गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट आणि हाऊसफुल्ल थिएटर असं समीकरण झालं आहे, मोठ्या पडद्यावर प्रयोगशील आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारे विषय मांडले जात आहेत.
गेल्या दोन-अडीच वर्षांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, प्रयोगशील आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारे विषय पडद्यावर मांडले गेले. 'हाऊसफुल्ल'च्या निमित्तानं मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा कौलही कळतोय. म्हणूनच; महाराष्ट्राला भारी वेड लावणाऱ्या मराठी सिनेसृष्टीचा हा आढावा...
महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पुढील दोन दिवसांचे 'बाईपण भारी देवा' सिनेमाचे शो हाऊसफुल्ल आहेत. २०१६मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाबाबत आणि दहा वर्षांपूर्वी संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' सिनेमाबाबतही असंच घडलं होतं. यावर्षी रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमानंही प्रेक्षकांना भुरळ घातली. 'बाईपण...'च्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे सुखावली. गेल्या दोन-अडीच वर्षात मराठी सिनेसृष्टी अधिक प्रयोगशील आणि व्यवसायाभिमुख झाली असल्यामुळे हे यश मिळतंय, असं तज्ज्ञ सांगतात. लॉकडाऊननंतर मराठी सिनेमानं कात टाकल्याचं बोललं जात होतं. नोव्हेंबर २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' सिनेमानं त्याची सुरुवात झाली. ५० टक्के क्षमतेनं राज्यात सिनेमागृहं सुरू झाली तेव्हा महिला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहांमध्ये 'झिम्मा'साठी गर्दी केली होती.
गेल्या दोन-अडीच वर्षांत मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग झाले. तसंच प्रेक्षकांच्या जवळचे विषय मांडण्यात आले. असं असलं तरी व्यावसायिक यश मिळवलेल्या मराठी चित्रपटांची संख्या अद्याप फार नसली तरी प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्याची क्षमता मराठी सिनेमात नक्कीच आहे. गतवर्षांमध्ये 'गोष्ट एका पैठणीची', 'गोदावरी', 'मी वसंतराव', 'धर्मवीर', 'शेर शिवराज', 'सुमी', 'जून', 'गोदाकाठ', 'फनरल', 'कुंकूमार्जन', 'कारखानीसांची वारी', 'प्रवास' या सिनेमांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा मिळवली.
उद्योग आणि आशय या दोन्हीच्या दृष्टीनं मराठी सिनेसृष्टीचा विकास होतोय.
मांदियाळी वैविध्यपूर्ण सिनेमांची
एक काळ असा होता की, मुंबईसह राज्यात हिंदी सिनेमे मराठी चित्रपटांना बगल देत सिनेमागृहांवर वरचढ ठरत होते. पण, आज मराठी सिनेमा बॉलिवूडला चांगलीच टक्कर देताहेत. हिंदीच्या तुलनेनं मराठी सिनेमांचं निर्मितीमूल्य कमी असली तरी 'माऊथ पब्लिसिटी'मुळे मराठी चित्रपट राज्यभरातील सिनेमागृहात अग्रेसर ठरताना दिसले. परिणामी, 'वेड', 'वाळवी', 'बटरफ्लाय', 'घर बंदूक बिरयानी', 'महाराष्ट्र शाहीर', 'पावनखिंड', 'धर्मवीर', 'चंद्रमुखी', 'सरसेनापती हंबीरराव', 'झोंबिवली', 'टाइमपास ३', 'पांघरूण', 'गोदावरी', 'वाय', 'अनन्या', 'गोष्ट एका पैठणीची', 'सरला एक कोटी', 'तमाशा लाइव्ह', 'व्हिक्टोरिया', 'फुलराणी', 'जून' या सिनेमांमधून विविधांगी विषय मांडले. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे; त्यामुळे वेगवेगळ्या आशय-विषयांवरील सिनेमांना प्रेक्षक चित्रपटगृहात उत्तम प्रतिसाद देताहेत; असा विश्वास निर्मात्यांना आहे.
• महिला प्रेक्षकवर्गानं उचलून धरलेले सिनेमे
बाईपण भारी देवा
बटरफ्लाय
फुलराणी
वाय
अनन्या
झिम्मा
२०२३
बाईपण भारी देवा - ₹ ५०.१० कोटी
महाराष्ट्र शाहीर - ₹ ७.३५ कोटी
वाळवी - ₹ ७.२५ कोटी
२०२२
वेड - ₹ ७५ कोटी
पावनखिंड - ₹ ४३ कोटी
धर्मवीर - ₹ २९ कोटी
• अभिमानास्पद दखल!
गतवर्षी ‘ऑस्कर’च्या शर्यतीत निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा सिनेमा होता. २०२३च्या ऑस्कर नामांकन पात्रता यादीत या सिनेमाला स्थान मिळालं होतं. ऑस्करकडून जगभरातून आलेल्या ३००हून अधिक चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली होती. या चित्रपट नामांकनाच्या यादीत 'मी वसंतराव'बरोबर 'कांतारा', 'गंगूबाई काठियावाडी', 'द कश्मीर फाइल्स' हे भारतीय सिनेमेही होते.
सिक्वेलची गोष्ट
एखादा सिनेमा गाजला की, निर्माते त्याचा सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीस आणतात. हिंदी, दाक्षिणात्य सिनेमांप्रमाणे मराठीतही हे समीकरण आता रूढ झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत सिक्वेल, प्रिक्वेल, क्रॉसओव्हर, फ्रेंचायजी असे प्रयोग होताहेत. हा माहोल आगामी वर्षांत मराठी सिनेमाविश्व व्यापून टाकणार असं दिसतंय. कारण, १५हून अधिक सिनेमांचे सिक्वेल सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत.