो काय औषधे घेतो याचीही माहिती हवी. चालक उच्च रक्तदाब, मधुमेही आणि मनोरुग्ण नसावा. आपली गाडी अगोदर त्याला चालवायला लावणेही आवश्यक आहे. कारण आता अनेक नवीन ‘मॉडेल’ येत आहेत. काहींनी ‘ऑटोमॅटिक’ गाडी चालवली नसते; परंतु वाहक मात्र ‘मला सर्व गाड्या चालवता येतात,’ असे बिनधास्त सांगत असतात. तो रात्री किंवा आदल्या दिवशी कोठे गेला होता, त्याची झोप पूर्ण झालेली आहे की नाही याची चौकशीही आपण सहसा करीत नाही.
भाड्याची गाडी असल्यास ही चौकशी करणे जास्तच महत्त्वाचे असते. कारण मालक फक्त स्वतःचा धंदा बघतो. ज्या गावाला जायचे आहे त्याची माहिती चालकाला अगोदर असल्यास प्रवास सुखदायी होतो. चालकाला गुटखा, दारू, तंबाखू, विडी, सिगारेट व इतर व्यसनही नसावे. ही माहिती जरी किचकट किंवा जरा जास्तच वाटत असली तरीही आपले जीवन अर्थात कुटुंबाचे जीवन काही काळ त्याच्या हाती असते, हे लक्षात घेतले पाहिजे.
काही गोष्टी फार साध्या वाटतात; परंतु त्या महत्त्वाच्या असतात. गाडीचे नियमित सर्व्हिसिंग करणे टाळू नये. कंपनीच्या पेट्रोल पंपावरच इंधन टाकावे. गाडीचे ‘टायर’ गोटा होईपर्यंत वाट बघू नये. दहा हजार किलोमीटर ‘रनिंग’ झाले असता ते बदलणे योग्य. ‘टायर’चे रिमोड करणे टाळावे, शक्यतो चारही टायर एकाच वेळी बदलावेत. गाडीचा आवाजात येत असल्यास ताबडतोब गॅरेजमध्ये दाखवावे म्हणजे अनर्थ टाळता येतील. विरुद्ध बाजूने गाडी चालवू नये. रस्त्याचे काम चालू असेल, तर समोरून येणाऱ्या वाहनांची दिशा लक्षात येत नाही व चालकाचा गोंधळ उडतो. गाडीत फार मोठ्या आवाजात गाणी लावणे टाळावे. लहान मुलांना समोरच्या सेटवर बसवू नये. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा आपण अनेकदा फार साकल्याने विचार करत नाही. अपघाती मृत्यू हे आपण ओढवून घेतलेले मृत्यू असतात. अपघात होण्याची कारणे निश्चित करून ती टाळण्याचा प्रयत्न रस्ते बांधताना केला गेला, तर शेकडो लोकांचा जीव वाचू शकतो. बसने प्रवास करताना अनेक गोष्टी प्रवाशांच्या हाती नसतात; पण खासगी किंवा स्वत:च्या कारने प्रवास करताना, चालकाची सेवा घेताना आपण अपघाताची संभाव्य कारणे लक्षात घेऊन आधीच उपाययोजना करू शकतो.