भारताची तिसरी चांद्रमोहीम शुक्रवारपासून (ता.१४) सुरू होणार आहे. यासाठी २५.३० तासांच्या उलट गणतीला आज दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरुवात झाली. ‘चांद्रयान -३’चे प्रक्षेपण आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी सतीश धवन केंद्रावरून होणार आहे.
इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी श्रीहरीकोटापासून जवळ असलेल्या सुलुरपेठ गावातील श्री चेंगलम्मा परमेश्वरीनी मंदिराला आज भेट देऊन प्रार्थना केली. ते म्हणाले, की ‘चांद्रयान -३’ मोहिमेला यश मिळाले म्हणून चेंगलम्मा देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. ‘चांद्रयान-३’नंतर इस्रो व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. ‘पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल’ (पीएसएलव्ही) या उपग्रहाद्वारे या महिनाअखेरीस हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येईल, असे सोमनाथ यांनी सांगितले.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची ‘आदित्य -एल१’ ही पहिली अवकाश मोहीम ऑगस्टमध्ये साकारणार आहे. यासाठी सध्या उपग्रहाच्या चाचण्या सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्या तर नियोजित वेळेला (१० ऑगस्ट) किंवा त्या तारखेच्या जवळ प्रक्षेपण होईल, असेही ते म्हणाले.दुसरीकडे ‘इस्रो’तील शास्त्रज्ञांच्या एक गटाने तिरुमला येथे बालाजीचे दर्शन घेऊन पूजा केली. या गटात तीन महिला व दोन पुरुष शास्त्रज्ञ होते. तिरुपतीच्या मंदिरात ते पोहचल्याची छायाचित्रे व चित्रण सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. या शास्त्रज्ञांनी ‘चांद्रयान-३’ची लहान प्रतिकृतीही बरोबर आणली होती.
शास्त्रज्ञांचे पथक बालाजीच्या चरणी‘इस्रो’चे काही शास्त्रज्ञ तिरुपती येथे श्री बालाजीच्या दर्शनासाठी आले होते. या वृत्ताला तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (टीटीडी) एका अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला. ते म्हणाले,की इस्रोचे एक पथक तिरुमलाला आले होते, पण आमच्या जनसंपर्क विभागाने त्यांच्या दौऱ्याला प्रसिद्धी दिली नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या व्यवस्थेत मंदिराचे अधिकारी व्यग्र होते. ‘इस्रो’चे अधिकारी त्यांचा मंदिराचा दौरा सामान्यांपासून दूर ठेवतात, असेही त्यांनी सांगितले.